डॉ. सचिन तेंडुलकर
Cultural Agriculture Goa:जगात विविध ठिकाणी साजरे होणारे फळांचे उत्सव, फेस्त यामागे स्थानिक कृषिसंस्कृती आणि निसर्गाविषयी असलेला कृतज्ञता भाव आहे. आपले सगळे सण निसर्गबदल, ऋतूबदलाप्रमाणे येतात.
गणपतीसमोर ‘नवें’ ठेवणे असो किंवा मग कणसाचे फेस्त असो. काकडी, केळी, आंबा यांचेही उत्सव होतात. पण, ज्या कुळागरामुळे कृषी संस्कृतीच नव्हे तर गोव्यातील जलस्रोत अद्याप टिकून राहिले आहेत, त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘कुळागर दिन’ साजरा होणे आवश्यक आहे.
राज्यासाठी ‘गोवा वारसा धोरण’ आणि ‘अमृतकाल कृषी धोरण’ जाहीर झाले आहे. जिथे २०० वर्षे जुन्या मानवनिर्मित इमारती वारसा म्हणून पात्र ठरतात, तिथे अनेक कुटुंबांना त्यांच्या उपजीविकेचा आधार व कृषिसंस्कृतीचा मूलाधार असलेली पीक पद्धत मात्र विशिष्ट दिवसाने ओळखली जाण्याइतकी योग्य मानली जात नाही. ‘त्याने काय फरक पडेल?’ असा प्रश्न आपल्यापैकी काहींच्या मनात उत्पन्न होणे साहजिक आहे.
दिवस साजरे करून महत्त्व वाढत नाही, महत्त्व असते म्हणून ते अधोरेखित करण्यासाठी दिवस योजले जातात. संयुक्त राष्ट्रांनी २१ जून रोजी जाहीर केलेला ‘जागतिक योग दिन’ चारपाच दिवसांत साजरा होणार आहे. योग करणारे वर्षभर करतच असतात. पण, योगाशी थेट संबंध नसलेल्यांनाही त्याबद्दल आदर वाटतो, मानवी जीवनातील त्याचे महत्त्व लक्षांत येते.
या धर्तीवर मोठ्या प्रमाणात, भव्यदिव्य दिवस साजरा व्हावा, असे माझे म्हणणे नाही. पण, पोर्गुगीज येथे येऊन त्यांनी खनिज व अन्य व्यवसायांना गोमंतकीयांच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत बनवण्यापूर्वी येथील लोक शेती, कुळागरावरच जगत होते, हे जगाला, किमान पुढच्या पिढीला समजावे एवढा प्रामाणिक हेतू आहे.
कुळागरे ही केवळ उपजीविकेपुरतीच मर्यादित नव्हती, तर ती जलस्रोतांचे व्यवस्थापन, ग्रामरचनेचा आधार व एकूणच गावाच्या शाश्वत विकासाला व आत्मनिर्भर होण्याला मोठा हातभार लावत होती. अर्थव्यवस्था, अन्नव्यवस्था, परिसर प्रदूषणमुक्त ठेवणे, प्राणी-पशु-पक्षी यांचे जीवनचक्र अखंड राखणे, माणसांचे निरामय जगणे, ज्यांच्यापाशी जमीन आहे व जमीन नाही त्यांचेही पोषण करणे, गावचे सौंदर्य राखणे, समाजजीवनाची वीण घट्ट बांधून ठेवणे, हे सगळे या कृषीउत्पादन पद्धतीने हजारो वर्षे सांभाळले.
गोवा हे छोटे राज्य असल्याने ‘कुळागर दिना’च्या माध्यमातून आपल्या कुळागरांना प्रोत्साहन दिल्यास त्याचा अनेक आघाड्यांवर फायदा होईल.
आपल्या कृषी वारशाला महत्त्व प्राप्त होईल, पर्यटनात वैविध्य येईल आणि आपले राज्य पर्यटनासाठी अंतर्गत भाग खुले करणारे होईल. यामुळे कुळागर मालकांना काही अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यास आणि कुळागरातील सेंद्रिय उत्पादने विकण्यास मदत होईल.
पर्यटन, कृषी विकासाचा असा विचार सरकारने नेमलेले गोव्याबाहेरील सल्लागार मांडणार नाहीत, त्यासाठी ‘नीज गोंयकारां’नाच समोर यावे लागेल. आपल्या कुळागरात सुपारींवर औषध फवारणीत व्यग्र असलेला बागायतदारही अभावानेच पुढे सरसावेल. कुळागराशी संबंध असलेले सर्व गोमंतकीयांनी यासाठी पुढाकार घ्यावा व सरकारने ही मागणी गांभीर्याने घेत ‘कुळागर दिन’ जाहीर करावा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.