चेन्नई : तामिळनाडूचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी राज्यातील प्रार्थनास्थळे, शैक्षणिक संस्था आणि बसस्थानकांच्या ५०० मीटर परिघात असलेली ७१७ सरकारी ‘टास्मॅक’ (टीएएसएमएसी) दारूची किरकोळ विक्रीची दुकाने दोन आठवड्यांच्या आत बंद करण्याचे आदेश दिले आहेत.मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर विजय यांनी प्रार्थनास्थळे, शैक्षणिक संस्था आणि बस स्थानकांजवळ कार्यरत असलेली ‘टास्मॅक’ दारूची दुकाने ओळखण्यासाठी त्यांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले.
तमिळनाडू राज्य विपणन महामंडळाकडून (टीएएसएमएसी) सध्या राज्यात ४,७६५ मद्यविक्री दुकाने चालवली जात आहेत. मुख्यमंत्री विजय यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अशा संवेदनशील भागांतील दुकानांचा सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार २७६ दुकाने धार्मिक स्थळांजवळ, १८६ शैक्षणिक संस्थांजवळ आणि २५५ बसस्थानकांजवळ असल्याचे आढळून आले.
सार्वजनिक हित लक्षात घेऊन ही दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले. टास्मॅक दुकाने तमिळनाडू सरकारसाठी मोठ्या महसुलाचा स्रोत असली तरी विविध राजकीय पक्षांकडून अनेक वर्षांपासून काही दुकाने बंद करण्याची मागणी होत होती. दरम्यान, टास्मॅकवर कथित आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी सुरू आहे. तमिलगा वेत्री कळघम पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात ‘अमली पदार्थमुक्त तमिळनाडू’चे आश्वासन दिले होते.
द्रमुक आणि अण्णाद्रमुक यांच्यात युतीबाबत चर्चा झाल्याचा अण्णाद्रमुकचे नेते सी. वे. षण्मुगम यांनी केलेला दावा द्रमुकने मंगळवारी फेटाळून लावला. षण्मुगम स्वतःच्या पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही द्रमुकने केला. द्रमुकच्या संघटन सरचिटणीस आर. एस. भारती यांनी दावा केला की, षण्मुगम यांनी विजय यांच्या नेतृत्वाखालील टीव्हीके सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळेच त्यांनी द्रमुक-अण्णाद्रमुक निवडणुकीनंतरच्या युतीबाबत निराधार आरोप केला.
टिव्हिकेचे प्रवक्ते आणि ज्योतिषी राधन पंडित वेत्रिवळ यांची तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांचे खासगी सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. वेत्रिवेळ हे ज्योतिषी तसेच टीव्हीकेचे प्रवक्ते म्हणून ओळखले जातात. नुकत्याच झालेल्या निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी पक्ष नेतृत्वाचे निकटवर्तीय सहकारी म्हणून काम केले होते.