PM Modi Dainik Gomantak
देश

PM Modi: परदेशातून आधीच निमंत्रणे आलीत, त्यांनाही माहीत आहे 'आयेगा तो ...', लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदींचे वक्तव्य

Manish Jadhav

Prime Minister Narendra Modi: भाजपच्या 2 दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोपाच्या सत्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवारी) संबोधित केले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारने गेल्या 10 वर्षात जे काही साध्य केले काही त्याचा धांडोळा घेतला. त्याचबरोबर पुढील 5 वर्षात विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी आपली योजनाही सांगितली. त्यासाठी त्यांनी पहिली अट सांगितली की, भारतीय जनता पक्षाचे सरकारमध्ये जोरदार पुनरागमन. पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'प्रत्येक भारतीयाचे जीवन बदलण्यासाठी भाजपला अजून बरेच काही साध्य करायचे आहे.' ते पुढे म्हणाले की, 'गेल्या 10 वर्षांत भारताने मोठी उद्दिष्टे साध्य करण्याचे धाडस दाखवले आहे... ते अभूतपूर्व आहे. आज संपूर्ण जग भारताकडे पाहत आहे.'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सांगितले की, 'सार्वत्रिक निवडणुकीच्या आधीच मला जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या दौऱ्यांसाठी परदेशातून निमंत्रणे मिळत आहेत.' ते पुढे म्हणाले की, ''निमंत्रणांमुळे जगाला माहीत आहे की भाजप तिसऱ्यांदा केंद्रात सरकार स्थापन करणार आहे.'' दरम्यान, पंतप्रधान मोदींनी यावेळी काँग्रेसवरही हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदींनी दावा केला की, ''भाजप सरकारच्या पहिल्या कार्यकाळात सर्जिकल स्ट्राइक आणि बालाकोट एअर स्ट्राइकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करुन सुरक्षा दलांच्या मनोधैर्याचे कॉंग्रेसने खच्चीकरण केले.''

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, 'गेल्या 10 वर्षांत कोट्यवधी भारतीयांना भाजप सरकारच्या योजनांचा फायदा झाला आहे. विशेष म्हणजे, सरकार प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचले आहे.''

'आता देश छोटी स्वप्ने पाहू शकत नाही'

पंतप्रधान मोदी पुढे असेही म्हणाले की, 'भारताने आज प्रत्येक क्षेत्रात जी उंची गाठली आहे त्यामुळे प्रत्येक देशवासीय मोठ्या संकल्पाने एकत्र आले आहेत आणि हा संकल्प 'विकसित भारत'चा आहे.' ते पुढे म्हणाले की, ''आता देश छोटी स्वप्ने पाहू शकत नाही आणि छोटे संकल्पही घेऊ शकत नाही. स्वप्नेही मोठी असतील आणि संकल्पही मोठे असतील. भारताचा विकास करायचा हे आपले स्वप्न आहे आणि आपल्या सर्वांचा संकल्पही आहे. मात्र, पुढील 5 वर्षे यात मोठी भूमिका बजावणार आहेत. पुढील पाच वर्षांत भारताला पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने वेगाने काम करायचे आहे. पुढील पाच वर्षात आपल्याला विकसित भारताकडे मोठी झेप घ्यायची आहे. ही सर्व उद्दिष्टे साध्य करण्यासाठी पहिली अट म्हणजे भाजपचे सरकारमध्ये जोरदार पुनरागमन.''

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत 370 जागांचा टप्पा ओलांडण्याच्या पक्षाच्या लक्ष्याचीही पंतप्रधान मोदींनी भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना यावेळी आठवण करुन दिली. ते पुढे म्हणाले की, "आज विरोधी पक्षनेतेही 'एनडीए सरकार 400 पार'चा नारा देत आहेत. एनडीएला 400 पर्यंत नेण्यासाठी भाजपला 370 (जागांचा) टप्पा पार करावा लागेल."

शतकानुशतके प्रलंबित असलेली कामे मार्गी लावण्याचे धाडस दाखवले

आपल्या सरकारच्या कार्यकाळात महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या कामाबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ''आज भाजप युवा शक्ती, महिला शक्ती, गरीब आणि शेतकऱ्यांची शक्ती विकसित भारत घडवण्याची शक्ती बनवत आहे. ज्याला कोणी विचारले नाही त्याला आम्ही विचारले आहे. एवढेच नाही तर आम्ही त्याची पूजा केली आहे. येणाऱ्या काळात आपल्या माता-भगिणींना संधी मिळतील. मिशन शक्ती देशातील महिला शक्तीच्या संरक्षण आणि सक्षमीकरणासाठी एक संपूर्ण परिसंस्था निर्माण करेल. 15 हजार महिला बचत गटांना ड्रोन मिळणार आहेत.''

पंतप्रधान पुढे म्हणाले की, ''आता ड्रोन दीदी शेतीत वैज्ञानिकता आणि आधुनिकता आणणार आहेत. देशातील 3 कोटी महिलांना आम्ही लखपती दीदी बनवणार आहे. त्याचबरोबर आम्ही शतकानुशतके प्रलंबित असलेले प्रश्न सोडवण्याचे धाडस दाखवले आहे. अयोध्येत भव्य राम मंदिर बांधून आपण 5 शतकांची प्रतीक्षा संपवली. गुजरातमधील पावागडमध्ये 500 वर्षांनंतर धार्मिक ध्वज फडकवण्यात आला.''

'आम्ही 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवण्यासाठी काम करत आहोत'

भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनादरम्यान आपल्या भाषणात विरोधकांवर निशाणा साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ''आमच्या विरोधी पक्षांना योजना कशा पूर्ण करायच्या हे कदाचित माहित नसेल. पण खोटी आश्वासने देण्यात ते पटाईत आहेत. मात्र, विकसित भारताचे वचन हेच आमचे वचन आहे. केवळ भाजप आणि एनडीए आघाडीने याचे स्वप्न पाहिले आहे. 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवण्यासाठी आम्ही काम करत आहोत. विकसित भारताच्या संकल्पाशी संबंधित सूचनांसाठी आम्ही दीड वर्षांपासून काम करत आहोत. तुम्हाला हे जाणून आनंद होईल की आतापर्यंत 15 लाखांहून अधिक लोकांनी विकसित भारताचा रोडमॅप आणि धोरणांसाठी त्यांच्या कल्पना मांडल्या आहेत. या 15 लाखांपैकी निम्म्याहून अधिक लोक असे आहेत ज्यांचे वय 35 पेक्षा कमी आहे. या तरुणाईच्या विचारांनी आम्ही पुढे जात आहोत.''

दरम्यान, भारताच्या आर्थिक स्थितीबद्दल पंतप्रधान मोदी म्हणाले की, "भारताला 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्यासाठी जवळपास 60 वर्षे लागली. 2014 मध्ये, जेव्हा देशाने आम्हाला संधी दिली, तेव्हा 2 ट्रिलियनचा आकडाही कठीण दिसत होता, परंतु 10 वर्षांत आम्ही देशाच्या अर्थव्यवस्थेत 2 ट्रिलियन डॉलर्सची अतिरिक्त भर घातली. भारत 2014 मध्ये 11 वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होता, मात्र आम्हाला भारताला 5 व्या स्थानावर आणण्यासाठी फक्त 10 वर्षे लागली.”

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT