पणजी: मतदारांच्या विशेष सखोल फेरतपासणीअंतर्गत (एसआयआर) ३० नोव्हेंबरपर्यंत ११, ८५,०३४ मतदारांंपैकी ९६.०५ टक्के म्हणजेच सुमारे १०.५५ लाख मतदारांचे अर्ज जमा झालेले आहेत. सुमारे ९० हजार मतदारांचे अर्ज अद्याप परत आलेले नसून, अशा मतदारांची नावे मसुदा यादीत समाविष्ट केली जाणार नाहीत.
शिवाय २.२० लाख मतदारांची नावे २००२ च्या यादीत नसल्याने त्यांच्याबाबत सुनावणी घेऊनच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे मुख्य निवडणूक अधिकारी संजय गोयल यांनी स्पष्ट केले.
रविवारी पत्रकार परिषदेत गोयल बोलत होते. ज्या ९० हजार मतदारांनी अर्ज परत केलेले नाहीत, त्यांचा समावेश अनुपस्थित, स्थलांतरीत, मृत आणि बोगस (एएसडीडी) या श्रेणीत करण्यात आलेला आहे.
त्यामुळे येत्या ९ डिसेंबर रोजी जारी होणाऱ्या मसुदा यादीत अशा मतदारांच्या नावांचा समावेश नसेल, असे गोयल यांनी सांगितले. अशा मतदारांची नावे ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने जाहीर केली जातील.
त्यातील ज्या मतदारांना आपले नाव चुकीच्या पद्धतीने काढल्याचे वाटत असेल तर, त्यांना ७ फेब्रुवारीपूर्वी ‘अर्ज ६’ भरून देण्यासह घोषणापत्रही सादर करावे लागेल. त्यांनी सादर केलेली कागदपत्रे सत्य असल्याचे सिद्ध झाल्यास त्यांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट केली जातील, असे ते म्हणाले.
‘एसआयआर’अंतर्गत आतापर्यंत जे १०.५५ लाख मतदारांचे अर्ज जमा झालेले आहेत, त्यातील २.२० लाख जणांची नावे २००२ च्या मतदारयादीत समाविष्ट नसल्याचे दिसून आले आहे. तरीही या मतदारांची नावे जिल्हा पंचायतीच्या मतदार यादीत असतील, तर त्यांना येत्या २० डिसेंबरला होणाऱ्या जिल्हा पंचायत निवडणुकीत मतदान करता येणार असल्याचेही संजय गोयल यांनी नमूद केले.
बारा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये राबविल्या जात असलेल्या ‘एसआयआर’ ला केंद्रीय निवडणूक आयोगाने एका आठवड्याची मुदतवाढ दिली आहे. नव्या कार्यक्रमानुसार अंतिम मतदारयाद्या १४ फेब्रुवारी २०२६ या दिवशी प्रकाशित केल्या जाणार आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.