मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेट यांची आज एकशेसाठावी पुण्यतिथी. त्यानिमित्त त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारा हा लेख. जगन्नाथ शंकरशेट यांचा जन्म १० फेब्रुवारी १८०३ रोजी सावकार असलेल्या शंकरशेट बाबुलशेट मुर्कुटे घराण्यात झाला. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मास आलेल्या जगन्नाथचे मातृछत्र चौथ्या वर्षीच हरपले. पित्यानेच त्यांचे संगोपन केले.
वयाच्या अठराव्या वर्षी पितृछत्रही हरपले आणि ऐन तारुण्यात भल्या मोठ्या उद्योग व्यवसायाची आणि कुटुंबाची धुरा त्यांना सांभाळावी लागली. पण जन्मजात कुशाग्र बुद्धी, दूरदृष्टी आणि प्रगल्भतेचे वरदान त्यांना प्राप्त झाले होते. त्याचा त्यांनी मुंबईचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कुशलतापूर्वक वापर केला. त्यांनी तन, मन, धन समाजासाठी अर्पण केले होते म्हणूनच ते जनतेच्या विश्वासास पात्र ठरले. आणि मुंबईकराचे लाडके ‘नाना’ बनले.
गव्हर्नर एल्फिन्स्टन यांनी १८२२मध्ये सर्वप्रथम शाळा सुरू केली. नानांच्या विश्वासावर लोक मुलांना शाळेत पाठवू लागले. त्या काळात मुलींना शिक्षण देण्यास प्रचंड विरोध होता. देशतील ऐतिहासिक स्त्रीशिक्षणाची सुरुवात करत नानांनी मुंबईत पहिली मुलींची शाळा ०१ ऑक्टोबर १८४३ रोजी सुरू केली. आजही ती शाळा चालू आहे.
त्यानंतर मुंबईच्या वेगवेगळ्या भागात मुलींच्या सात शाळा सुरू केल्या. मुंबईत मॅडिकल कॉलेज सुरू व्हावं ही नानांची तीव्र इच्छा होती. दिवंगत झालेले सर रॉबर्ट ग्रँट याच्या स्मरणार्थ १८४५ मध्ये ग्रँट मेडिकल कॉलेज सुरू केले. त्या काळात न्यायदानाची जबाबदारी पूर्णपणे इंग्रजाकडे होती. त्यासाठी आपले देशी वकील तयार झाले पाहिजेत यासाठी नानांनी लॉ कॉलेज सुरू केले.
नानांनी १८५०साली गिरगाव भागात अल्प फी मध्ये जीवनोपयोगी शिक्षण देण्यासाठी ‘जगन्नाथ शंकरशेट स्कूल’ सुरू केलं. या शाळेस ‘नानांची इंग्रजी मराठी शाळा’ म्हणत. या शाळेचा सर्व खर्च नाना शंकरशेट करीत. नानांनी पुढाकार घेऊन जे. जे. हॉस्पिटल आणि जे. जे. स्कूल ऑफ आर्टस या दोन लोकोपयोगी संस्था उभारल्या ज्या आजपर्यंत जनतेची सेवा करीत आहेत.
नानाच्या कर्तृत्वाचा इतिहास भारतीय रेल्वेच्या स्थापनेसाठी केलेल्या कार्याशिवाय पूर्ण होत नाही. या रेल्वेमागे नानाची कल्पकता, दूरदृष्टी, संघर्ष दडलेला आहे. नाना शंकरशेट हे १९व्या शतकातील भारतातील एक द्रष्टे उद्योजक, समाज-सुधारक होते. १८५३ साली मुंबई ठाणे सुरू झालेली रेल्वे भारताच्या क्रांतिकारक विकासाचा पाया होता.
त्यातूनच मुंबई महाराष्ट्राचीच नव्हे तर भारताची महानगरी बनली. अशा थोर महापुरुषाचे नाव मुंबई सेंट्रल स्टेशनला देण्यासाठी जनतेला आंदोलन करावे लागते हा जीवनभर मुंबईच्या विकासासाठी समर्पित झालेल्या महापुरुषाचा घोर अपमान नव्हे का? केंद्र सरकार अजूनही निद्रावस्थेतच आहे. नानांच्या १६०व्या पुण्यतिथीनिमित्त आदरपूर्वक नमन करून प्रार्थना करते की, सरकारला लवकरच सुबुद्धी देवो आणि मुंबई सेंट्रलचे नामांकन जगन्नाथ शंकरशेट होऊन नानांचा गौरव होवो!
कृष्णी वाळके
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.