Brahmin History Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Brahmin History: अम्बितमे नदीतमे देवितमे सरस्वति। ब्राह्मणी उपासना आणि सभ्यता

Saraswat Brahmins origin: बहुधा ब्राह्मण पूर्वेकडे जाताना यज्ञ करताना आलेल्या काही अडचणी आणि सुरक्षित परिस्थिती निर्माण करण्यात त्यांना अखेरीस आलेले यश याचा तो संदर्भ असावा.

गोमन्तक डिजिटल टीम

तेनसिंग रोद्गीगिश

अपरान्त हा भाग म्हणजे आर्यवर्ताची सामान्यतः स्वीकारली जाणारी पश्चिम सीमा आहे. आर्यावर्ताच्या पश्चिमेकडील देश हा पश्‍चातदेश होता. (संदर्भ : शास्त्री आणि भट, १९४६ : वराहमिहिर्स बृहतसंहिता, १६४)

यातील काही नद्या वर्षा ऋतूतच वाहतात तर काही बारमाही वाहतात. मत्स्यदेश, अश्‍वकूट, कुल्य, कुन्तल, काशी आणि कोशल, याशिवाय अथर्व, अर्कलिंग, मलक आणि वृक हे सर्व मध्यदेश म्हणून ओळखले जातात.

अपरान्त, शुद्र, पल्लव, गांधार, यवन, सिंधु, सौवीर, भद्र, शतद्रु, कलिंग, पारद, हारभूषिक, माठर, बहुभद्र, कैकेय आणि दशमालिक या सर्व देशांमध्ये क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र लोक राहतात. (संदर्भ : दत्त, १८९६ : अ प्रोज इंग्लिश ट्रान्स्लेशन ऑफ मार्कंडेय पुराण, १०६.)

या सर्व गोष्टींवरून एक मुद्दा अगदी स्पष्ट होतो; पंजाब, सिंधु-सौविरा (नदीच्या दोन्ही बाजूंनी खालची सिंधू खोरे) आणि सौराष्ट्रासह अपरान्त हे आर्य देशाच्या बाहेर होते. या संस्कृत ग्रंथांद्वारे अपारान्तातील लोकांची गणना क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांच्याबरोबरच करण्यात आली आहे, जे स्पष्टपणे आर्य नाहीत.

जेव्हा आपण इतर काही संस्कृत ग्रंथ पाहतो तेव्हा हा फरक अधिक स्पष्ट होतो. बौधायन धर्मसूत्रानुसार(१.१.३१) सुराष्ट्र, सिंधू आणि सौविरा हे देश ‘शुद्ध आर्य वंशाचे नाहीत’ आणि जो व्यक्ती आराट आणि सौविराला जातो त्याला सर्वपक्षासारखा पवित्र यज्ञ करावा लागतो.

(संदर्भ : काणे, १९४१ : खंड २, भाग १, १५) ढोलावीरा उत्खनन आणि अशोकाच्या आदेशाप्रमाणे ‘कच्छच्या रणातील एक प्रदेश’ म्हणून आराटाची ओळख झाली आहे; वात्स्यायनानेही अपरान्त आणि आराट एकत्र जोडले (कामसूत्र, अध्याय ५, भाग २, श्लोक २६) (संदर्भ : केदारनाथ, १८९१ : श्री वात्स्यायनप्रणितम कामसूत्रम्, १३०)

याज्ञवल्क्य स्मृतीवर मिताक्षरीने केलेल्या टीकेत देवलाच्या श्‍लोकात असे म्हटले आहे की, जर मनुष्य सिंधू, सौविरा आणि सौराष्ट्र येथे तीर्थयात्रेशिवाय इतर हेतूने गेला तर त्याला पुन्हा उपनयन संस्कार करावे लागतील. (संदर्भ : काणे, १९४१ : खंड २, भाग १, १६)

बौद्धायन धर्मसूत्र (१८.१३, ४४) सारख्या वैदिक ग्रंथांमधून आराटला तुच्छतेने पाहिले गेले आहे. ज्याचा उल्लेख ‘गांधार आणि पश्चिम पंजाब सिंधचा समावेश असलेल्या वायव्येकडील अनैतिक प्रदेश,’ असा होतो. (संदर्भ : पारपोला, २०१५: रूट्स ऑफ हिंदूइझम- द अर्ली आर्यन्स अँड द इंडस सिव्हिलायझेशन, २१६) सांख्य-लिखिताच्या धर्मसूत्रानुसार सिंधू आणि सौविरा देशांच्या पूर्वेस निर्दोष आध्यात्मिकता आढळते. (संदर्भ : काणे, १९४१ : खंड २ भाग १, १४)

सरस्वती खोऱ्यातील रहिवाशांनी ख्रिस्तपूर्व तिसऱ्या सहस्राब्दी आणि दुसऱ्या सहस्राब्दी दरम्यान आपली जन्मभूमी सोडलेली दिसते. (संदर्भ : वालदिया, २००२ : सरस्वती - द रिव्हर दॅट डिसपिअर्ड, ५७) मधल्या काळात काय झाले?

