गोवा समृद्ध व्हावा, गोमंतकीय सक्षम आणि शिक्षित व्हावेत, हाच ध्यास रवी नाईक यांनी धरला. आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत त्यांनी गोव्याच्या समृद्धतेसाठी घेतलेले धोरणात्मक निर्णय आणि गोमंतकीय सक्षम व्हावेत यासाठी स्विकारलेल्या हितावह धोरणांमुळे आज गोवा सर्व जगावर भारी ठरला आहे, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. रवी नाईक यांच्याकडे कोणतेही खाते येऊ द्या, त्या खात्याचे त्यांनी सोने केलेच म्हणून समजा, एवढी दूरदृष्टी या माणसाकडे होती.
कुळ मुंडकारांच्या हक्कासाठी झगडताना रवी नाईक यांनी अशा पिचलेल्या लोकांना हात देऊन मूळ प्रवाहात आणण्यासाठी मोठे प्रयत्न केले. कुळ मुंडकारांची होणारी गळचेपी, भाटकारशाहीकडून अशा लोकांचे होणारे हनन रोखण्यासाठी रवी नाईक यांनी घेतलेले निर्णय हितावह तर ठरलेच, पण गोव्याच्या समृद्धतेत अशा गांजलेल्या लोकांना समाविष्ट करून घेताना त्यांना मानाने जगण्याचा अधिकार दिला. घरांसाठी जमिनीसाठी आयुष्यभर ढोर कष्ट उपसताना या लोकांना मशाल दाखवण्याचे काम रवी नाईक यांनी केले म्हणूनच तर आज हा घटक मानाने जगतो आहे.
फोंडा पालिकेचा एक नगरसेवक ते राज्याचा मुख्यमंत्री अशी राजकारणात चढती कमान हाशिल करताना आपल्या कार्यतत्परतेची झलक रवी नाईक यांनी राजकीय कारकिर्दीत दाखवून दिली. मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत तर त्यांनी घेतलेल्या कठोर निर्णयांमुळे गोव्याला एक वेगळेच परिमाण प्राप्त झाले. गुंड आणि झुंडशाहीला नेस्तनाबूत करताना गोवा शांत आणि सुखी प्रदेश आहे, हे जगाला दाखवून देताना समाजकंटकांबरोबरच राजकारणी बुरखा पांघरून अनितीच्या मार्गावर चालणाऱ्या राजकीय लोकांनाही गजाआड करण्याचे धाडस त्यांनी दाखवले जे इतरांना जमले नाही. त्यामुळेच तर आजही विरोधक त्यांच्या कार्याची स्तुती करतात.
रवी नाईकांकडे कोणतेही खाते असू दे, या खात्यातून सर्वसामान्यांना काय मिळू शकते, याचा ते नेहमीच विचार करीत आणि त्यानुसार धोरणे ठरवित. आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून अनेक धोरणी निर्णय घेतले. ज्यामुळे या लोकांची मान उंचावली. महिला आणि बाल कल्याण खात्याच्या माध्यमातून मुलांच्या हिताचे निर्णय त्यांनी घेतले. महिलांना विशेषतः स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम आपल्या कारकिर्दीत घेतले, ज्यामुळे महिला आत्मनिर्भर होण्यास मदतच झाली.
पणजी राजधानीत तीस हजार महिलांचा भव्य मेळावा आयोजित करताना फोंड्यात पंधरा हजार महिलांना एकत्रित करण्याची किमया त्यांनी दाखवली. महिलांना एकसंध करताना त्यांच्यातील कलागुणांना वाव कसा मिळेल, त्यांना प्रोत्साहन कसे मिळेल याकडे त्यांनी कटाक्ष ठेवला. महिला आत्मनिर्भर होण्यासाठी त्यांनी पाककलेची दालने खुली केली. पाककला शिकून महिला सुगरण व्हावी, इतरांना पाककलेचे ज्ञान मिळावे यासाठी पाककलेतून शिक्षण देण्याचा अभिनव मार्ग त्यांनी चोखाळला, जो भलताच प्रभावी ठरला. दुर्दैवाने नंतरच्या काळात अशाप्रकारची प्रभावी कामगिरी कुणाकडूनही झाली नाही.
