पणजी: ‘आरजी’ आणि ‘आप’सोबतच्या युतीवर अंतिम निर्णय झाल्यानंतर लगेचच जागा वाटपाची चर्चा सुरू होईल, असे प्रदेश काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. कोणत्या मतदारसंघात कोणता पक्ष बळकट आहे, कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला अधिक फायदा मिळू शकतो, यावर पूर्ण चर्चा करूनच जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
काँग्रेसच्या उमेदवारीवर जिंकून येऊन भाजपमध्ये गेलेल्या १८ जणांना पुन्हा पक्षात प्रवेश दिला जाणार नाही. यावेळी नव्या उमेदवारांना संधी देऊन त्यांना निवडून आणले जाईल, असा ठाम विश्वासही ठाकरे यांनी व्यक्त केला.
आघाडीने यावेळी विधानसभा निवडणुकीत २७ जागा जिंकून आणण्याचे ध्येय ठेवले आहे. त्यासाठी प्रदेश काँग्रेसने गेल्या काही महिन्यांपासून मतदारसंघांचा सर्व्हे सुरू केला असून, विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ, जिंकण्याची पात्रता असलेल्या नव्या चेहऱ्यांचा शोध सुरू केला आहे.
बहुतांशी मतदारसंघांतील सर्व्हे पूर्ण झाला असून, उर्वरित मतदारसंघांतील सर्व्हेचे काम पुढील १५ दिवसांत पूर्ण होईल, असेही माणिकराव ठाकरे म्हणाले.
तरुणाई आघाडीच्या पाठिशी उभी राहील
कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर राज्यातील तरुणाईचा भाजपविरोधातील रोष वाढला आहे का?, असे विचारले असता, राज्यातील जनता गेल्या अनेक वर्षांपासून भाजप सरकारला कंटाळली आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर गोव्यासह देशभरातील तरुणाई हुकूमशाही भाजप सरकारविरोधात गेलेली आहे.
भाजपच्या गोव्यातील आणि केंद्रातील सरकारला तरुणाईच्या भविष्याची चिंता नसल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राज्यातील तरुण पिढी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून भाजपचा पराभव करेल, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.