Shehbaz Sharif Government Political Crisis: पाकिस्तानच्या राजकीय पटलावर पुन्हा एकदा मोठ्या राजकीय उलथापालथीचे आणि लष्करी बंडखोरीचे गडद ढग जमा झाले आहेत. राजधानी इस्लामाबादला ठिकठिकाणी भलेमोठे कंटेनर्स लावून पूर्णपणे सील करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची खुर्ची आता संकटात सापडली असून या संपूर्ण राजकीय नाटकाची पटकथा रावळपिंडी येथील लष्करी मुख्यालयात लिहीली जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि गृहमंत्री मोहसिन नक्वी यांच्यातील मतभेद आता चव्हाट्यावर आले आहेत. लष्करप्रमुख जनरल आसिम मुनीर यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी पाकिस्तानची (Pakistan) प्रशासकीय व्यवस्था पूर्णपणे ढासळल्याचे वक्तव्य केल्यानंतर, आता स्वतःच्याच सरकारविरोधात एका मोठ्या घोटाळ्याचा बॉम्ब फोडला.
गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी असा खळबळजनक दावा केला की, देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा समोर आला असून यामध्ये न्यायाधीश, नोकरशहा, राजकारणी आणि बँकर्सचा समावेश आहे. गेल्या 21 वर्षांपासून हे सर्वजण लाचखोरीत लिप्त असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला. त्यांनी कोणत्याही विशिष्ट व्यक्तीचे नाव घेतले नसले तरी, या वक्तव्याने शाहबाज सरकारचा पाया पार हादरवून सोडला आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, नक्वी यांनी आपल्या आरोपांमध्ये लष्कराचा कोणताही उल्लेख केला नाही, यावरुन त्यांचा रोख केवळ नागरी प्रशासन आणि शाहबाज सरकारवरच असल्याचे स्पष्ट होते. लष्करप्रमुख आसिम मुनीर यांचा पाठिंबा आणि नक्वी यांची वाढती राजकीय महत्त्वाकांक्षा ही शाहबाज शरीफ यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई बनली आहे.
संरक्षण तज्ज्ञांच्या मते, मोहसिन नक्वी यांची नजर गेल्या अनेक दिवसांपासून थेट पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर आहे. यापूर्वी अमेरिका आणि इराणमधील मध्यस्थीसाठी देखील जनरल मुनीर यांनी शरीफ सरकारला बाजूला सारुन नक्वी यांचीच विशेष प्रतिनिधी म्हणून निवड केली होती. बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये वाढत्या अंतर्गत अशांततेच्या पार्श्वभूमीवर, जनरल मुनीर हे नक्वी यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकारवर पूर्ण पकड मजबूत करु इच्छितात. दुसरीकडे, या घडामोडींवर सत्ताधारी पीएमएल-एन आणि पीपीपी या दोन्ही मोठ्या पक्षांनी मौन बाळगणे पसंत केले आहे.
दरम्यान, या अंतर्गत कलहाने संतप्त झालेल्या संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी गृहमंत्री नक्वी यांच्यावर जोरदार पलटवार केला. एका टीव्ही संवादात बोलताना आसिफ यांनी नक्वींना 'अतिशक्तीशाली व्यक्ती' असे संबोधले. ते म्हणाले की, गेल्या तीन वर्षांपासून नक्वी मोठ्या पदांवर आहेत आणि अनेक बाबींमध्ये ते थेट पंतप्रधानांनाही उत्तरदायी राहिलेले नाहीत. एवढ्या शक्तिशाली माणसाने जर व्यवस्थेबद्दल तक्रार केली, तर बाकीच्या मंत्र्यांनी घरी गेलेलेच बरे, असा टोला त्यांनी लगावला. पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वोच्च स्तरावर असा उघड संघर्ष पाहायला मिळत आहे. यावरुन पाकिस्तानात पुन्हा एकदा लष्करी राजवट येण्याची शक्यता बळकावली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.