कला संस्कृतीच्या माध्यमातून गोमंतकीयांना प्रोत्साहन मिळावे, आपली कला सादर करण्यासाठी वाव मिळावा यासाठी राज्यात कला संस्कृती खाते रवी नाईक यांनी निर्माण केले. कला संस्कृतीच्या माध्यमातून गोव्याला आणि गोमंतकीयांना नाव मिळवून देण्यासाठी नंतरच्या काळात खूप उपयोगी पडले. गोवा राज्य हे कृषीप्रधान व्हावे यासाठी त्यांनी घेतलेले अनेक निर्णय या क्षेत्राला पूरक असेच ठरले आहे. विशेष म्हणजे राज्याचे कृषी धोरण हे रवी नाईक यांच्याच अध्यक्षतेखाली निर्माण झाले. अशी एक ना दोन कितीतरी खात्यांना त्यांनी न्याय मिळवून दिला. आपल्याकडे असलेल्या खात्यातून इतरांना कसा फायदा होईल, गरीब पिचलेल्या लोकांना हात कसा देता येईल, याचा विचार करून त्यानुसार निर्णय घेणारा हा धोरणी राजकारणी होता.
मराठीच्या आंदोलनावेळी मराठीच्या बाजूने खंबीरपणे उभा राहणारा आणि गोवा महाराष्ट्रात विलीन होण्याच्या मार्गावर असताना त्याला प्रखर विरोध करून गोव्याचे स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवणाऱ्या प्रमुख आंदोलनकर्त्यांत रवींचा समावेश होता. त्यांच्या निधनानंतर अनेकांनी अनेक लेखातून त्यांच्याबद्दलच्या स्मृतींना उजाळा दिला आहे.
रवी नाईक हे एक अजब रसायन होते. इतरांच्या मनातील ओळखून त्याला आपलेसे करण्याची किमया या राजकारण्याकडे होती, म्हणूनच तर एवढी वर्षे ते राजकारणात टिकून राहिले. एक नगरसेवक ते आमदार, खासदार, सभापती, मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री अशी चढती कमान ठेवताना आपल्या राजकीय चाणाक्षतेची झलक त्यांनी गोमंतकीयांना दाखवली. मूळात इतरांप्रती आत्मियता बाळगणारा हा लोकनेता होता, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही.
रवी नाईक कालवश झाले असले तरी त्यांच्या धोरणांमुळे आणि निर्णयांमुळे ते अजरामर ठरले आहेत. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच, खडपाबांध - फोंड्यातील रस्ता फुलून गेलेला सर्वांनी पाहिला आहे.
प्रचंड गर्दीत या लोकनेत्याला अखेरचा निरोप देताना लोकांची झालेली घालमेल सर्वांनी पाहिली आहे. एवढी आत्मियता भाऊसाहेब बांदोडकर सोडल्यास इतर कोणत्याच नेत्याच्या नशिबी आली नाही, हे खुद्द रवी नाईक यांच्याच कार्यकाळातील एका ज्येष्ठ नेत्याचे उद्गार आहेत.
आज रवींचे कार्य पुढे नेण्याची गरज आहे. पालिका क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधताना त्यांनी अनेक उपक्रम साधले, अनेक विकास प्रकल्प उभे केले. ज्यातून आरोग्य, क्रीडा, शिक्षण, कला संस्कृतीच्या उपक्रमांचा समावेश होता. त्यांचे दोन्ही पुत्र रितेश आणि रॉय हे राजकारणात आहेत, त्यांना चांगले भवितव्य आहे, त्यादृष्टीने त्यांची वाटचाल अपेक्षित आहे. रवींना जर आदरांजली वहायची असेल तर पालिका क्षेत्रातील एका बड्या प्रकल्पाला किंवा राज्यातील एका मोठ्या प्रकल्पाला सत्ताधाऱ्यांन या लोकनेत्याचे नाव देऊन त्यांच्या कार्याची युवा पिढीला सातत्याने जाणीव देत राहणे हीच त्यांच्यासाठी खरी आदरांजली ठरेल. जमेल ना हे...!!
- नरेंद्र तारी
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.