पणजी: तोयार तळ्याशेजारी सरकारने उभारू घातलेल्या युनिटीमॉल प्रकल्पाला जो आम्ही विरोध करत आहोत तो विरोधकांच्या सांगण्यावरून नव्हे तर तो पर्यावरणाचा विचार करून होय. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी चर्चेतून विषय सोडविण्यासाठी आवाहन केले असून आम्ही त्यांच्याशी चर्चा करण्यास तयार असल्याचे तोयार पाणथळ समितीचे अध्यक्ष गोविंद शिरोडकर यांनी सांगितले.
दरम्यान, शिरोडकर म्हणाले, आम्ही कुणा विरोधकांना बळी पडलेलो नाही आमची आमच्या गावातील तळ्याबद्दल संवेदनशीलता आहे, आमच्या येणाऱ्या पिढ्यांच्या भविष्याचा प्रश्नांमुळे आम्ही विरोध करत आहोत. सरकारने राज्यातील इतर ठिकाणी हा प्रकल्प अवश्य उभारावा परंतु पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात तो आम्हाला नकोय, असे त्यांनी सांगितले.
गोव्यात पर्यावरणसंबंधी कार्य करणारे अनेक लोक आहेत. त्यांच्याशी चर्चा केल्यास आपल्याला कळून चुकेल या तळ्यांचे पर्यावरणाच्या अनुषंगाने किती महत्त्व आहे. आम्हा आदिवासी समाजाला पर्यावरण रक्षण कोणी शिकवायची गरज नाही, आम्हाला जन्मापासून याचे बाळकडू मिळत असते,असेही शिरोडकर म्हणाले.
चिंबल गावात जे इंदिरानगर आले आहे त्याने आम्ही संकटात आलो आहोत आणि आता युनिटी मॉल म्हणजे आम्हाला सरकार दाबू पाहत आहे, हेच यावरून दिसून येत आहे. आम्ही आंदोलन करत आहोत तेथे सरपंच, आमदार आले नाहीत, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी येथे येऊन चर्चा करावी, असा हट्ट आम्ही धरणार नाही... ते सांगतील तेथे आम्ही चर्चा करू, असे शिरोडकर यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.