

Rohit Sharma Brand Ambassador: टी-20 विश्वचषक स्पर्धेचा थरार 10 वर्षांनंतर पुन्हा एकदा भारतात अनुभवायला मिळणार आहे. 2026 टी20 विश्वचषक स्पर्धेचे संयुक्त आयोजन भारत आणि श्रीलंका करत आहेत. या मोठ्या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) दिग्गज खेळाडू रोहित शर्माला आपला 'ब्रँड ॲम्बेसेडर' म्हणून निवडले. आयसीसीचे चेअरमन जय शहा यांनी यासंबंधीची अधिकृत घोषणा केली. रोहितने नुकतीच टी20 फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याच्याच नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2024 चा विश्वचषक जिंकला. आता 'ब्रँड ॲम्बेसेडर' म्हणून त्याची ही नवी इनिंग सुरु होत आहे.
2024 टी20 विश्वचषकात भारतीय संघाला विजेतेपद मिळवून देण्यात कर्णधार रोहित शर्माच्या फलंदाजीचा मोठा वाटा होता. रोहित हा टी20 विश्वचषक 2024 मध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा (257) करणारा खेळाडू होता. त्याने 8 सामन्यांमध्ये 1 वेळा नाबाद राहून 257 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 156.70 इतका होता. त्याच्या बॅटमधून 3 अर्धशतके आणि सर्वोत्तम 92 धावांची खेळी आली होती. संपूर्ण स्पर्धेचा विचार केल्यास, अफगाणिस्तानच्या रहमानुल्लाह गुरबाज (281) नंतर रोहित शर्मा (257) ने सर्वाधिक धावा केल्या होत्या. रोहित वगळता 2024 विश्वचषकात भारताच्या एकाही फलंदाजाला 200 धावांचा टप्पा पार करता आला नव्हता.
टी20 आंतरराष्ट्रीय फॉर्मेटमध्ये कर्णधार म्हणून रोहित शर्माचा रेकॉर्ड अत्यंत प्रभावी आहे. रोहितने 2017 मध्ये भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवण्यास सुरुवात केली. त्याने भारतासाठी एकूण 62 सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले, ज्यात टीम इंडियाने तब्बल 49 सामन्यांमध्ये विजय मिळवला आणि केवळ 12 सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला. तर एक सामना अनिर्णित राहिला. कर्णधार म्हणून त्याचा विजयाचा टक्का 79.03 इतका जबरदस्त होता. रोहित शर्मा याच्यापेक्षा जास्त टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये (71 सामने) फक्त विराट कोहलीने भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळले. मात्र, विजयाच्या टक्क्यामध्ये रोहितचेच वर्चस्व आहे.
रोहित हा टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने 159 सामन्यांमधील 151 डावांमध्ये 32.05 च्या सरासरीने आणि 140.89 च्या स्ट्राइक रेटने 4,231 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 5 शतके आणि 32 अर्धशतके झळकावली. नाबाद 121 धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. रोहितच्या व्यतिरिक्त फक्त विराट कोहली आणि बाबर आझम यांनीच या फॉर्मेटमध्ये 4000 पेक्षा जास्त धावा करण्याचा पराक्रम केला. रोहित शर्माच्या या जबरदस्त अनुभवामुळे आणि विक्रमी कामगिरीमुळेच आयसीसीने त्याला 2026 टी20 विश्वचषकाचा चेहरा बनवले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.