नवी दिल्ली: विराट कोहली व त्याचा व्यावसायिकपणा सर्वश्रुत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेआधी आपला फलंदाजी फॉर्म कायम राहावा यासाठी त्याने विजय हजारे करंडकातील आणखी एका सामन्यात खेळण्याला प्राधान्य दिले आहे. दिल्ली क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहन जेटली यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, विराट कोहली दिल्ली संघासाठी विजय हजारे करंडकातील तिसरा सामना खेळणार आहे.
बीसीसीआयकडून भारतीय संघातील खेळाडूंना विजय हजारे करंडकातील किमान दोन लढती खेळणे अनिवार्य करण्यात आले. यानंतर भारतीय संघातील सर्वच खेळाडू विजय हजारे करंडकात खेळताना दिसत आहेत.
विराट कोहली याने पहिल्या दोन लढतींमध्ये दिल्ली संघाचे प्रतिनिधित्व केले. या दोन लढतींत त्याने अनुक्रमे १३१ धावा व ७७ धावा केल्या. या दोन्ही लढतींत त्याने चमकदार खेळ केला. याचसोबत त्याने ३३० डावांमध्ये लिस्ट ए क्रिकेटमधील १६ हजार धावांचा टप्पाही ओलांडला. विराट कोहली विजय हजारे करंडकातील ६ जानेवारी रोजी होत असलेल्या रेल्वेविरुद्धच्या लढतीत दिल्ली संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
ही लढत खेळून झाल्यानंतर तो न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी रवाना होईल. भारत-न्यूझीलंड यांच्यामधील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला ११ जानेवारीपासून सुरुवात होत आहे. या मालिकेसाठी भारतीय खेळाडू ८ जानेवारीला बडोदे येथे एकत्रित येणार आहेत. विराट कोहली त्याआधीच तेथे पोहोचणार असून, सराव करणार आहे.
बीसीसीआयच्या संघ व्यवस्थापनाकडून जसप्रीत बुमरा व हार्दिक पंड्या या दोन खेळाडूंना विश्रांती देण्यात आलेली आहे. भारत व श्रीलंका या देशांमध्ये पुढल्या वर्षी टी-२० विश्वकरंडकाचे आयोजन करण्यात येत आहे. त्यामुळे त्याआधी दोन खेळाडूंना विश्रांती देण्यात आलेली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.