खोऱ्यात नवीन लोक स्थायिक झाले होते का? की भरभराट होत असलेल्या सभ्यतेचा नाश झाला? की यमुना खोऱ्यात आर्यांनी नवीन सांस्कृतिक मूल्ये आत्मसात केली होती? सारस्वतच्या ओळखीतील या गूढ वळणाचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला खूप पुढे जावे लागेल.

सारस्वतची कथा निश्चितपणे वेगाने वाहणाऱ्या वादळी सरस्वतीच्या काठावर सुरू होते, जी पर्वताच्या अडथळ्याला तोडून, वैभवात आणि इतर सर्व नद्यांना मागे टाकत, आणि ख्रिस्तपूर्व तिसऱ्या सहस्राब्दीमध्ये समृद्ध सभ्यतेचे पालनपोषण करते. ज्याबद्दल ऋग्वेदामधील वर्णन;

अम्बितमे नदीतमे देवितमे सरस्वति ।

अप्रशस्ताइव स्मसि प्रशस्तिमम्ब नस्कृधि ॥

(सर्वोत्तम माता, सर्वोत्तम नद्यांमध्ये, सर्वोत्कृष्ट देवी, सरस्वती, आम्ही जसे असायला हवे आहोत, तसे नाही आणि माता, तू आम्हाला प्रतिष्ठा दे. (संदर्भ : ग्रिफिथ, १८८९ : ऋग्वेद, २.४१.१६) ग्रिफिथ यांनी या केलेले मंत्राचे वर्णन नदीविषयी आहे की, विदुषी-विद्वान स्त्रीबद्दल आहे, याविषयी संभ्रम आहे. सरस्वतीच्या उगमापासून ते ब्रह्मपुत्रेसोबत संगमापर्यंतचा प्रवास हा कालगणनेच्या दृष्टीनेही लांबचा प्रवास होता - कदाचित एक सहस्राब्दीहून अधिक काळ.

बहुधा ब्राह्मण पूर्वेकडे जाताना यज्ञ करताना आलेल्या काही अडचणी आणि सुरक्षित परिस्थिती निर्माण करण्यात त्यांना अखेरीस आलेले यश याचा तो संदर्भ असावा.

त्याचसाठी; ब्राह्मणी उपासना आणि सभ्यतेला - अग्नी आणि सोम - दोन्ही यज्ञांना केंद्रस्थानी ठेवून विचार केल्यास या कथेला महत्त्व प्राप्त होते. कृष्णसार मृगाची कातडी ब्राह्मणाशी एकरूप झाली होती, असे क्रॅम्रिश म्हणतात.

(संदर्भ : क्रॅम्रिश, १९८१ : द प्रेझेन्स ऑफ शिव, ३३८) बलिदान दिलेला कृष्णसार मृग पृथ्वीभर फिरला आणि त्यामागे धर्म त्याचे रक्षण करीत फिरला, असे विश्‍वरूपदर्शनावर टिप्पणी करताना याज्ञवल्क्य संहिता सांगते. पण कृष्णसार मृगाची कल्पना कोठून आली? कुरु-पांचाल हे या प्राण्याचे नैसर्गिक अधिवास होते का?

आर्यावर्ताच्या या भूगोलाबद्दलची चौकशी एका विशिष्ट हेतूसाठी आहे; उत्तरार्धात वैदिक भूभागात आपल्याला सारस्वतांची भूमी कोठे सापडते, ज्यांना दुष्काळाने शेवटी द्वीपकल्पाच्या पश्चिम किनाऱ्याकडे नेले? वरवर पाहता कुठेही नाही.

बहुधा सारस्वत आणि कुरु-पांचाल ब्राह्मण कृष्णसार मृगांचा अधिवास असलेल्या भूमीत त्यांचे घर बनवण्यापूर्वीच त्यांचे मार्ग वेगळे झाले होते; सारस्वतांनी तेव्हा आपला ‘आध्यात्मिक श्रेष्ठत्वा’चा वारसा सोडला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Milind Soman Goa Swimming: गोव्यात मिलिंद सोमणचं हटके होळी सेलिब्रेशन! खवळलेल्या समुद्रात 15 किमी स्विमिंग; अचाट स्टॅमिना पाहून नेटकरी थक्क VIDEO

T20 World Cup 2026 Semifinal: "हार मानणं आमच्या रक्तात नाही!" सेमीफायनलपूर्वी हॅरी ब्रूकचा भारताला तगडा इशारा; टीम इंडियाचा विजयी रथ रोखण्यासाठी ठोकला शड्डू

Mumbai Margao Vande Bharat Express चे डबे वाढणार कधी? प्रवाशांची 20 डब्यांची मागणी; सावंतवाडी येथे थांबा अपेक्षित

"रंगपंचमीलाच रक्ताचा सडा!" प्रियकरासोबत संसार थाटणाऱ्या बायकोची भररस्त्यात केली हत्या; संतापलेल्या नवऱ्यानं काढला काटा

"ती" बनली काळ! झोपलेल्या नवऱ्याला घरात कोंडलं अन् बाहेरुन टाळं लावून अख्खं घरच दिलं पेटवून; बायकोनं केली संसाराची राखरांगोळी

SCROLL FOR NEXT