म्हापसा, येथील बोडगेश्वर मंदिरासमोरील शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहत असल्याने शेतकऱ्यांना मशागतीची कामे करणे कठीण झाले आहे. पाण्याचा निचरा होणारी पारंपरिक वाट बंद झाल्याने ही समस्या निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बोडगेश्वर मंदिर परिसरातील शेती शेतकरी वर्षानुवर्षे करीत आहेत. मात्र रस्ते बांधताना माती शेतात टाकल्याने तसेच रस्त्यांच्या बाजूने नालेही न उभारल्याने पाणी तुंबून राहत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करणे कठीण बनले आहे. सरकारने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन तोडगा काढावा, जेणेकरून शेतकरीवर्ग शेती करू शकतील, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
रस्त्याचे काम करताना माझ्या शेतात जाण्यासाठी असलेली वाट बंद केली आहे. शेतात पाणी तुंबले आहे. याविषयी साबांखा व पाटबंधारे विभागाला कळवूनही अद्याप काहीही झालेले नाही.
- जया बर्डे, शेतकरी
नकळंगुट व पणजीला जाणाऱ्या दोन्ही रस्त्याच्या बाजूची शेती पाण्याने तुंबली आहे. परिणामी शेतकरी शेती करू शकत नाही. खोर्ली बाजूच्या डोंगराळ भागातील सर्व पाणी या भागात येते, मात्र या पाण्याला तार नदीत जाण्यास वाट नसल्याने ते साचून राहते.
- श्रीकांत पार्सेकर
शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे मशागतीची कामे करणे कठीण झाले आहे. येथील नाला साफ करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते. परंतु काहीही केले गेले नाही. दुसरीकडे रस्ते बांधताना शेतात माती टाकण्यात आली, त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यासाठी वाटच नाही.
- स्वप्नील साळगावकर, अध्यक्ष, बोडगेश्वर शेतकरी संघ
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.