तिसवाडी: सांतआंद्रे मतदारसंघातील भाटी येथे खाजन शेत जमिनीत मातीचा भराव टाकून तेथे बेकायदेशीररित्या बांधकाम करून नियम धाब्यावर बसवण्याचा प्रकार घडला आहे. शेती जमीन भाटी कोमुनिदादच्या मालकीची असून शेजारी असलेल्या मिठागरांना धोका निर्माण झाला आहे. हे कृत्य करणाऱ्यांवर कारवाई न झाल्यास हा प्रकार संपूर्ण गोव्यात होईल, अशी चिंताजनक परिस्थिती उद्भवली आहे.
घडल्या प्रकाराची नोंद तलाठी अभय केरकर यांनी घेऊन अहवाल करून तिसवाडी मामलेदारांना सादर केला आहे. हा प्रकार झाल्याचे लक्षात आल्यानंतर लगेच प्रक्रियेनुसार सर्वेक्षण करून अहवाल तयार करून तो सादर केला. मामलेदारांनी यासंदर्भात नोटिस जारी केल्यानंतर सध्या उपजिल्हाधिकाऱ्यांच्या पुढे खटला सुरू आहे, अशी माहिती केरकर यांनी दिली.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा प्रकार केलेली व्यक्ती परदेशात स्थायिक झाल्याने त्यांची ओळख पटत नाही. त्यामुळे ही प्रक्रिया अवघड होऊन बसली आहे. आपल्या जमिनीचे संरक्षण करता आले नाही म्हणून भाटी कोमुनिदादला प्रतिवादी करण्यात आले आहे. बांधकाम करून ही दुकाने आणि घरे भाडेपट्टीवर देण्यात आली आहे. प्रकाराची माहिती सांतआंद्रेचे आमदार विरेश बोरकर, भाटी पंचायतीचे सरपंच फ्रान्सिस डिसोझा यांना देण्यात आली आहे, असे केरकर यांनीसांगितले.
खाजन शेती जमिनीत मातीचे भराव टाकून बेकायदेशीररित्या बांधकाम करण्याचा प्रकार घडल्याने याची गंभीर दखल किनारी नियामक क्षेत्र, वन खाते, कृषी खाते आणि महसूल खात्याने घेऊन दोषींवर फौजदारी कारवाई करण्याची गरज आहे. हा प्रकार असाच सुरू राहिल्यास खाजन शेती पूर्णता नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. तसेच या बांधकाम त्वरित जमीनदोस्त करून संदेश पाठवण्याची आवश्यकता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.