पणजी: कोडार येथे कोमुनिदाद जमिनीवर आयआयटी शैक्षणिक संकुल उभारण्याबाबत सरकार गंभीर आहे. तीन ठिकाणी या प्रकल्पाला विरोध झाल्यानंतर आता कोडार येथे होत असलेला विरोध कमी करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पुढाकार घेतला आहे.
‘या प्रकल्पाला विरोध का?’ असा सवाल करून गोव्यासारख्या शंभर टक्के साक्षर राज्यात अशा प्रकारची विरोधाची मनोवृत्ती बाळगली जाऊ नये. पुढच्या पिढीचा विचार करणे ही काळाची गरज आहे, असेही त्यांनी सुनावले.
मंत्रालयात आज मुख्यमंत्र्यांचे कोडार येथे काल झालेल्या आयआयटी विरोधातील बैठकीकडे लक्ष वेधले असता त्यांनी या विरोधाला कोणाची तरी फूस असल्याचा आरोप केला आहे.
त्यामुळे राज्यात आता हा विषय जोरदारपणे चर्चिला जात आहे. यापूर्वी सत्तरीतील शेळावली, काणकोणातील लोलये आणि सांगे येथे आयआयटी संकुल प्रकल्पाला विरोध झाला होता.
रिवण येथे जमीन मालकीबाबत कागदपत्रे व्यवस्थित नसल्याने तेथे हा प्रकल्प होऊ शकला नाही. आता कोडार परिसरात कोमुनिदाद जमिनीवर तो प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न सुरू झाला असताना त्यासही विरोध होऊ लागला आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, विरोध करायचा म्हणून आयआयटीला विरोध करू नये. राष्ट्रीय प्रकल्प गोव्यात नकोच अशा मनोवृत्तीची काही माणसे आहेत. आयआयटी प्रकल्पाला विरोध का, हे त्यांनी सांगावे.
आयआयटीत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्याचा आनंद वेगळाच असतो. मागे चेन्नई येथील आयआयटीत मला दहा गोमंतकीय विद्यार्थी भेटले. आता माझ्या साखळी मतदारसंघातील विद्यार्थ्याला छत्तीसगडमधील आयआयटीत प्रवेश मिळाला आहे. गोव्यात आयआयटी झाल्यानंतर गोमंतकीय विद्यार्थ्यांना येथेच शिक्षण घेणे शक्य होणार आहे.
- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.