
वाळपई : एकेकाळी सत्तरी तालुक्याचे कृषीवैभव असलेली पुरण शेती आज इतिहासजमा झाली आहे. त्यामुळे म्हादई नदीच्या तीरावर वास्तव्य करून असलेल्या शेकडो कष्टकरी समाजाच्या तोंडचा घास कायमचा हिरावला गेलाय. सुमारे २७ गावांहून अधिक ठिकाणी ही शेती केली जायची. आता पुन्हा एकदा ही शेती पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न केला जातोय.
शिर-सावर्डे येथील कृष्णा गोविंद सावंत (६१) यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी सुमारे २० ते २५ वर्षांनंतर पुन्हा एकदा पुरण शेती केली आहे. त्या पुरण भातशेतीची नुकतीच कापणीही करण्यात आली आहे. सेंद्रिय कंपोष्ट नैसर्गिक खतांचा वापर करून त्यांनी ही लहानशी शेती केली. या पुरण शेतीला सुमारे पाच हजार वर्षांचा इतिहास आहे.
सरकारने ‘वसंत बंधारे’ ही योजना अमलात आणली व नदीच्या पात्रात पुरण शेती करणे कठीण होऊन बसले. म्हादई नदी ही पुरण शेतीसाठी प्रसिद्ध होती. उस्ते, कुडशे, सोनाळ, कडतरी, सावर्डे, मासोर्डे, वेळगे, खोतोडे, गांजे अशा नदीच्या काठावरील अनेक गावांमध्ये पुरण शेती हमखास केली जायची. बागायती पिकांसाठी वरदान ठरलेले वसंत बंधारे पुरण शेतीला मात्र मारक ठरले आहेत. पुरण शेती ही पश्चिम घाट तसेच जगातील एकमेव असलेली शेती सत्तरीची शान आहे.
पुरण शेतीला हजारो वर्षांचा इतिहास आहे. बंधाऱ्यामुळे या कामात अडथळा आला. परंतु कृष्णा सावंत यांनी अगदी निर्धार करून पुन्हा एकदा पुरण शेतीला गतवैभव मिळवून देण्याचा चांगला प्रयत्न केलाय. या
लागवडीत पिकाला खत म्हणून नैसर्गिक घटक मिळत असतात. त्यामुळे पुरण शेती पौष्टिक आहारयुक्त शेती आहे. - सूर्यकांत गावकर, भुईपाल-सत्तरी
कृष्णा सावंत व त्यांच्या कुटुंबीयांनी अतिशय मेहनतीने, चिकाटीने पुरण शेतीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केला आहे. म्हादई नदीच्या पात्रात बांधलेल्या वसंत बंधाऱ्यांमुळे या शेतीच्या कामाला लगाम बसला होता. मात्र आता पुन्हा एकदा या शेतीला चांगले दिवस येऊ लागले आहेत. ही शेती आहारासाठी उपयुक्त आहे. - राजेंद्र केरकर, पर्यावरणप्रेमी (केरी)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.