

पणजी: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दाबोळी विमानतळाच्या भविष्यावरुन निर्माण झालेला संभ्रम दूर करत विरोधकांवर तोफ डागली. "दाबोळी विमानतळ कधीही बंद होणार नाही, विरोधक केवळ या मुद्द्यावर राजकारण करुन जनतेची दिशाभूल करतायेत," असे खडेबोल त्यांनी सुनावले. विशेषतः दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस यांना लक्ष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले की, संसदेबाहेर येऊन वक्तव्य करणे आणि आपले राजकीय वजन वाढवण्याचा प्रयत्न करणे ही त्यांची आता सवय झाली.
मुख्यमंत्र्यांनी दाबोळी विमानतळाच्या अस्तित्वासाठी सरकारकडून केल्या जाणाऱ्या प्रचंड गुंतवणुकीचा दाखला दिला. ते म्हणाले की, जर हे विमानतळ भविष्यात बंद करायचे असते किंवा केवळ नौदलाच्या हवाली करायचे असते, तर सरकारने तिथे 545 कोटी रुपये खर्चून उड्डाणपूल का बांधला असता? गेल्या पाच वर्षांत नागरी विमान उड्डाण मंत्रालयाने विमानतळाच्या आधुनिकीकरणासाठी 300 ते 400 कोटींची गुंतवणूक (Investment) केली. इतका मोठा पैसा खर्च केल्यानंतर विमानतळ नागरी वापरासाठी बंद करणे हा तर्क पूर्णपणे चुकीचा आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिलेल्या आश्वासनाचा पुनरुच्चार करताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, हे विमानतळ नौदल आणि सामान्य जनता अशा दोघांसाठीही पूर्वीप्रमाणेच सुरु राहील. मोपा विमानतळ सुरु झाल्यामुळे दाबोळीवर परिणाम होईल, हा विरोधकांचा दावा केवळ भीती पसरवण्यासाठी आहे. दाबोळी विमानतळ हे गोव्याच्या पर्यटनाचा आणि जनजीवनाचा अविभाज्य भाग असून सरकार त्याच्या सुरक्षेसाठी आणि निरंतर चालण्यासाठी कटिबद्ध आहे. त्यामुळे विरोधकांनी विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करु नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.