पणजी: सत्ताधारी भाजपने विधानसभा निवडणुकीची रणनीती निश्चित करण्यासाठी राज्यभर चाचपणी सुरू केली असून पणजी, मांद्रे, म्हापसा मतदारसंघांत त्यांच्या धोरणात सुस्पष्टता येऊ लागली आहे. राज्यात संघटनमंत्री हे पद नसल्याने पक्षाचे ज्येष्ठ नेते बी. एल. संतोष त्याबाबत धोरणात्मक मार्गदर्शन करू लागले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्षांकडून त्यांना दैनंदिन अहवाल प्राप्त होत असतो.
गेल्या आठवड्यात बी. एल. संतोष यांना माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हे विमानतळावर जाऊन भेटले. गेल्या साडेचार वर्षांत पार्सेकर हे पक्षश्रेष्ठींपैकी एखाद्या महत्त्वाच्या नेत्यास भेटण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या निवडणुकीपूर्वी त्यांच्या हरमल येथील निवासस्थानी जाऊन मनधरणी करण्याचे कष्ट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले होते.
सूत्रांच्या मते, या भेटीत फडणवीस यांचा अपमान झाला. त्यामुळे अवघ्या काही मिनिटांत ते तेथून निघून आले होते. त्यानंतर गेल्या दोन वर्षांत पार्सेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला व काही नेत्यांमार्फत त्यांनी दिल्लीत पक्षश्रेष्ठींचीही भेट घेण्याचा प्रयत्न केला, ज्यात त्यांना यश मिळाले नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि खासदार सदानंद शेट तानावडे यांनीही पक्षश्रेष्ठींकडे यासंबंधीची वाच्यता केली असता, त्यांना सबुरीने घेण्याचा सल्ला देण्यात आला.
गेल्या आठवड्यात पार्सेकर हे बी. एल. संतोष यांना भेटले असता, त्यांनी त्यांना कोणत्याही अटीविना यायचे असेल तरच पक्षात प्रवेश मिळू शकेल, असे स्पष्ट केले. ‘‘पुढची पाच वर्षे तुम्हाला कोणतीही उमेदवारी मिळू शकणार नाही, ही अट मान्य असेल तरच पक्षात या’’, असेही संतोष यांनी त्यांना ऐकविले.
पार्सेकर यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत श्रीपाद नाईक यांना जाहीर पाठिंबा दिला होता; परंतु त्याचाही फायदा झालेला नाही. दुसरी गोष्ट म्हणजे, मांद्रेची जागा मगोपला द्यायचे, हे सध्या तरी ठरले असून भाजप-मगोपची युती होईल, हे भाजप पक्षश्रेष्ठींनी गृहीत धरले आहे. त्यामुळेही पार्सेकर किंवा दयानंद सोपटे यांना मांद्रेतून भाजपची उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे. सूत्रांच्या मते, मांद्रेची जागा भाजपने आपल्या हिश्श्यात प्राप्त केली तर दयानंद सोपटेंना जादा संधी आहे. परंतु मगोपला ही जागा मिळू शकते व त्यादृष्टीने मगोपचे जीत आरोलकर यांचे भवितव्य उजळ आहे.
दुसऱ्या बाजूला म्हापसा मतदारसंघात झालेल्या सर्वेक्षणात आमदार जोशुआ डिसोझा यांच्याबद्दल फारसे आशादायक चित्र भाजपला आढळलेले नाही. या सर्वेक्षणात आढळून आले, की जोशुआ हे गेली दोन कारकीर्द आमदार असले, तरी अजून त्यांना वडिलांच्या नावानेच ओळखले जाते व आमदार म्हणून त्यांची कारकीर्द फारशी चमकदार नाही. तेथे उमेदवार बदलण्यास भाजपला संधी आहे. सूत्रांच्या मते, मायकल लोबो आणि पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी राजकीय हालचाली चालविल्या आहेत व आपले प्रभावक्षेत्र वाढविण्यास सुरुवात केली आहे. दोघेही बार्देश तालुक्यात प्रबळ शक्ती म्हणून पुढे येत आहेत.
पणजी, ताळगाव मतदारसंघांत बाबूश मोन्सेरात यांचा राजकीय प्रभाव वाढल्याचे पक्षश्रेष्ठींच्या लक्षात आले आहे. पणजीत यावेळी भाजप पक्षश्रेष्ठी उत्पल पर्रीकर यांचा विचार करतील, अशी शक्यता त्यांच्या काही हितचिंतकांना वाटत होती; परंतु पणजी महानगरपालिका निवडणुकीत बाबूश यांची वाढलेली मोठी शक्ती आता नजरेआड करता येत नाही.
उत्पल पर्रीकर यांची साथ आता सारस्वतांनीही सोडल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या निवडणुकीत उत्पल यांना निवडणुकीपासून परावृत्त करण्याचे व्यक्तीश: प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी केले होते. मनोहर पर्रीकर यांचे कनिष्ठ पुत्र अभिजात यांना स्वत: बोलावून घेऊन उत्पलना खास संदेश पाठविण्यात आला होता. त्यात भविष्यात उत्पल यांचा दावा जरूर लक्षात घेण्याचे वचन देण्यात आले होते; परंतु उत्पल यांनी ते जुमानले नाही, हे पक्षश्रेष्ठींना खटकले व उत्पल यांचे नाव आता त्यांच्या कार्यक्रम पत्रिकेवर नाही.
या काळात उत्पल यांचा पणजीशी संपर्कही कमी होत गेला, याची भाजपला जाणीव आहे. बाबूश मोन्सेरात यांनी या काळात पणजी - ताळगावमध्ये हिंदू मतेही स्वत:कडे वळविल्यामुळे दोन मतदारसंघांबरोबरच त्यांना शेजारील आणखी दोन मतदारसंघांचीही जबाबदारी भाजपतर्फे (BJP) दिली जाण्याची शक्यता आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.