जेव्हा आपणास कोणतीही गोष्ट सहज उपलब्ध होते तेव्हा त्याची किंमत आपणाला कळत नाही आणि उलट एखादी गोष्ट मिळवण्यासाठी जिवाचे रान करावे लागते तेव्हा त्याचे महत्त्व कळते. आज विज्ञानाच्या प्रगतीने अनेक सुविधा सहजपणे उपलब्ध झाल्या आहेत. पण यामागचे पूर्वसुरींचे अथक प्रयत्न आपण विसरून जातो. विज्ञान हे दुधारी शस्त्र आहे. त्याचा योग्य गोष्टीसाठी उपयोग केला तर ते वरदान ठरते आणि दुरुपयोग केला तर ते शाप ठरते.
उदाहरणार्थ अणू संशोधन हे जसे वीज निर्मितीसाठी उपयुक्त ठरते तसे ते विध्वंसक अणूबॉम्बसाठीदेखील वापरले जाऊ शकते. दूरध्वनीची जागा भ्रमणध्वनीने घेतली आणि जग जणू माणसाच्या मुठीत आले. त्वरित संदेश वहन हा प्रमुख उद्देश दूरध्वनीचा होता. परंतु केवळ संदेश वहन हा या संयंत्राचा उपयोग आता राहिलेला नाही तर अनेक फायदे यातून मानवाला मिळाले. एरवी दगदगीची वाटणारी कामे या उपकरणाद्वारे चुटकीसरशी होऊ लागली. सरकार दरबाराची अनेक कामे, बँकेची देवाणघेवाण घरबसल्या होऊ लागली. मात्र याचा दुसरा वाईट परिणाम असा झाला की ठग लोकांच्या हाती फसवणुकीचे आयते साधन लागले.
खोटे फोन कॉल करून लोकांना लुबाडणे, धमकी देणे हे प्रकार वाढले. फेसबुकवर खोट्या जाहिराती देऊन बोगस मालाची विक्री करणे हे प्रकार वाढले. रोलेक्ससारखी महागडी मनगटी घड्याळे, ओम्रोन कंपनीचे ग्लूकोमीटर यांच्या सारखी उत्पादने फेसबुकवर दाखवून ग्राहकांना बोगस माल पाठवला जातो. रोलेक्स घड्यालाऐवजी लहान मुलांच्या खेळण्यातील घड्याळ, ग्लूकोमीटरऐवजी चारकोल क्रीमची ट्यूब पाठवली जाते आणि या वस्तू परत करण्याची सुविधा उपलब्ध नसते.
कारण त्यासाठी दिलेले फोन नंबर, ई-मेल आयडी हे फसवे असतात. केंद्र सरकारने आधार कार्ड, बँक खाते या सर्व गोष्टीना भ्रमणध्वनी क्रमांक जोडण्याची सक्ती केलेली असल्याने एखाद्याच्या खात्यातील जमापुंजी गायब केली जाऊ लागली. अशा गुन्ह्यांचा तपास लागणे हे मोठे जिकिरीचे आणि गुंतागुंतीचे काम असते. यामुळे जे आर्थिक नुकसान होते ते भरून मिळणे कठीणच! माणूस अधिक लोभी बनत चालला आहे आणि भामट्यांना सरकारी कायद्याची भीती उरलेली नाही. जीवनावश्यक वस्तूत भेसळ करून अधिक फायदा मिळवण्याकडे व्यापारी वर्गाचा कल राहिला. पूर्वी गवळी लोक दुधात पाणी घालून दूध विक्री करीत असत पण आता घातक द्रव्ये मिसळून दूध विक्री होते.
बाजारात मिळणारी फळे व भाज्या, अन्नधान्य यावर घातक द्रव्यांचा मारा करून विकली जातात. मासे ताजे दिसावेत म्हणून त्याच्यावर फोर्मेलीन शिंपडले जाते, मांस विक्रीतही अशीच भेसळ केली जाते. धान्याचे उत्पादन वाढावे आणि झटापट पीक यावे यासाठी रासायनिक खतांचा वापर केला जातो. केळी, आंबे, कलिंगड, पपई, सफरचंद, द्राक्षे ही फळे रासायनिक द्रव्याचा वापर करून लवकर पिकवली जातात आणि अधिक भावाने विकली जातात अशा वस्तूंच्या वापराने कर्करोगासारखे घातक रोग उपभोक्त्याला जडतात, अनेकांचे जीव जातात परंतु लोभी विक्रेत्यांना त्याचे कोणतेही सोयरसुतक नसते. खूपच कहर होतो तेव्हा सरकार जागे होते आणि संबंधितावर कारवाई होते. परंतु तोपर्यंत अनेकांचे जीव गेलेले असतात, भरून न निघणारे आर्थिक नुकसान झालेले असते.
ऑनलाइन फसवणुकीचा दिवसेंदिवस विस्तार होत आहे. अगदी दूरगामी खेड्यापर्यंत याचा विस्तार झाला आहे. जितका या व्यवसायाचा विस्तार झाला तितके फसवणुकीचे प्रकार वाढले. १९६२साली प्रख्यात लेखक प्र. के. अत्रे यांनी ‘तो मी नव्हेच’ हे एका सत्यघटनेवर आधारित नाटक लिहिले होते. नटवर्य प्रभाकर पणशीकर यांनी ते रंगभूमीवर आणले होते. १९८८साली सचिन पिळगावकर, अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे या मराठीतील सुपरहिट अभिनेत्यांचा ‘अशी ही बनवाबनवी’ हा विनोदी चित्रपट प्रदर्शित झाला होता. एक मनोरंजनाचा भाग म्हणून त्याच्याकडे पाहिले गेले. हा फसवणुकीचा प्रकार आहे. शेतकऱ्यांना कर्ज देऊन त्यांच्या जमिनी हडप करणारे सावकार याच पठडीत येतात. बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले आणि सावकारांच्या फासातून गरीब शेतकऱ्यांची सुटका झाली.
मध्यमवर्गीय सेवानिवृत्त व्यक्ती अशा या फसव्या जाहिरातीच्या फासात अडकतात. कमी दिवसात अधिक व्याज किंवा परतावा देण्याच्या जाहिरातीत ही निवृत्त मंडळी फसते आणि आपली कष्टाची कमाई गमावून बसते. परदेशात नोकरी देण्याचे आमिष दाखवून तरुणांना फसवले जाते. अलीकडे असे अनेक गुन्हे समोर येत आहेत. सरकारने यासाठी वेगळी तपासयंत्रणा सुरू केली आहे. याला सायबर कक्ष म्हटले जाते. परंतु अपराधी इतके सराईत झाले आहेत की ते आपला माग लागणार नाही याची पुरेपूर काळजी घेत असतात आणि सापडले तरी त्यांच्याकडून गमावलेली रक्कम परत मिळणे मुश्कील असते. हे गुन्हेगार इतके निर्ढावलेले असतात की तुरुंगात जाण्याची भीती त्यांना वाटत नाही. काही वर्षे तुरुंगाची हवा खाऊन ते बाहेर येतात आणि पुन्हा आपला फसवाफसवीचा धंदा वेगळ्या स्वरूपात, वेगळ्या नावाने सुरू करतात. यासाठी सतर्क राहणे आणि कोणत्याही आमिषाला बळी न पडणे हाच उपाय आपल्या हाती उरतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.