क्रिकेटच्या इतिहासात हॅटट्रिक ही अत्यंत दुर्मिळ घटना मानली जाते. सलग तीन चेंडूंवर तीन बळी घेणे हे गोलंदाजाच्या कारकिर्दीतील अभिमानास्पद यश असते. पण सध्याच्या रणजी ट्रॉफी हंगामात घडलेली एक घटना सर्वांना थक्क करणारी ठरली आहे. आसाम विरुद्ध सर्व्हिसेस या सामन्यात एकाच डावात दोन गोलंदाजांनी हॅटट्रिक घेत इतिहास रचला.
चार वर्षांनंतर आसाममधील तिन्सुकिया जिल्हा क्रीडा संघटनेच्या मैदानावर रणजी ट्रॉफीचा सामना खेळला जात होता. सामन्यादरम्यान सर्व्हिसेस संघाच्या फिरकीपटू अर्जुन शर्मा आणि वेगवान गोलंदाज मोहित जांगरा यांनी अनुक्रमे हॅटट्रिक घेतल्या.
अर्जुन शर्माने १२ व्या षटकात तीन सलग चेंडूंवर फलंदाजांना माघारी धाडत हा पराक्रम केला. त्यानंतर मोहित जांगऱ्याने १५ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पहिली विकेट घेतली आणि पुढील १७ व्या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूंवर दोन बळी घेत हॅटट्रिक पूर्ण केली.
या दुर्मिळ कामगिरीने सर्व क्रिकेटप्रेमींना आश्चर्यचकित केले. रणजी ट्रॉफीच्या इतिहासात ६२ वर्षांपूर्वी अशाच प्रकारची घटना घडली होती. १९६३ साली अमृतसर येथे उत्तर पंजाबविरुद्ध सर्व्हिसेसकडून खेळणाऱ्या जोगिंदर सिंग रावने एकाच डावात दोन हॅटट्रिक घेत इतिहास रचला होता. आजपर्यंत कोणालाही त्याची बरोबरी करता आलेली नव्हती, परंतु या सामन्यात पुन्हा एकदा त्या कामगिरीची आठवण जागवली गेली.
पहिल्या डावात आसामने १०३ धावा केल्या, तर सर्व्हिसेसचा डाव केवळ १०८ धावांवर गडगडला. दुसऱ्या डावात रियान परागच्या नेतृत्वाखालील आसामचा संघ फक्त ७५ धावांवर आटोपला. त्यामुळे सर्व्हिसेसला विजयासाठी ७१ धावांचे सोपे लक्ष्य मिळाले, जे त्यांनी फक्त दोन विकेट गमावून सहज साध्य केले.
संपूर्ण सामन्यात फिरकीपटू अर्जुन शर्माने जबरदस्त गोलंदाजी केली. दोन्ही डावात मिळून त्याने एकूण ९ विकेट घेतल्या आणि त्याला ‘सामनावीर’ पुरस्काराने गौरवण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.