योगेश मिराशी
बार्देश तालुक्यात भाजपची ताकद पुन्हा वाढली आहे. रोहन खंवटे, मायकल लोबो, जोशुआ डिसोझा, नीळकंठ हळर्णकर यांच्यासारख्या नेत्यांमुळे पक्षाला बळकटी आली आहे. तालुक्यात तीन लोकप्रतिनिधींकडे कॅबिनेट दर्जा आहे.
त्यात रोहन खंवटे व नीळंकठ हळर्णकर हे मंत्री आहेत; तर जोशुआ डिसोझा हे उपसभापती. त्यामुळे याचा फायदा भाजपला आगामी लोकसभा निवडणुकीत निश्चितच होऊ शकतो.
गेल्या लोकसभा निवडणुकीत बार्देशात तालुक्यात भाजपची आघाडी कमी झाली. परंतु पक्ष पुन्हा नव्या दमाने सहाव्यांदा रिंगणात उतरण्याच्या तयारीला लागला आहे.
यंदाची समीकरणे तसेच राजकीय वारे वेगळे आहेत. दुसऱ्या बाजूने काँग्रेस पक्ष गत विधानसभेवेळी मिळालेल्या मतरूपी आघाडीची पुनरावृत्ती करण्यास व भाजपसमोर आव्हान उभे करण्याची तयारी करत आहे. मात्र, या पक्षाकडे कार्यकर्त्यांची कमतरता जाणवत आहे. बार्देशात काँग्रेसमध्ये जे नेते आहेत, त्यांच्यात समन्वयाचा अभाव आहे.
2014 च्या तुलनेत 2019 साली भाजपची पकड झाली ढिली
बार्देश तालुका हा भाजपचा गड मानला जातो. ख्रिश्चन तसेच बहुजन समाजाचा प्रभाव असलेला हा तालुका आहे. विद्यमान सात आमदारांपैकी तीन आमदार हे ख्रिश्चन समाजातील आहेत.
2014 च्या तुलनेत 2019 साली भाजपची पकड तालुक्यात ढिली झाली आणि लोकसभेवेळी या घटलेल्या मतांचा परिणाम विधानसभा निवडणुकीतही जाणवला.
त्यानंतर बार्देशातून काँग्रेस उमेदवारीवर निवडून आलेल्या आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. परिणामी आता भाजपची ताकद वाढली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच भाजपचा चेहरा आहेत. त्यांना मानणारा मोठा वर्ग तालुक्यात आहे. दुसरीकडे विरोधकांची एकजूट व त्यांच्याकडे चेहराच नाही. ही गोष्ट भाजपच्या पथ्यावर पडली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.