Gautam Gambhir on Defeat Responsibility: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाचा अत्यंत निराशाजनक पराभव झाला. गुवाहाटी येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताला 408 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागला. केवळ सामन्यातील पराभवच नव्हे, तर धावांच्या दृष्टीने कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील भारताचा हा सर्वात मोठा पराभव ठरला. दुसरीकडे, या विजयासह दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा कसोटी मालिकेत क्लिन स्वीप केला. टेंबा बावुमाच्या नेतृत्वाखालील आफ्रिकेने तब्बल 25 वर्षांनंतर टीम इंडियाचा त्यांच्याच मायदेशात कसोटी मालिकेत हरवण्याचा पराक्रम केला.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका गमावल्यानंतर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने (Gautam Gambhir) मोठे विधान केले. गंभीरने माध्यमांशी बोलताना स्पष्टपणे सांगितले की, "पराभवाची जबाबदारी सगळ्यांची आहे, पण सर्वात आधी ती माझी आहे." त्याने संघाच्या कामगिरीची संपूर्ण जबाबदारी स्वतःवर घेतली. विराट कोहली, रोहित शर्मा आणि आर. अश्विन या दिग्गजांनी कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर टीम इंडिया 'ट्रान्झिशन' मधून जात आहे. याबद्दल बोलताना गंभीर म्हणाला, "मला 'ट्रान्झिशन' हा शब्द आवडत नाही. मी येथे बहाणे सांगण्यासाठी आलेलो नाही. युवा खेळाडू शिकत आहेत आणि त्यांना वेळ देणे गरजेचे आहे."
मालिकेत पराभव झाला असला तरी प्रशिक्षक गंभीरने टीम इंडियाला (Team India) याच वर्षात मिळवलेल्या यशाची आठवण करुन दिली. गंभीर म्हणाला, ''याच वर्षी भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कप जिंकला. तसेच, इंग्लंडमध्ये कसोटी मालिकाही ड्रॉ केली. मी तोच प्रशिक्षक आहे ज्याच्या मार्गदर्शनाखाली भारताने इंग्लंडमध्ये चांगले प्रदर्शन केले, चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आणि आशिया कपही जिंकला."
गुवाहाटी कसोटीत दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियासमोर 549 धावांचे विशाल लक्ष्य ठेवले होते. पाचव्या दिवशी टीम इंडियाचा दुसरा डाव 63.3 षटकांत केवळ 140 धावांवर संपुष्टात आला. याचसह दक्षिण आफ्रिकेने मालिका 2-0 ने जिंकली. या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 489 धावा केल्या, तर टीम इंडिया केवळ 201 धावांवर ऑलआउट झाली. आफ्रिकेने आपला दुसरा डाव 5 बाद 260 धावांवर घोषित करुन भारताला जवळपास अशक्य असे लक्ष्य दिले.
दुसऱ्या डावात भारताकडून फक्त अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने काहीसा संघर्ष केला. त्याने 87 चेंडूंमध्ये 54 धावांची अर्धशतकीय खेळी खेळली. दक्षिण आफ्रिकेचा ऑफ-स्पिनर सायमन हार्मर याने कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करताना दुसऱ्या डावात 37 धावांत 6 बळी घेतले आणि संपूर्ण सामन्यात त्याने एकूण 9 विकेट्स घेतल्या. टीम इंडियाचा हा सर्वात मोठ्या धावांच्या फरकाने झालेला पराभव असून गौतम गंभीरने ही जबाबदारी स्वीकारली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.