डिचोली: डिचोलीतील आमठाणे धरणावर अवलंबून असलेल्या जनतेसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. या धरणावरील गेट बसविण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, पुढील सात ते आठ दिवसांत ते पूर्ण होण्याची शक्यता आहे.
जलस्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी देखील हे काम येत्या २० ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. अंतिम टप्प्यातील काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. वेगवेगळ्या कारणांवरून लांबणीवर पडलेले हे दुरुस्तीकाम पूर्ण कधी होणार, याची सर्वांना प्रतीक्षा लागून राहिली आहे.
दरम्यान, दुरुस्तीकाम पूर्ण झाले नसले तरी धरणात मात्र आता समाधानकारक जलसाठा आहे. रविवारी धरणातील जलसाठ्याची पातळी ४६.५ मीटरच्या आसपास होती.
आमठाणे धरणावरील दुरुस्ती काम गेल्या जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करुन धरणात पुन्हा जलसाठा करण्याचे जलसंपदा खात्याने नियोजन केले होते.
मात्र जुलै महिन्यात दुरुस्तीकाम पूर्ण करण्यात खात्याला यश आले नाही. त्यामुळे धरणात जलसाठा करण्याचे कामही लांबणीवर पडले होते.
गेल्या १४ जुलै रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत एका कार्यक्रमानिमित्त मेणकुरे येथे आले असता आमठाणे धरणाला धावती भेट देऊन संबंधित कंत्राटदारांकडून कामाचा आढावा घेतला होता. हे काम जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता.
त्यापूर्वी जलसंपदा खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांनीही तसा विश्वास व्यक्त केला होता. मात्र जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत हे काम पूर्ण करणे शक्य झाले नाही.
त्यानंतर हे काम पूर्ण करण्यास आणखी चार-पाच दिवस लागतील, असे मंत्री शिरोडकर यांनी स्पष्ट केले होते. तरीही धरणावरील दुरुस्तीकाम वेगवेगळ्या कारणांमुळे लांबणीवर पडत गेले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.