
होन्नाली हा दावणगिरी जिल्ह्यात कर्नाटकच्या दक्षिण-मध्य मधला एक भूभाग. येथील लोक मुख्यत्वे उदरनिर्वाहासाठी शेती करतात. होन्नालीचे नवाब मुळात अफगाणिस्तानच्या मुहम्मदझाई जमातीतील जमांद पठाण होते. जमांद पठाणांचा उगम आजच्या अफगाणिस्तानच्या कंदहार प्रांताजवळ झाला.
बादशाह औरंगजेबाच्या काळात तेथील आदिवासींच्या कलहामुळे त्यांच्यापैकी बरेच लोक पंजाबमध्ये प्रामुख्याने लाहोर आणि मुलतानमध्ये गेले. १६७६मध्ये बादशाह औरंगजेबाने दख्खन ताब्यात घेतले तेव्हा होन्नालीचे नवाब लाहोरहून दख्खनला आले असे मानले जाते. याच सुमारास मुघल बादशाहने ‘कुतब-उल-मुल्क शेरखान’ याला ‘नवाब’ ही पदवी दिली, जो होन्नालीचा पहिला नवाब बनला.
म्हैसूर वडयार आणि हैदर अली-टिपू सुलतान यांच्यापैकी एकापाठोपाठ आलेल्या शासकांनीही या पदवीची पुष्टी केली आणि त्यांचा सन्मान केला. टिपू सुलतानच्या राजवटीतच या घराण्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले जेव्हा तत्कालीन नवाब कुतुबुद्दीन खान यांना ‘अमीर-उल-उमरा’ किंवा ‘सर्वांत श्रेष्ठ नेता’ ही पदवी बहाल करण्यात आली.
टिपू सुलतानने या कुटुंबाला जवळच्या हनुमसागर नावाच्या गावात १,६०० एकरपेक्षा जास्त जमीन दिली. १९७३मध्ये भारतातील राजे यांच्या मालकीच्या सर्व जमिनी जप्त केल्यामुळे नवाबाच्या मालकीच्या जमिनी पुढे केवळ ३०० एकर राहिल्या.
चौथ्या म्हैसूर-ब्रिटिश युद्धात जे लोक लढले त्या सर्वांत टिपू सुलतानचे नाव म्हैसूरच्या बाजूने चमकणारा तारा म्हणून पुढे येते, तसेच ब्रिटिशांकडून डेव्हिड बेयर्ड, हॅरिस आणि वेलस्लीसारख्या ब्रिटिश दिग्गजांची नावं झळकतात. या युद्धात सहभागी झालेल्यांत आणखीन एक नाव पुढे येते ते म्हणजे होन्नालीचा नवाब जो टिपूसोबत लढताना मरण पावला. या युद्धाअगोदर बऱ्याच वर्षांपूर्वी हसन अली खान नावाच्या एका तरुणाने टिपूचे लक्ष वेधून घेतले जेव्हा तो कित्तूरला मराठ्यांच्या विरुद्धच्या मोहिमेवर होन्नालीतून युद्धात लढला.
हसन अली खानला श्रीरंगपट्टण येथे जाण्यास सांगण्यात आले जेथे त्याला टिपूच्या कार्यक्षम आणि विश्वासू लोकांच्या जवळच्या गटात सामील केलं गेलं. ‘टिपू सुलतानचा इतिहास’ या पुस्तकातील ‘युद्धाचा समकालीन’ या लेखात मीर हुसेन अली खान किरमाणी लिहितात, यावेळी बातमी आली की मुंबईहून जनरल स्टुअर्टच्या नेतृत्वाखाली इंग्रज सैन्याची एक तुकडी, एक मोठा ताफा घेऊन कुर्गच्या वाटेने सरळ श्रीरंगपट्टणकडे जात आहे.
त्यामुळे सुलतान लगेचच आपले संपूर्ण सैन्य आणि तोफखाना घेऊन, त्याच्या काही प्रमुख अधिकाऱ्यांना शत्रूच्या विरुद्ध लढण्यासाठी सोडून जनरल हॅरिसवर हल्ला करण्यासाठी निघाला आणि एक दिवस आणि दोन रात्रीतच तिथे पोहोचला व हल्ल्याचे आदेश दिले गेले.
