मडगाव, परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या आधीच्या कार्यालयीन निवेदनात दुरुस्ती सुचविल्याने ओसीआय नोंदणीबाबत नागरिकांच्या मनात परत एकदा संभ्रम निर्माण केला आहे. भाजपचे जुमला राजकारण पुन्हा एकदा समोर आले आहे.
नागरिकांना त्रास देणे आणि मानसिक छळ करणे हे भाजपच्या डीएनएमध्ये आहे. जूनमध्ये सत्तेवर आल्यानंतर इंडिया आघाडी सरकार हा ओसीआय कार्डचा प्रश्न कायमचा सोडवेल, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.
ओसीआय कार्ड देण्यासाठी भारतीय पासपोर्टच्या सरेंडर सर्टिफिकेटच्या बदल्यात ‘रिव्होकेशन सर्टिफिकेट’ स्वीकारणे गृह मंत्रालयाच्या विचाराधीन आहे असे शुद्धिपत्रक परराष्ट्र मंत्रालयाने जारी केल्याने त्यावर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी भाजपने गोव्याची फसवणूक केली असा आरोप केला आहे.
४ एप्रिल २०२४ रोजी निवेदन जारी केल्यानंतर केंद्र सरकारचे आभार मानणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आता सरकारची भूमिका स्पष्ट करावी, अशी माझी मागणी आहे, असे युरी आलेमाव म्हणाले.
काँग्रेस पक्षाने गोमंतकीयांना ओसीआय कार्डधारकांच्या समस्येचे निराकरण करण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात दिले होते आणि मला खात्री आहे की जून २०२४ मध्ये इंडिया आघाडी सरकार सत्तेवर आल्यावर, आमचे दोन्ही खासदार ओसीआय कार्ड समस्येला सर्वोच्च प्राधान्य देईल आणि कायमस्वरूपी तोडगा काढतील, असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.
३० एप्रिल २०२४ रोजी परराष्ट्र मंत्रालयाद्वारे धक्कादायक शुद्धिपत्रक जारी केल्यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांसह सरकारच्या एकाही मंत्र्याने कोणतेही विधान केले नाही याचे मला आश्चर्य वाटते. लोकसभा निवडणुकीत भाजपला रोष पत्करावा लागेल या भितीनेच या सर्वांनी हे शुद्धिपत्रक लपवून ठेवले, असा आरोप युरी आलेमाव यांनी केला आहे.
परदेशातील गोमंतकीयांना सापत्न वागणूक
परदेशात काम करणाऱ्या खलाशांना आणि गोमंतकीयांना भाजप नेहमीच सापत्न वागणूक देत असल्याचे वारंवार लक्षात आले आहे. परदेशात उदरनिर्वाहासाठी काम करणाऱ्या आपल्याच गोमंतकीयांचा भाजपने नेहमीच अपमान व अनादर केला आहे, असा दावा युरी आलेमाव यांनी केला आहे.
गोव्यातील लोकसभेची निवडणूक संपल्यानंतर भाजपने ‘यू टर्न’ घेण्यास प्रारंभ केला आहे. ओसीआय कार्डसाठी अर्ज करणाऱ्या गोमंतकीयांना दिलासा देण्याचा डबल इंजिन सरकारचा कोणताच हेतू नाही, हे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने ओसीआयप्रकरणी जारी केलेल्या कार्यालयीन निवेदनातील दुरुस्तीने सिद्ध झाले आहे.
निवडणुकीपूर्वी केंद्राने निवेदन देऊन जो दिलासा गोमंतकीयांना दिला होता, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी केंद्राचे आभार मानले होते. मात्र, नव्याने करण्यात आलेल्या या दुरुस्तीमुळे मुख्यमंत्री आता गोमंतकीयांच्यावतीने विरोध करणार का?
- विजय सरदेसाई, आमदार
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.