पणजी: कोकण शहरी सहकारी समितीने भुसावळ ते मडगाव पर्यंत थेट रेल्वे सेवा सुरू करण्याची जोरदार मागणी केली आहे. समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटकर यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना निवेदन सादर केले आणि या मागणीचा गांभीर्याने विचार करण्याची विनंती केली.
चंद्रकांत पाटकर यांनी यामागचे कारण स्पष्ट केले. ते म्हणाले की, नाशिक, भुसावळ आणि आसपासच्या भागांत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा आणि रायगड जिल्ह्यांतील हजारो कोकणवासीय नोकरी आणि व्यवसायासाठी स्थायिक झाले आहेत. या लोकांना त्यांच्या मूळ गावी ये-जा करण्यासाठी थेट रेल्वे सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांना मुंबईमार्गे प्रवास करावा लागतो, ज्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातो.
पाटकर यांनी पुढे सांगितले की, नाशिक आणि कोकण दरम्यान थेट रेल्वे सेवा सुरू झाल्यास केवळ स्थलांतरित कोकणवासीयांनाच सोयीचे होणार नाही, तर पर्यटन क्षेत्रासाठीही नवीन संधी निर्माण होतील. कोकणची नैसर्गिक सुंदरता आणि नाशिकची धार्मिक-सांस्कृतिक ओळख यामुळे दोन्ही प्रदेशात पर्यटकांची मोठी वर्दळ असते.
जर भुसावळहून रत्नागिरी-मडगाव मार्गावर नाशिक, कल्याण आणि पनवेलमार्गे थेट गाडी सुरू झाली, तर रेल्वेलाही महसुलात लक्षणीय वाढ होईल. रवींद्र चव्हाण यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ही नवीन रेल्वे सेवा भुसावळ, नाशिक, कल्याण, पनवेल, रत्नागिरी आणि गोवा यांच्यातील आर्थिक आणि सामाजिक संबंध अधिक मजबूत करेल.
यावेळी आमदार सीमा हिरे यांच्यासह मोठ्या संख्येने कोकणवासीय उपस्थित होते. केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालय लवकरच या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेतील, अशी आशा शिष्टमंडळाने व्यक्त केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.