ज्याने शौर्याने शत्रूशी मुकाबला केला म्हणून सुलतान श्रीरंगपट्टणकडे परतले, तो विश्वासू सय्यद गुफ्फार तिथे फार कमी वेळेत पोहोचला होता. जेव्हा जनरल हॅरिसने नदी ओलांडली, तेव्हा सुलतानपेट या गावाच्या पुढे जाऊन किल्ल्याच्या पश्चिमेकडे तळ ठोकला आणि दुसऱ्या दिवशी इंग्रज रेजिमेंटच्या किल्ल्याला व्यापलेल्या अनेक भक्कम अशा तळावर हल्ला केला व सुलतानच्या सैन्याने ते ताब्यात घेतले आणि जोरदार मुकाबला आणि कत्तल केली.
लेविन बेंथम बोअरिंगने हे वर्णन दिले आहे: ‘सुलतानपेट ‘टोपे’ नावाच्या सुपारीबागेपैकी एक, किल्ल्यापासून सुमारे एक मैल अंतरावर असलेल्या पूर्वेकडे वाहणाऱ्या जलवाहिनीतून खोल खंदकांनी व्यापलेली जागा’. जनरल बेयर्डला या सुलतानपेटेत जाऊन शत्रूला हुसकावून लावण्याचे निर्देश देण्यात आले होते.
परंतु ५ एप्रिल १७९९च्या रात्री पुढे गेल्यावर, त्याला सुलतानपेट टोप रिकामा आढळला. दुसऱ्या दिवशी, तथापि, म्हैसूर सैन्याने पुन्हा जमिनीचा ताबा घेतला, आणि त्यांना घालवणे अत्यंत आवश्यक असल्याने, सूर्यास्ताच्या वेळी दोन गट वेगळे केले गेले. यापैकी पहिले, कर्नल शॉवेच्या नेतृत्वाखाली, एका उद्ध्वस्त गावाचा ताबा मिळवला, जो त्याने यशस्वीपणे राखला.
कर्नल वेलस्ली यांच्या नेतृत्वाखालील दुसऱ्या गटातील सैन्य शिखरावर जात असताना, रात्रीच्या अंधारात ताबडतोब दगडफेक आणि रॉकेटच्या जबरदस्त आगीने हल्ला केला गेला. झाडे आणि जलकुंभांमध्ये अडकलेली माणसे गोंधळात पडली. काही मारले गेले आणि काही कैदी झाले.
या गोंधळात कर्नल वेलस्लीला गुडघ्याला लागल्याने जखमी होऊन शत्रूच्या हाती पडता पडता ते थोडक्यात बचावले. इंग्रजांनी घाबरून गोंधळात माघार घेतली. वेलेस्ली खंदकांनी व्यापलेल्या जागेत आपला मार्ग गमावून बसला आणि जखमी आणि दिशाहीन होऊन कॅम्पमध्ये पोहोचला. कर्नल आर्थर वेलस्ली या अनुभवाने खूपच हादरले होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी (६ एप्रिल १७९९) दुसऱ्या प्रयत्नाचे नेतृत्व करण्यास त्याने उशीर केला, ज्यामुळे जनरल हॅरिसने संयम गमावला आणि बेयर्डला नेतृत्व करण्यासाठी आदेश देण्यात आले. तथापि, याच सुमारास, वेलस्ली घटनास्थळी पोहोचला आणि बळकट केलेल्या दोन बटालियनने सुलतानपेट टोपेच्या पुढे ढकलले आणि नवाब हसन अली खान यांच्या नेतृत्वाखालील टिपूच्या माणसांशी युद्ध केले. हसन अली खान आणि त्याची माणसे लढाईत उतरले आणि शेवटपर्यंत लढले.
नवाब हसन अली खान त्या दिवशी लढताना मरण पावले आणि त्यांचे पार्थिव गंजम येथे नेण्यात आले जेथे त्यांना अगदी जवळच दफन करण्यात आले जेथे टिपू सुलतानला पुढे फक्त एक महिन्यानंतर अंतिम विश्रांती मिळाली. होन्नालीचा नवाब हसन अली खान दहा हजारांहून अधिक म्हैसूरवासीयांपैकी एक, ज्यांनी भारतावरील ब्रिटिश वर्चस्वाचा शेवटचा प्रतिकार मोडून काढण्यास अंतिम युद्ध केले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.