माझ्या गोव्याच्या भूमीत, चाफा पानावीण फुले
भाेळा भाबडा शालीन, भाव शब्दांवीण बाेले
माझ्या गोव्याच्या भूमीत, गड्या साळीचा रे भात,
वाढी आईच्या मायेनं सोनं केवड्याचे हात...
बाकिबाब बोरकरांनी ह्या कवितेंत वरील शब्दांत गोव्यांतल्या आध्यात्म्याचे वर्णन केलंय. आध्यात्म म्हणजे आपुलकी. इथे भरभरून वहाते. अंतरांतली भडकता व भक्ती आम्हाला आमच्यांतल्या प्रेम शांती व आनंद या दैवी गुणांत नेते. मग आशा, ईर्षा, मद, मत्सर, वासना आदी वर्तन करीत नाही. काही अपवाद आहेत, पण गोवेकर आध्यात्मिक आहे, या वर्षात त्याचा मोठा प्रत्यय आला.
गोव्यांतल्या देवळांच्या संख्येत बरीच मोठी वाढ झालीय. आणि ही देवळं आणि ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’, चिन्मय मिशन, ‘ईस्कॉन’ आदि सारख्या आध्यात्मिक संस्थामध्येही अनेक गोवेकर आहेत. देवळांत देवाच्या सुंदर मूर्तीत देव पाहणं आलंच. तिथल्या उत्सवांत भान हरपून रंगून जाणं आलंच. पण या भक्तींतूनही अनेकजण अंगातल्या वाईट वृत्ती सोडतात.
गोव्याच्या पोर्तुगीजांनी गोव्यात व्यसनं आणली आणि दारु, तंबाखू आणि बाहेरख्यालीपणा आदी व्यसने बळावली. पण आज गोवेकर सुसंस्कृत आहे. स्वत:वर आणि मुलांवर चांगले संस्कार करीत आहे. आध्यात्मिकतेत रमलेला आहे. आध्यात्म म्हणजे स्वत:मधल्या देवत्वाचा साक्षात्कार घडणं. मग कृतींत दैवी कार्यच होतं आणि मनांतही शांती, प्रेम, आनंद, करुणा, आदी दैवी गुणच बहरतात.
उदाहरण द्यायचं तर विश्व आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर, सद्गुरु ब्रम्हेशानंदाचार्य स्वामीजी, पर्तगाळ मठाचे श्रीमद् विद्याधीश स्वामीजी, चिन्मयानंद स्वामी आदी अनेक सत्पुरुषांनी सत्संगाच्या माध्यमांतून अनेकांना अंतरांतल्या देवत्वाचा साक्षात्कार घडविला.
आध्यात्मांत साधना आहे, सेवाभाव आहे आणि सत्संग आहे. आध्यात्मिक गुरुंनी आध्यात्मिक साधना ध्यान, सुदर्शन क्रिया, नामस्मरण आदींतून शिकवण दिली. श्रेष्ठ मनशांती मिळाली, दैती गुणांवर दैवी गुणांचा विजय झाला.
देवत्वांत यावं कसं, हे उमगलं. मुख्यत्वे व्यसन मुक्तीचं काम या वर्षात मोठ्या प्रमाणांवर घडलं. मनांतला ताणतणाव जाऊन आनंदाचं भरतं. अनेकांना आलं. माझा माणूस जन्म हे स्वत:मधल्या मानवाला जागं करणं, सेवाभावाला अंतरांत मोठं स्थान द्यावं आणि साधनेबरोबर नामस्मरण, भजन, कीर्तन, आदिंतून उर्जा घेणं, अनेकजण शिकले. सेवेतून अत्यानंद होतो हे अनुभवलं. ध्यानाच्या श्रेष्ठत्वांत मन आनंदलं.
काही वर्षापूर्वी ‘कोविड’ने अनेकांना पछाडले. अनेकांचा मृत्यूही घडला. पण या वाईट अनुभवांतून कृपेसाठी देवाला किंवा गुरुलां शरण जाणं हा साक्षात्कार घडला.
पण या सरत्या वर्षात अंमली पदार्थ सेवनाचं प्रमाण खूपच वाढलंय. मंदिरांनी आतां देवपूजेबरोबर जास्त मानवसेवा करण्याची गरज आहे. समाजाच्या शिक्षणाची जबाबदारी घ्यावी आणि आरोग्याचीही. सरत्या वर्षात हडफडे येथे जी मोठी दुर्घटना घडली,
त्यासाठी आमच्या समाजाने जबाबदारी घेऊन कार्य करण्याची गरज आहे. गेल्या वर्षात अनेक गोवेकरांनी आपल्या जमिनी दिल्लीवाल्यांना विकल्या. अनेक गोवेकर पोटासाठी लंडनला गेले. कुवेत-दुबई या देशांत तर गोवेकर गेलेच, ह्या आमच्या गोव्याच्या खऱ्या उत्कर्षासाठी सर्वांनी येथे आपल्या पद्धतीने यावर्षी योगदान द्यावे.
डॉ. व्यंकटेश हेगडे
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.