Temple Crowd Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Goa: विकासकामांतून होणाऱ्या फायद्यांसाठी लोक धार्मिक स्थळे ‘बुलडोझर’ फिरवून नष्ट करतात, त्यावेळी काय समजावे ?

Goa Opinion: समर्पण म्हणजे स्वतःला पूर्णपणे एखाद्या धार्मिक, वैज्ञानिक, सामाजिक, राजकीय, वैद्यकीय, कलात्मक, मनोविश्लेषणात्मक उद्देशासाठी वाहून घेतले जाणे.

गोमन्तक डिजिटल टीम

विकास कांदोळकर

समर्पण म्हणजे स्वतःला पूर्णपणे एखाद्या धार्मिक, वैज्ञानिक, सामाजिक, राजकीय, वैद्यकीय, कलात्मक, मनोविश्लेषणात्मक उद्देशासाठी वाहून घेतले जाणे किंवा दुसऱ्यास संपूर्णपणे शरण जाणे. ही भावना निःस्वार्थीपणे बाह्य-कृतीतून व्यक्त होते, तसेच व्यक्तिगत बऱ्या-वाईट, इच्छा-आकांक्षांच्या त्यागामुळे अंतःकरणातून उमलते.

कर्तव्यपूर्ती, आत्मानंदाबरोबरच जीवनानुभव अर्थपूर्ण होण्यास समर्पण कलेतून मदत होते. यश मिळवण्याच्या प्रक्रियेत कोणत्याही क्षेत्रात सर्वोच्चत्व प्राप्त करण्यासाठी समर्पण अनिवार्य आहे. संकटकाळी समर्पणाची खरी परीक्षा होते. समर्पित व्यक्ती, जीवनातील अपरिहार्य अडथळ्यांवर, कोणत्याही परिस्थितीत मात करून, समर्पणाच्या उच्चतम भावनेतून आत्मविकास किंवा समाजकल्याण साधताना दिसतात.

भारतात समर्पित वृत्तीने साजरे होणारे सण आणि उत्सवांना अनन्यसाधारण महत्त्व दिले गेले आहे. नवरात्र, गणेशोत्सव, दिवाळी, कुंभमेळा, रथोत्सव तसेच अनेक धार्मिक यात्रा दरवर्षी लाखो लोकांना आकर्षित करतात. मात्र, या सणांमध्ये होणाऱ्या गर्दीमुळे काही गंभीर समस्या निर्माण होतात. चेंगराचेंगरीच्या घटनांचे अनेकदा दु:खद परिणाम होतात; ज्यामध्ये अपघात, जखमी व मृत्युमुखी होणारे नागरिक, त्यांच्या कुटुंबीयांचे हाल, इत्यादींचा समावेश आहे.

धार्मिक आणि सामाजिक एकजूट, भक्तांचे श्रद्धेने एकत्र येणे, हॉटेल, वाहतूक आणि छोट्या व्यवसायांना फायदा होऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळणे, लोक उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आनंदमय वातावरण बनणे, हे या उत्सवांतील गर्दीचे सकारात्मक पैलू आहेत. पण याच गर्दीचे अनेक तोटेही आहेत. कधी-कधी व्यवस्थापनाच्या अभावामुळे ही गर्दी त्रासदायक ठरते. वाहतूक कोंडीमुळे नागरिक, दुकानदार, वाहनचालक यांना अडचणीचा सामना करावा लागतो. उत्सवाच्या ठिकाणी योग्य नियोजनाअभावी चेंगराचेंगरीच्या घटनांमध्ये प्रशासनाचे अपयश दिसून येते.

देव ही संकल्पना समर्पण श्रद्धेचा विषय असला तरी ती सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोनातूनही अभ्यासली जाते. हजारो लोक मोठ्या भक्तिभावाने देवाच्या दर्शनासाठी एकत्र जमतात, त्यांची श्रद्धा प्रबळ असते.

पण जेव्हा चेंगराचेंगरी होते, जेव्हा निरपराध नागरिक प्राण गमावतात, तेव्हा त्यांच्या श्रद्धेतील देवाचा काहीही उपयोग होत नाही. संकटाच्या वेळी देव प्रकट होऊन संकट दूर करतो असे मानले जाते, पण वस्तुस्थिती पाहिली तर असे होत नाही. वास्तविक, देवाने अशा संकटांमध्ये भक्तांचे रक्षण करायला पुढे यायला नको काय?

हल्ली हे कार्यक्रम धार्मिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक, इ. व्यवस्था मजबूत करण्याचे साधन बनल्याचे दिसून येते. राजकीय नेते, धार्मिक संस्थाचालक आणि मोठे व्यापारी, भक्तांच्या श्रद्धेचा उपयोग करून राजकीय, धार्मिक, आर्थिक आणि सामाजिक फायदा मिळवतात. प्रचंड गर्दी आणि प्रशासनाचा ढिसाळ कारभार यामुळेच चेंगराचेंगरी होते.

