सिलिगुडी, पश्चिम बंगालमधील १९ वर्षीय निसर्ग अधिकारी पाचवी-सहावीत असल्यापासूनच एथिकल हॅकिंगचे प्रयोग करत आहे. एथिकल हॅकिंग म्हणजे एखादी संगणकीय प्रणाली, जसे की एखादी वेबसाईट, तिच्यातील त्रुटी शोधण्यासाठी तिचा सखोल अभ्यास करणे. ती प्रणाली हॅक करणे शक्य आहे का, हे पडताळून पाहणे आणि तसे असल्यास संबंधित संस्थेला किंवा व्यक्तीला त्याची पूर्वकल्पना देणे. कोणत्याही क्षेत्राशी संबंधित खाजगी अथवा गोपनीय माहिती हाताळणाऱ्या संगणकीय प्रणालींमध्ये त्रुटी राहू नयेत, यासाठी एथिकल हॅकर्सकडून त्या मुद्दाम तपासून घेतल्या जातात.
सोप्या शब्दांत सांगायचे झाले. तर, एखादे घर चोरांपासून किती सुरक्षित आहे हे पाहण्यासाठी एखाद्याने मुद्दाम तिथे चोरीचा प्रयत्न करणे आणि त्यातील सुरक्षिततेच्या त्रुटी मालकाला दाखवून देणे.
निसर्गने यंदा सीबीएसईची (CBSE) बारावीची परीक्षा दिली. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ हे भारतातील सर्वात मोठ्या राष्ट्रीय शिक्षण मंडळांपैकी एक आहे. हे भारत सरकारच्या अधिपत्याखाली कार्यरत असून दरवर्षी लाखो विद्यार्थ्यांसाठी इयत्ता १० वी आणि १२ वीच्या बोर्ड परीक्षा घेते. सीबीएसईशी भारतातील ३० हजारांच्या आसपास शाळा तसेच परदेशातीलही २५० वर शाळा संलग्न आहेत. दरवर्षी बोर्ड परीक्षेच्या प्रक्रियेत लाखो उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन हजारो शिक्षक आणि परीक्षकांकडून केले जाते.
ही प्रक्रिया अधिक कार्यक्षम करण्यासाठी सीबीएसईने यंदा पहिल्यांदाच इयत्ता १२ वीच्या बोर्ड परीक्षांसाठी डिजिटल ऑन-स्क्रीन मार्किंग (ओएसएम) प्रणालीचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. सीबीएसईसाठी ही प्रणाली विकसित करण्याचं काम हैदराबाद स्थित कोएम्प्ट एज्युटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आले. यंदा १७.६८ लाख विद्यार्थ्यांनी सीबीएसईची बारावीची परीक्षा दिली. या ओएसएम प्रणालीद्वारे आधी या सर्व विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या उत्तरपत्रिका स्कॅन करून ‘ऑनलाइन क्लाऊड’वर सेव्ह केल्या गेल्या. आणि परीक्षकांनी यंदा प्रत्यक्ष उत्तरपत्रिका तपासण्याऐवजी ऑनलाइन पोर्टलवर लॉग-इन करून या स्कॅन केलेल्या उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन केले.
या त्याची स्वतःची धरून लाखो विद्यार्थ्यांची संवेदनशील माहिती हाताळणाऱ्या ओएसएम प्रणालीची सायबर सुरक्षा किती प्रभावी आहे हे पाहण्यासाठी निसर्गनेही ओएसएम वेबसाईट अभ्यासली. आणि त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. प्रणालीतील त्रुटीपूर्ण कोडिंगमुळे परीक्षक आणि प्रशासकांच्या पासवर्डपासून ते विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांपर्यंतची संवेदनशील माहिती, कोडिंग आणि सायबर सिक्युरिटी चे प्राथमिक ज्ञान असलेल्या कोणत्याही व्यक्तीला सहज उपलब्ध होऊ शकत होती.
एक जबाबदार एथिकल हॅकर आणि तेवढाच जबाबदार नागरिक असलेल्या कारणाने त्याने ह्या संबंधीची सविस्तर ईमेल इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) म्हणजेच भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद पथकाला लिहून पाठवली. ‘सीईआरटी-इन’ ही भारत सरकारच्या माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत राष्ट्रीय पातळीवरील सायबर सुरक्षा संस्था. देशातील संगणक नेटवर्क, शासकीय यंत्रणा, महत्त्वाच्या पायाभूत सुविधा आणि इंटरनेट वापरकर्त्यांवर होणाऱ्या सायबर हल्ले, डेटा चोरी, मालवेअर, रॅन्समवेअर, फिशिंग आणि इतर सायबर धोक्यांबाबत सतर्कता, समन्वय आणि तांत्रिक मदत पुरविण्याचे काम या संस्थेकडून अपेक्षित आहे. २५ फेब्रुवारीच्या आसपास सीईआरटी-इन बरोबरच निसर्गने सीबीएसईलाही या समस्येसंबंधीची सविस्तर सूचना दिली. खेदाची गोष्ट म्हणजेया दोन्ही संस्थांनी, का कोण जाणे, पण या अतिशय महत्वाच्या खुलाशाकडे निसर्गने परत परत लिहूनही कानडोळा केला.
