भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. २०२६ मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली खेळवल्या जाणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा उद्या, २० डिसेंबर रोजी केली जाणार आहे. बीसीसीआयने (BCCI) अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी करून ही माहिती दिली आहे. शनिवारी दुपारी १:३० वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेत मुख्य निवडकर्ते अजित आगरकर १५ सदस्यीय भारतीय संघाच्या नावाची अधिकृत घोषणा करतील.
उद्या होणाऱ्या या महत्त्वपूर्ण बैठकीत निवड समितीसोबत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर किंवा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव सहभागी होण्याची दाट शक्यता आहे. ८ फेब्रुवारी २०२६ पासून या विश्वचषकाचा थरार सुरू होणार असून ८ मार्च रोजी अंतिम सामना खेळवला जाईल. या स्पर्धेत एकूण २० संघ सहभागी होणार असून त्यांची चार गटात विभागणी करण्यात आली आहे. भारताचा समावेश 'गट अ' मध्ये असून त्यांच्यासोबत पाकिस्तान, अमेरिका, नामीबिया आणि नेदरलँड हे संघ असणार आहेत.
विश्वचषकापूर्वी भारतीय संघ जानेवारी महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात ३ वनडे आणि ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. ही मालिका विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने अंतिम रंगीत तालीम मानली जात आहे. त्यामुळे २० डिसेंबरला केवळ वर्ल्डकपच नव्हे, तर न्यूझीलंड मालिकेसाठीही संघ निवडला जाईल. विश्वचषकासाठी संभाव्य संघात शुभमन गिल, अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा यांसारख्या युवा खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता असून, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या यांच्यावर अनुभवाची धुरा असेल.
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा, हर्षित राणा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह आणि जसप्रीत बुमराह.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.