Temple

जर श्रद्धा ‘सर्वसमर्थ’ असती, तर अशा दुर्घटना टाळल्या गेल्या असत्या. समाजाने विवेकबुद्धीने विचार करून श्रद्धा आणि वास्तव यात संतुलन साधण्याची गरज आहे. धार्मिक गर्दी ही उत्सवाचा एक भाग असली तरी त्यातून काही धोके निर्माण होतात. यासाठी केवळ श्रद्धेवर विसंबून न राहता वैज्ञानिक आणि व्यवस्थापनात्मक दृष्टिकोन स्वीकारणे गरजेचे आहे. श्रद्धेमुळे लोक संकटात सापडत असतील, तर प्रशासनाने योग्य नियोजन करून ही सामाजिक व्यवस्था सुधारण्याची गरज आहे.

भारतात धर्म आणि राजकारण यांच्यात अतूट नाते आहे. राजकारणी हे समारंभ केवळ श्रद्धेच्या दृष्टिकोनातून न पाहता, त्याचा राजकीय आणि प्रचारात्मक फायदादेखील घेतात, गर्दीत लोकांशी संपर्क साधून आपल्या पक्ष-धोरणांबाबत बोलतात, लोकप्रियता मिळवतात आणि धार्मिक भावनांना हात घालत जनमानसातील स्थान मजबूत करतात.

अनेक राजकीय पक्ष मोठ्या धार्मिक समारंभांद्वारे, विशिष्ट धार्मिक समूहांच्या समर्थनातून आपली मतपेटी मजबूत करतात. सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या प्रचारासाठी अशा कार्यक्रमांमध्ये ‘आपली संस्कृती टिकवावी’ असा संदेश देऊन, ‘धर्म संकटात आहे’ असे भासवून लोकांना एका विशिष्ट दिशेने संघटित करण्याचा प्रयत्न केला जातो. काही वेळा धार्मिक समारंभांमधून समाजात तणाव निर्माण होतो. काही पक्ष विशिष्ट समुदायांच्या भावना भडकावून राजकीय फायदा घेतात आणि सामाजिक विभाजन वाढवतात. हे तंत्र निवडणुकांमध्ये विशेषतः प्रभावी ठरते.

मोठ्या धार्मिक सोहळ्यांमधील दान-देणग्यांमध्ये काही राजकीय मंडळी हस्तक्षेप करून आर्थिक फायदा मिळवतात. तसेच, व्यापारी-उद्योजक प्रायोजकत्व देऊन राजकीय संबंध मजबूत करतात.

धार्मिक स्थळे किंवा यात्रेच्या सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर सरकारी निधी अयोग्यपणे वापरतात. ज्यावेळी रस्ते—पूल-विमानतळ सारख्या विकासकामांतून मिळणाऱ्या प्रचंड फायद्यांसाठी, हेच लोक धार्मिक स्थळे ‘बुलडोजर’ फिरवून नष्ट करतात, त्यावेळी काय समजावे ?

वर्तमानकाळात भारतातील धार्मिक मेळावे केवळ श्रद्धेची केंद्रे राहिली नसल्याचे, त्यांच्या राजकीय फायदा घेण्याच्या प्रयत्नातून दिसून येते. धर्माचा आणि राजकारणाचा हा अतिव्यवहार सामाजिक व्यवस्थेसाठी हितकारक नसून जनतेने याबाबत सतर्क राहून विवेकबुद्धीने फरक करणे योग्य नव्हे काय?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chodan Bridge: चोडणवासीयांची 33 वर्षांची प्रतीक्षा संपली! 'चोडण पुला'साठी 274.83 कोटींची निविदा, तीन वर्षांत पूर्ण होणार पूलाचं बांधकाम

CM Dev Darshan Yatra: 'मुख्यमंत्री देवदर्शन यात्रे'साठी दहा कोटी रुपयांची तरतूद! मंत्री फळदेसाई यांची माहिती

Arpora Nightclub Fire: 'बर्च क्लब'च्या मालकाचे आणखी काही कारनामे चर्चेत, 'मेझन्स रिसॉर्ट'च्या अग्निशमन 'NOC'चा गैरवापर; चौकशीतून माहिती उघड

South Goa Accident Cases: 'दक्षिणे'त अपघातांचे प्रमाण घटले, 2024 च्या तुलनेत 2025 काहीसे दिलासादायक

Sanjivani Sugar Factory: 'संजीवनी'च्या पुनरुज्जीवन प्रक्रियेला गती, निविदा मुदत 5 फेब्रुवारीपर्यंत वाढवली; प्रकल्पासाठी 4 कंपन्यांकडून उत्सुकता

SCROLL FOR NEXT