वाळपई: सत्तरी तालुक्यातील निसर्गरम्य ब्रह्मकरमळी परिसरात रानटी प्राण्यांचा धुमाकूळ थांबण्याचे नाव घेत नाहीये. रविवारी मध्यरात्री गव्या रेड्यांच्या एका मोठ्या कळपाने स्थानिक बागायतदार सखाराम देसाई यांच्या शेतात शिरून अक्षरशः तांडव घातले. या हल्ल्यात बागायतीचे प्रचंड नुकसान झालेय.
रानटी प्राण्यांपासून संरक्षणासाठी सखाराम देसाई यांनी आपल्या बागायतीभोवती भक्कम दगडी कुंपण घातले होते. मात्र, गव्या रेड्यांचा जोर इतका प्रचंड होता की त्यांनी हे दगडी कुंपण तोडून काढले आणि बागायतीत प्रवेश केला. मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या घुसखोरीमुळे परिसरातील इतर शेतकऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे.
बागायतीत शिरलेल्या या कळपाने पिकांची मोठी नासधूस केली. काढणीला आलेली केळीची झाडे मोडून टाकली, तर भविष्यातील उत्पन्नाचा स्रोत असलेली सुपारीची (पोफळीची) नवीन रोपे पायाखाली तुडवून नष्ट केली. सखाराम देसाई यांच्यासोबतच शेजारील बागायतदार अमितकुमार देसाई यांच्या शेतीचेही नुकसान झाले आहे. "अनेक वर्षांच्या परिश्रमानंतर ही बाग उभी केली होती, पण एका रात्रीत सर्व काही उद्ध्वस्त झाले," अशी व्यथा पीडित शेतकऱ्यांनी मांडली आहे.
सत्तरी परिसरात माकडं, रानडुक्कर आणि मोरांचा त्रास आधीच होता, त्यात आता गव्या रेड्यांच्या कळपामुळे शेती करणे अशक्य झाले आहे. वन खात्याने या घटनेचा तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जर वेळीच उपाययोजना केल्या नाहीत, तर शेतकऱ्यांना शेती सोडून देण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असा इशाराही स्थानिकांनी दिला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.