Pahalgam Attack News: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन येथे मंगळवारी (22 एप्रिल) दुपारी अडीच वाजता दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी घोडेस्वारी करणाऱ्या पर्यटकांच्या एका समूहाला टार्गेट केले. या भ्याड हल्ल्यात डझनभराहून अधिक लोक जखमी झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. या हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तोयबा समर्थित दहशतवादी संघटना टीआरएफने स्वीकारली असून सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. सीआरपीएफच्या अतिरिक्त क्विक रिअॅक्शन टीम्स (क्यूएटी) घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील श्रीनगरला पोहोचले आहेत.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शब्दात निषेध केला. तत्पूर्वी, पंतप्रधान मोदींनी गृहमंत्री अमित शाह यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. त्यांनी शाह यांना याप्रकरणी कठोर कारवाईचे निर्देश दिले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना आहेत. जखमी लोक लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. बाधित लोकांना शक्य तितकी सर्व मदत तात्काळ पुरवली जाईल. तसेच, या घृणास्पद कृत्यामागील लोकांना शिक्षा होईल. त्यांना सोडले जाणार नाही. त्यांचा नापाक अजेंडा कधीही यशस्वी होणार नाही. दहशतवादाविरुद्ध लढण्याचा आमच्या सरकारचा निर्धार दृढ असून तो आता आणखी मजबूत झाला आहे.''
त्याचवेळी, गृहमंत्री अमित शाह यांनीही या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. शाह म्हणाले की, ''पीडितांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत. या भ्याड दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्यांना सोडले जाणार नाही. आम्ही दोषींवर कठोरात कठोर कारवाई करु. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या घटनेची माहिती देण्यात आली असून त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे.''
दुसरीकडे, पर्यटकांना मदत आणि अचूक माहिती देण्यासाठी आपत्कालीन मदत कक्ष स्थापन करण्यात आला असून पोलिसांशी संपर्क साधण्यासाठी ९५९६७७७६६९, ०१९३२२२५८७० (९४१९०५१९४० व्हाट्सअॅप) हे नंबर जारी करण्यात आले आहेत.
दरम्यान, या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) या दहशतवादी संघटनेने घेतली. ही संघटना पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबाची संलग्न गट मानली जाते. टीआरएफचा म्होरक्या शेख सज्जाद गुल असून तो सध्या पाकिस्तानमध्ये आहे. तेथून तो ही संघटना चालवतो. टीआरएफचा जन्म पुलवामा हल्ल्याच्या (14 फेब्रुवारी 2019) आसपासचा मानला जातो. ही संघटना काश्मीर खोऱ्यात हळूहळू आपला विस्तार करत आहे. 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 हटवण्यात आले तेव्हा टीआरएफने संपूर्ण खोऱ्यात आपल्या हालचाली वाढवल्या होत्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.