वास्को: येथील दाबोळी विमानतळासमोरचा महामार्ग ओलांडताना गेल्या वीस दिवसांत दोघांना वाहनांच्या धडकेनंतर जागीच मरण आल्याने तेथील वाहतूक व्यवस्था चर्चेत आली आहे. तेथील एकंदर सदोष वाहतूक व्यवस्थेमुळे वाहनचालकांत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. रस्ते रुंद झाले, परंतु रस्ता ओलांडणे जीवावर बेतणारे ठरत आहे.
वाहतूक पोलिस, वाहतूक खाते, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणालाही याप्रकरणी काही देणे-घेणे नसल्याचे दिसत आहे. येथे विमानतळ असल्याने तेथे कामासाठी ये-जा करणारया शेकडो लोकांना रस्ता पार करण्यासाठी भारतीय नौदलाच्या हंस तळाच्या प्रवेशद्वारासमोर झेब्रा क्राँसिंग आहे. तथापि त्याचा उपयोग लोक का करीत नाहीत, याचा विचार करण्याची गरज आहे.
पूर्वी दाबोळी विमानतळ चौकात बरेच अपघात होऊन, काहीजण मृत्युमुखी पडले होते. याप्रकरणी तेथील वाहतुकीची कोंडी व अरुंद रस्त्याची दखल घेताना तत्कालीन मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी तेथे ग्रेड सेपरेटर उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार शांतीनगरच्या बाजूने एक दाबोळीच्या बाजूने एक असे दोन उड्डाणपूल तेथे उभारण्यात आले. त्यामुळे ‘दाबोळी’वर ये-जा करण्याची मोठी सोय झाली.
शांतीनगर येथे असलेल्या पुलाचा वापर दाबोळी विमानतळावरून मडगाव, पणजी, वास्कोकडे जाणारी वाहने, तसेच वेर्णा, दाबोळी रस्त्याने येऊन वास्को, चिखली, मडगाव, पणजीकडे जाणारी वाहने करतात. तथापि ही वाहने उड्डाण पुलावरून महामार्गावर येताना त्यांच्या वेगावर कोणतेही नियंत्रण नसते. त्यामुळे मांगोरहिल, शांतीनगर येथून महामार्गावरून येणाऱ्या वाहनांना धडकण्याची मोठी भीती असते. भरधाव वाहनांच्या चालकांना प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी शिस्त लावण्याची गरज आहे.
दाबोळी विमानतळावर कामासाठी येणारे शेकडो लोक बसमधून उतरल्यावर जीव मुठीत घेऊन तेथील महामार्ग ओलांडताना काही वेळा अपघातात सापडतात. एखादा रस्ता ओलांडत असल्याचे पाहूनही काही चालक वेग कमी करत नाहीत. तिथे पूर्वी बसथांबा होता. रुंदीकरणावेळी तो बसथांबा हटवला.बसमधून उतरणारे प्रवाशी जीव धोक्यात घालून विमानतळावर जाण्यासाठी रस्ता पार करतात. नौदलाच्या हंस तळाच्या प्रवेशद्वारासमोर झेब्रा क्रॉसिंग आहे. पण सुमारे तीनशे मीटर्सपर्यंत चालत जाण्यास कोणी तयार नसतात, परिणामी अपघातात सापडतात.
याप्रकरणी वाहतूक पोलिस, वाहतूक खाते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण इत्यादीनी संयुक्तरित्या पाहणी करून तेथे वाहतूक व्यवस्था कशी सुधारता येईल.पादचाऱ्यांना रस्ता कोठून व कसा ओलांडता येईल, यासंबंधी आढावा घेण्याची गरज आहे. रस्ते रुंद केले, म्हणजे सर्व काही झाले, अशा भ्रमात त्यांनी राहू नये. प्रसंगी तिथे वाहतूक पोलिस तैनात करावेत, अशी मागणी होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.