
वास्को : सुट्टी काढून मित्रांसह आपल्या गावी परतणाऱ्या एका सुरक्षारक्षकाला ट्रकने उडवल्याची घटना सोमवारी घडली. हरि कृष्ण रॉय (४०) असे या व्यक्तीचे नाव असून ते दाबोळी विमानतळासमोरील रस्ता पार करीत होते.
एका भरधाव ट्रकने सोमवारी सायंकाळी त्यांना धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. रस्ता पार करण्यासाठी येथे ‘झेब्रा क्रॉसिंग’ नसल्याने या पादचाऱ्याला जीव गमवावा लागला. त्यामुळे नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. याआधी, याच रस्त्यावर एका वाहनाने धडक दिल्याने शांतीनगर-वास्को येथील अंजना आदेल (५७) यांचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, हरि कृष्ण हे सोमवारी आपल्या मित्रांसह रेल्वेने बिहारला जाणार होते. ते पणजीहून दाबोळी येथे आले होते. दाबोळी येथे आल्यावर ते रस्ता पार करीत होते. शांतीनगर मार्गाने वेगाने आलेल्या ट्रकाने त्यांना जोरदार धडक दिली.
अंगावरुन चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र नागरिकांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. मुरगाव बंदरातून माल घेऊन जाणारया ट्रकाच्या वेगावर कोणाचेही नियंत्रण नाही.
त्यामुळे हे ट्रकचालक एकमेकांशी स्पर्धा करीत असतात. याप्रकरणी वाहतूक पोलिस तसेच वाहतूक खात्याचे अधिकारी योग्य कारवाई करतील काय, हा प्रश्न संतापलेल्या नागरिकांनी उपस्थित केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.