Indian Embassy Advisory: मध्यपूर्वेतील बिघडत चाललेली सुरक्षा स्थिती आणि वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, तेहरानमधील भारतीय दूतावास पुन्हा एकदा सतर्क झाला. इराणमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांसाठी दूतावासाने 16 मार्च रोजी एक महत्त्वाची आणि तातडीची नियमावली प्रसिद्ध केली. या नव्या सूचनेमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले की, कोणत्याही भारतीय नागरिकाने दूतावासाच्या अधिकृत परवानगीशिवाय आणि समन्वयाशिवाय इराणची कोणतीही जमिनी सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करु नये. या सूचनेचे उल्लंघन केल्यास गंभीर कायदेशीर आणि सुरक्षाविषयक अडचणींना सामोरे जावे लागेल, असा इशाराही देण्यात आला.
भारतीय दूतावासाच्या निदर्शनास आले की, 9 मार्च रोजी जारी केलेल्या पहिल्या इशाऱ्यानंतरही अनेक भारतीय नागरिक स्वतंत्रपणे सीमा ओलांडून शेजारील देशांमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, अशा प्रकारचा प्रवास प्रशासकीय आणि सुरक्षा दोन्ही दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरु शकतो. दूतावासाने स्पष्ट केले की, जर एखादी व्यक्ती अधिकृत माहिती दिल्याशिवाय सीमा ओलांडताना इमिग्रेशन किंवा लॉजिस्टिकच्या कचाट्यात अडकली, तर अशा परिस्थितीत दूतावासाला मदत करणे कठीण होईल. अशा 'विना समन्वय' प्रवासादरम्यान उद्भवणाऱ्या कोणत्याही संकटाची जबाबदारी वैयक्तिक प्रवाशावर असेल, कारण त्या परिस्थितीत दूतावास तांत्रिकदृष्ट्या मदतीसाठी सक्षम नसेल.
सध्या इराणमध्ये (Iran) हजारो भारतीय नागरिक अडकले असून त्यात विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. इराण सरकारच्या माहितीनुसार, अनेक देशांचे नागरिक बेकायदेशीर किंवा चुकीच्या मार्गाने सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करत आहेत. सुरुवातीला अशा लोकांना केवळ समजावून परत पाठवण्यात आले, मात्र ही प्रवृत्ती वाढू लागल्यानंतर इराण सरकारने विविध देशांच्या दूतावासांशी संपर्क साधून यावर आक्षेप नोंदवला आहे. त्यानंतरच भारतीय दूतावासाने ही नवी आणि अधिक कठोर नियमावली जारी केली. सुरक्षिततेच्या कारणास्तव, भारतीय नागरिकांनी अधिकृत मार्ग आणि समन्वयाचाच वापर करावा, असे आवाहन करण्यात आले.
आणीबाणीच्या परिस्थितीसाठी दूतावासाने विशेष हेल्पलाइन क्रमांक आणि ई-मेल पत्ते जारी केले आहेत. भारतीय समुदायातील सदस्यांनी दूतावासाच्या अधिकृत चॅनेलशी जोडून राहावे आणि कोणताही प्रवासाचा निर्णय घेण्यापूर्वी आपली माहिती दूतावासाला द्यावी, असे सांगण्यात आले आहे. इराणमधील परिस्थितीवर भारतीय अधिकारी बारीक लक्ष ठेवून असून गरजेनुसार समन्वयाद्वारे भारतीयांना सुरक्षित स्थळी हलवण्याची व्यवस्था केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी घाईघाईत सीमा ओलांडून स्वतःचा जीव धोक्यात घालू नये, हीच केंद्राची मुख्य भूमिका आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.