ह्या अवघ्या १९ वर्षाच्या मुलाचे कौतुक यासाठी की, तो याविषयी सीबीएसईचा १२वीचा निकाल येईस्तोवर म्हणजे १३ मेपर्यंत गप्प राहिला. जर त्यानं ह्या सीबीएसईच्या पेपर तपासणी वेबसाईट वरील सायबर असुरक्षिततांचे सुतोवाच आधी केले असते तर हजारो चांगल्या किंवा वाईट हेतूने हजारो हॅकर्स या ओएसएम वेबसाईटवर तुटून पडले असते, आणि लाखो विद्यार्थ्यांना त्यांची काहीही चूक नसताना ही मानसिक तणाव देणारी परीक्षा कदाचित परत द्यावी लागली असती. यातही महत्वाची गोष्ट ही की, देश विदेशातील पदवी अभ्यासक्रमांना त्यांना अर्जही न करता आल्याने त्यांचे एक वर्ष वाया गेले असते. म्हणून सयंम राखून हा मुलगा परीक्षेचा निकाल येईस्तोवर गप्प राहिला. पण त्यानंतर मात्र त्यानं या विषयी आवाज उठवायचं ठरवलं. सीईआरटी-इन , सीबीएसई यांनी तर त्याच्या सांगण्याकडे लक्ष दिले नव्हतेच.
मग त्यानं प्रस्थापित व्यवस्था लक्ष देत नाही तेंव्हा तरुणाई ज्या एकमेव मार्गाचा अवलंब आपला आवाज उठवण्यासाठी करते, त्या मार्गाचा - म्हणजे सोशल मीडियाचा उपयोग केला. त्यानं या संबधी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर या संबंधी एक पोस्ट टाकला आणि सविस्तर माहितीसाठी ni5arga.com या आपल्या वेबसाईटचा लिंक दिला. गित हब सारख्या टेक्निकल फोरममध्ये पण ही माहिती टाकली. आणि त्यानंतर मात्र वावटळ उठले. पहिल्यांदा वास्तव स्वीकारण्यास नाकबुल असलेल्या सीबीएसईला अखेर आपली चूक कबूल करावी लागली. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नियुक्त केलेल्या आयआयटी प्रोफेसरच्या पॅनेलने निसर्गला अधिकृतपणे त्रुटी दाखवून देण्यासाठी पाचारण केले. पण तोपर्यंत पुलाखालून खूप पाणी वाहून गेलेच होते.
निसर्गने दाखवलेल्या त्रुटींची देशभरच्या तरुणांद्वारे सायबर स्पेसमध्ये प्रचंड चर्चा झाली, होतेय. त्याच अनुषंगाने सार्थक सिद्धांत या झारखंडच्या १८-वर्षीय तरुणाने एवढ्या भयंकर चुका ह्या अतिशय महत्वाच्या प्रणालीमध्ये करणारी कंपनी आहे तरी काय चीज म्हणत, त्याविषयी माहिती काढणे सुरू केले. आणि त्याच्या हाती धक्कादायक माहिती सापडली. हे ओएसएमचे कंत्राट ज्या कोएम्प्ट एज्युटेकला दिले गेले तिचे पूर्वीच नाव होते ग्लोबारेना. २०१९ मधे त्यांच्या सदोष सॉफ्टवेअरमुळे तेलंगणा/आंध्रप्रदेशमध्ये परीक्षा निकालात प्रचंड चुका होऊन अनेक विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झाल्या होत्या, त्यांच्यावर फौजदारी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. आणि कंपनीला मोठ्या जनक्षोभाचा आणि कायदेशीर खटल्यांचा सामना करावा लागला होता.
