पणजी: दोनापावला आणि म्हापसा दरोडा प्रकरणी पकडलेले संशयित ‘सहामाही’ पद्धतीने काम करत असल्याचे तपासात उघड झाले आहे. दरोडा टाकल्यानंतर ते सहा महिन्यांसाठी बांगलादेशात पसार होत असत. एवढेच नव्हे, तर गोव्यात दरोडे टाकण्यासाठी त्यांनी कोलवाळ कारागृहातच टोळी तयार केली होती, अशी धक्कादायक माहिती पोलिस तपासातून पुढे आली आहे.
पोलिस महासंचालक आलोक कुमार व गुन्हे शाखेचे अधीक्षक राहुल गुप्ता यांनी शुक्रवारी पोलिस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने पकडलेल्या सहा संशयितांपैकी पाच जणांचा ताबा राज्याच्या गुन्हे शाखेला मिळाला असून, त्यांच्याकडून दरोड्यातील चोरीचा ऐवज हस्तगत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दोनापावला येथील दरोड्यानंतर संशयित बांगलादेशात पळून गेले. त्यानंतर पुन्हा भारतात येऊन त्यांनी
म्हापसा, गणेशपुरी येथे दरोडा टाकला. एक गुन्हा केल्यानंतर सहा महिन्यांसाठी बांगलादेशात जाऊन लपून बसायचे आणि नंतर भारतातील दुसऱ्या भागाची गुन्ह्यासाठी निवड करायची, अशी त्यांची कार्यपद्धती असल्याचे चौकशीत समोर आले आहे.
गेल्या वर्षी दोना पावला आणि म्हापसा येथील गणेशपुरी येथे झालेल्या दोन मोठ्या दरोड्यांच्या प्रकरणात दिल्लीत अटक करण्यात आलेल्या सहा संशयितांपैकी पाच बांगलादेशी संशयितांना गोवा पोलिसांनी गुरुवारी गोव्यात आणले आहे.
या टोळीने मेघालय सीमेवरून भारतात बेकायदेशीर प्रवेश केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असल्याची माहिती पोलिस महासंचालक आलोक कुमार यांनी दिली आहे. या दरोडेखोरांची गुन्हे करण्याची पद्धत अत्यंत नियोजनबद्ध होती. कोणत्याही ठिकाणी दरोडा टाकण्यापूर्वी संशयित दोन ते तीन दिवस त्या भागाची बारकाईने रेकी करत असत. त्यानंतर संबंधित कुटुंब गाढ झोपेत असल्याची खात्री पटल्यावरच ते घरात प्रवेश करत. घरातील सदस्यांना बांधून ओलीस ठेवल्यानंतर ते दरोडा टाकत असत, असेही तपासात उघड झाले आहे.
दरोड्यासाठी लागणारी शस्त्रे स्थानिक बाजारपेठेतून खरेदी केली जात होती. रहिवाशांना घाबरवण्यासाठी व प्रतिकार झाल्यास हल्ला करण्यासाठी संशयित सज्ज असत. गुन्ह्यादरम्यान ते कुटुंबातील सदस्यांना मारहाण करून बांधून ठेवत आणि त्यानंतर सोन्याचे दागिने व इतर मौल्यवान वस्तू लंपास करत असत.
टोळीचा म्होरक्या नूर इस्लाम उर्फ नदीम खान हा सराईत गुन्हेगार असून, २०२३-२४ मध्ये कोलवाळ कारागृहात एटीएम फोडल्याप्रकरणी तो २२ दिवस तुरुंगात होता. त्यानंतर त्याला इतर प्रकरणात आंध्र प्रदेशात हलविण्यात आले. तेथे जामिनावर सुटल्यानंतर तो पुन्हा गोव्यात आला आणि या दरोड्यांत सहभागी झाला. २०२२ पासून गोव्यात असल्याने त्याला येथील भौगोलिक परिस्थितीची चांगली माहिती होती.
पोलिसांच्या तांत्रिक पाळतीपासून (सीसीटीव्ही, फोन टॅपिंग) वाचण्यासाठी ही टोळी मोबाईल फोन किंवा रेडिओचा वापर टाळत असे. ते २-३ जणांच्या लहान गटात हालचाल करत आणि ठराविक ठिकाणी एकत्र येऊन पुढील कारवाईचे नियोजन करत असत.
तपासादरम्यान या टोळीची कार्यपद्धती समोर आली. दरोड्यापूर्वी टोळीतील सदस्य लक्ष्य केलेल्या परिसराची बारकाईने रेकी करत. ते जवळच्या निर्जन किंवा जंगल भागात १-२ दिवस मुक्काम करून रहिवाशांच्या हालचालींचे निरीक्षण करत असत. घरातील सदस्यांची संख्या आणि घरात प्रवेश करण्याचा सर्वात सोपा मार्ग याचा अंदाज घेतल्यानंतरच ते दरोडा टाकत असत.
संशयितांचा शोध घेण्यासाठी गोवा पोलिसांची पथके बेळगाव, विजयपूर, बेंगळुरू, हैदराबाद, कोलकाता, दिल्ली, गुवाहाटी, त्रिपुरा आणि मेघालय येथे पाठवण्यात आली होती. दिल्ली गुन्हे शाखेने १४-१५ एप्रिल २०२६ च्या रात्री सहा जणांना अटक केली. त्यानंतर गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने सुमारे ३० तासांचा प्रवास करून पाच संशयितांना ट्रान्सफर वॉरंटवर गोव्यात आणले.
संशयितांना ३० एप्रिल २०२६ रोजी मेरशी न्यायालयात हजर केले असता, त्यांना ११ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिस महासंचालक आलोक कुमार व पोलिस महानिरीक्षक केशव राम चौरसिया यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे अधीक्षक राहुल गुप्ता, पोलिस निरीक्षक दत्तागुरू सावंत, किशोर रामानन, महेश गडेकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. जीवबा दळवी व तुषार लोटलीकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी सांगितले की, हे सर्व संशयित बांगलादेशातील बागेरहाट जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यामुळे त्यांच्यावर ‘फॉरेनर्स ॲक्ट २०२५’ अंतर्गतही गुन्हे नोंदवले जाणार आहेत. दिल्लीतून गोव्यात आणलेल्या संशयितांमध्ये मोहम्मद नासिर, नूर इस्लाम उर्फ नदीम खान, मोहम्मद सैफुल इस्लाम, सोहेल खान आणि मोहम्मद सुमन हवलदार यांचा समावेश आहे. यापूर्वी या प्रकरणात मदत करणाऱ्या महमूद (सहारनपूर, उत्तर प्रदेश), राजू बी व सफीकुल (दोघेही बेंगळुरू) यांना ऑक्टोबर २०२५ मध्ये अटक करण्यात आली होती.
२० एप्रिल २०२५ : दोनापावला येथील बंगल्यात दरोडा
७ ऑक्टोबर २०२५ : म्हापसा, गणेशपुरी येथील निवासस्थानी दरोडा
गुप्ता यांनी सांगितले की, गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे जप्त करणे आणि चोरीचा मुद्देमाल हस्तगत करणे हे आता मुख्य आव्हान आहे. तसेच या टोळीला स्थानिक पातळीवर कोणी मदत केली का, याचाही शोध सुरू आहे. झाकीर हुसेन हा दिल्ली पोलिसांच्या कोठडीत असून, कायदेशीर प्रक्रियेनंतर त्यालाही गोव्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.