Male fertility research | Sperm quality study Dainik Gomantak
ग्लोबल

Male Fertility Research: पुरुषांच्या प्रजनन क्षमतेबाबत नवीन संशोधन! शुक्राणूंसाठी वारंवारता महत्त्वाची; तज्ज्ञांचे मत जाणून घ्या..

Sperm Quality Study: पुरुष जितका जास्त काळ लैंगिक संबंधांपासून दूर राहतात, तितके त्यांच्या शुक्राणूंमध्ये DNA चे नुकसान आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढल्याचे दिसून आले.

गोमन्तक डिजिटल टीम

पुरुषांनी अधिक वारंवार वीर्यस्खलन (ejaculation) केल्यास त्यांची प्रजनन क्षमता वाढू शकते, असे संशोधकांचे म्हणणे आहे. कारण शरीरात जास्त काळ साठवून ठेवलेले शुक्राणू कालांतराने खराब होऊ लागतात.

पुरुष जितका जास्त काळ लैंगिक संबंधांपासून दूर राहतात, तितके त्यांच्या शुक्राणूंमध्ये DNA चे नुकसान आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढल्याचे दिसून आले. तसेच अशा शुक्राणूंची गुणवत्ता कमी होत असून त्यांची हालचाल (motility) आणि जिवंत राहण्याची क्षमता देखील घटते.

या निष्कर्षांचा परिणाम प्रजनन उपचार केंद्रांवर (fertility clinics) होऊ शकतो. उत्तम दर्जाचे शुक्राणू मिळवायचे असतील, तर पुरुषांनी अनेक दिवस वीर्यस्खलन टाळणे आवश्यक आहे, या सध्याच्या मार्गदर्शक तत्त्वांचा पुनर्विचार करण्याची गरज संशोधनातून सूचित होते.

ऑक्सफर्ड विद्यापीठातील जीवशास्त्रज्ञ आणि या अभ्यासाचे प्रमुख लेखक डॉ. कृष संघवी म्हणाले, “शुक्राणूंच्या DNA नुकसान आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसवर आम्हाला आढळलेले परिणाम लक्षणीय आहेत. त्यामुळे हा जैविक दृष्ट्या महत्त्वाचा प्रभाव असल्याचा आम्हाला विश्वास आहे.”

हा निष्कर्ष ११५ मानवी अभ्यासांचे (सुमारे ५५,००० पुरुष) आणि ३० विविध प्रजातींवरील ५६ अभ्यासांचे विश्लेषण करून काढण्यात आला. मानवांसह इतर प्राण्यांमध्येही शरीरात साठवलेले शुक्राणू कालांतराने खराब होत असल्याचे आढळले, आणि याचा पुरुषाच्या वयाशी संबंध नव्हता.

जागतिक आरोग्य संघटना (WHO) वीर्य तपासणी किंवा IVF पूर्वी २ ते ७ दिवस वीर्यस्खलन टाळण्याचा सल्ला देते. मात्र हा सल्ला प्रामुख्याने शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी आहे, गुणवत्तेसाठी नाही.

संघवी म्हणतात, “जर केवळ शुक्राणूंची संख्या महत्त्वाची असेल, तर संयम (abstinence) वाईट नाही. पण यशस्वी गर्भधारणेसाठी गुणवत्ता देखील तितकीच महत्त्वाची असते.”

अलीकडील एका क्लिनिकल ट्रायलमध्ये ४५३ जोडप्यांवर अभ्यास करण्यात आला. ४८ तासांपेक्षा कमी संयम पाळणाऱ्या पुरुषांच्या गटात गर्भधारणेचे प्रमाण ४६% होते, तर २ ते ७ दिवस संयम पाळणाऱ्यांमध्ये ते फक्त ३६% होते.

नैसर्गिकरित्या गर्भधारणा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या जोडप्यांसाठी २ ते ७ दिवसांच्या दरम्यान संतुलन राखणे योग्य ठरू शकते. खूप जास्त अंतर ठेवल्यास शुक्राणूंची गुणवत्ता कमी होऊ शकते, तर खूप कमी अंतर ठेवल्यास संख्या आणि परिपक्वता कमी असू शकते.

मँचेस्टर विद्यापीठातील प्रा. अ‍ॅलन पेस्सी यांच्या मते, “IVF सारख्या उपचारांमध्ये कमी कालावधीचा संयम अधिक फायदेशीर ठरू शकतो, कारण शुक्राणू अधिक ताजे, सक्रिय आणि कमी नुकसान झालेले असतात.”

तथापि, निदानाच्या टप्प्यावर वीर्य विश्लेषणासाठी २ ते ७ दिवसांचा नियम उपयुक्त ठरतो, कारण त्यामुळे आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तुलना करणे शक्य होते. मात्र प्रत्यक्ष उपचाराच्या वेळी ताजे आणि निरोगी शुक्राणू अधिक महत्त्वाचे असतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: लाथाबुक्क्या, तुंबळ हाणामारी! म्हापशात पार्किंगवरून पर्यटक-स्थानिकांत राडा; परिसरात काही काळ तणाव

Goa Politics: खरी कुजबुज; चकाचक उत्तर गोवा

Goa Crime: भरदिवसा गोळ्या घालून केला निर्घृण खून! लपण्यासाठी आले गोव्यात; पंजाबमधील हत्या प्रकरणात 5 जणांच्या मुसक्या आवळल्या

Mirabag: ‘बंधारा रद्द’चे पत्र द्या, अन्यथा ‘चलो आझाद मैदान’! मीराबाग आंदोलकांचा इशारा; सरकारला 2 दिवसांची मुदत

VIDEO: भक्तिरसात तल्लीन! कुशावती तिरी घुमले ‘आरती’चे स्वर; पहा अर्चकांचा लयबद्ध आविष्कार

SCROLL FOR NEXT