सार्थकच्या असंही लक्षात आले, की टीसीएस सारख्या प्रथितयश कंपन्यांना डावलून या कंपनीलाच या प्रणालीचे कंत्राट मिळावे म्हणून आरएफपी(प्रस्ताव मागणी सूचना) मध्ये मुद्दामहून बदल केले गेले होते. सार्थकनेही निसर्गचीच वाट चोखाळत ‘एक्स’वर पोस्ट टाकला, नि सविस्तर ब्लॉग पण लिहिला आणि देशभर या प्रकरणाचा प्रसारमाध्यमांद्वारे आणि सोशल मीडियाद्वारे एवढा बोलबाला झाला, की उच्चस्तरीय संसदीय समितीने सार्थकला बोलावून घेतले. त्याने केलेल्या खुलाशाबरहुकूम शिक्षण मंत्रालयातल्या काही अधिकाऱ्यांची उचलबांगडीही केली गेली.
ओएसएम मधल्या या प्रचंड घोळामुळे सर्वच विद्यार्थी सतर्क झाले. निकालानंतर सुमारे १७.६८ लाख मधल्या १.८ लाख विद्यार्थ्यांनी पेपर फेरतपासणीसाठी अर्ज केले. तिथे तर आणखीनच गोंधळ उघडकीस आले. दिल्लीच्या १७ वर्षाच्या वेदांत श्रीवास्तव या हुशार मुलाने अपेक्षेपेक्षा कमी मार्क मिळाले म्हणून आपला पेपर परत तपासणीस टाकला. पाहतो तर काय, त्याला त्याचा म्हणून दिलेल्या ऑनलाइन पेपरमध्ये काही पाने त्यानं लिहिलेली होती, तर काही आणखीनच कुणाची होती.
म्हणजे स्कॅनिंगमध्ये गोंधळ केला गेला होता. बोर्डाने हात झटकल्यावर वेदांतनेही आपली समस्या मांडण्यासाठी सोशल मीडियाचाच आधार घेतला. त्यानंतर इतर अनेक विद्यार्थ्यांनीही आपले समान अनुभव सोशल मीडियावर पोस्ट केले आणि सीबीएसईला या साऱ्याची दखल घेऊन योग्य ती दुरुस्ती करावी लागली. सुप्रीम कोर्टाने सोमवार ८ जून रोजी दिलेल्या निवाड्यात गरज पडल्यास रात्रभर जागून काम करा, पण शुक्रवारपर्यंत हे फेरतपासणीचे काम पूर्ण करा, अशी सक्त ताकीद सीबीएसईला दिली आहे.
अस्वस्थ करणारी गोष्ट म्हणजे प्रस्थापित व्यवस्थेतील, त्याही आपल्या भविष्याशी निगडित त्रुटी दाखवणाऱ्या ह्या सर्व १७ ते १९ वयोगटातील मुलांना पाकिस्तानी, देशद्रोही अशी बिरुदे लावली गेली. अगदी पुराव्यांसहित आपले म्हणणे त्यांनी मांडले असतानाही. ही एक धोक्याची सूचना आहे. आम्ही, आमची बांधिलकी असलेली राजकीय व्यवस्था कधीच चुकू शकत नाही, त्यात त्रुटी आहेत म्हणून सांगणारे नक्की देशद्रोही असतील, असे ठरवणारे, बॉटसचा मारा करून आपला चुकीचा विचारप्रवाह आपल्या जनमानसात सोशल मीडियाच्या माध्यमानेच भरवून मूळ व्यवस्थेतील त्रुटींच्या छिद्रांची भगदाड झाल्यानंतरही पश्चातापाचा मागमूस नसलेल्या टोळ्यांमध्ये होणारी वाढही पुढच्या पिढीच्या दृष्टीनेही फार चिंताजनक गोष्ट आहे.
पालकांनी तसेच प्रस्थापित व्यवस्थेनेही समस्या मांडणाऱ्या, त्रुटी दाखवणाऱ्या तरुणाईचे म्हणणे ऐकून घेतलेच पाहिजे, त्या अनुषंगाने योग्य ते बदल केलेच पाहिजेत. हे ह्या प्रकरणाने परत एकदा अधोरेखित केले आहे. फेब्रुवारीमध्ये निसर्गने लक्षात आणून दिलेल्या त्रुटी वेळीच दुरुस्त झाल्या असत्या, तर आज सरकारवर ही नामुष्की आली नसती आणि १२ वीची परीक्षा दिलेल्या लाखो मुलांचा जीव असा टांगणीला लागला नसता. गोव्यातील मुलांना इतकंच सांगेन की, तंत्रज्ञानाशी डोळस दोस्ती करा. वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करणारे, समस्या मांडणारे व उत्तरही शोधणारे अनेक गट सायबरस्पेस मध्ये आकार घेत आहेत. त्यांची माहिती घ्या, सोयीच्या ग्रुपमध्ये सहभागीही व्हा. अन्याय, सोसू नका!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.