पणजी: केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना महिलांपर्यंत पोहोचवून महिलांचे सबलीकरण करण्यास राज्य सरकारने प्राधान्य दिले आहे. त्याचा फायदा घेत लाईव्हलीहूड मिशनच्या माध्यमातून गोव्यातील महिलांनी विविध व्यवसाय थाटून ३५० कोटींची आर्थिक उलाढाल गेल्या काही वर्षांत केली, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी स्पष्ट केले.
ग्रामविकास मंत्रालय आणि राज्य लाईव्हलीहूड मिशनच्या संयुक्त विद्यमाने पणजीत आयोजित ‘अनुभूती’ या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, ग्रामविकास मंत्रालयाच्या संयुक्त सचिव स्मृती शरण, उपसचिव मोनिका, ग्रामविकास खात्याचे सचिव संजय गोयल आदी यावेळी उपस्थित होते.
केंद्र आणि राज्य सरकारने नेहमीच सरकारी योजना सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवून तयार केल्या. राज्य सरकारने ‘स्वयंपूर्ण गोवा’च्या माध्यमातून या सर्व योजना जनतेपर्यंत पोहोचवल्या. यात राज्यातील महिला वर्गाला अधिक प्राधान्य देण्यात आले. त्यामुळेच ग्रामविकास खात्याअंतर्गत येणाऱ्या लाईव्हलीहूड मिशनअंतर्गत ३,२५७ स्वयंसाहाय्य गट कार्यरत आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यात साधनसुविधा वाढवण्यासह सरकार मनुष्यबळ विकासही घडवून आणत आहे. त्यामुळे तळागाळातील जनतेचा विकास होत आहे. गेल्या साठ वर्षांत राज्याचा जितका विकास झालेला नव्हता, तितका विकास गेल्या दहा वर्षांत भाजपच्या डबल इंजिन सरकारने घडवून आणला आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी नमूद केले.
राज्य सरकारकडून गेल्या काही वर्षांपासून गोव्यात आध्यात्मिक पर्यटनाला चालना दिली जात आहे. सद्यस्थितीत गोवा हे देशातील सर्वांत स्वच्छ राज्य आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले. शंभर टक्के वीज, पाणी, शौचालये, विमा देणारे पहिले राज्य बनण्याचा मानही गोव्याने पटकावला आहे, असेही त्यांनी नमूद केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.