Manipur Violence Dainik Gomantak
देश

Manipur Violence: मणिपूर हिंसाचारात 60 ठार, 231 जखमी, 1700 घरांची राखरांगोळी; जाणून घ्या

Manipur Violence: मणिपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत 60 जणांचा मृत्यू झाला असून 231 जण जखमी झाले आहेत.

Manish Jadhav

Manipur Violence: मणिपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत 60 जणांचा मृत्यू झाला असून 231 जण जखमी झाले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी सोमवारी ही माहिती दिली. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, चकमकीदरम्यान सुमारे 1700 घरे जळून खाक झाली. त्यांनी पुढे सांगितले की, '3 मे रोजी घडलेली ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे.

हिंसाचारात मारले गेलेले सर्वजण निर्दोष होते. मी मणिपूरच्या लोकांना शांतता राखण्याचे आवाहन करत आहे. शांतता राखण्यासाठी आपण सर्वांनी मिळून काम केले पाहिजे.'

मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी सांगितले की, हिंसाचार भडकावणाऱ्या व्यक्ती आणि गटांचा शोध घेतला जाईल. याची लवकरात लवकर उच्चस्तरीय चौकशी केली जाईल.

येथे अडकलेल्या इतर राज्यातील लोकांना परत पाठवण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. या लोकांना सुखरुप परत पाठवण्याचे काम सुरु झाले आहे.

बिरेन सिंह यांनी पुढे सांगितले की, राज्यातील परिस्थिती सुधारण्यास मदत करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पाठिंबा दिल्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे.

ते पुढे म्हणाले की, "परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि राज्यात यापुढे हिंसाचार होणार नाही याची खात्री करण्यासाठी मी गृहमंत्र्यांच्या कार्यालयाशी सातत्याने संपर्कात आहे."

विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरु आहे

मणिपूरहून सिक्कीमला गेलेल्या 128 विद्यार्थ्यांना (Students) सोमवारी परत आणण्यात आले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मणिपूरमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारच्या 'ऑपरेशन गुरास' अंतर्गत परत आणण्यात आले आहे.

त्याचवेळी, मणिपूरमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी इंडिगो एअरलाइन्सच्या माध्यमातून राजस्थान सरकारने 2 विशेष विमानांची व्यवस्था केली आहे.

आज सकाळी पहिल्या फ्लाइटमध्ये 36 विद्यार्थी आणि दुसऱ्या फ्लाइटमध्ये 46 (एकूण 82) विद्यार्थी इम्फाळहून कोलकात्याला रवाना झाले.

हिमाचल प्रदेशातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत प्रशासनाने अॅडव्हायजरी जारी केली आहे. यानुसार, कोणत्याही विद्यार्थ्याला मदत हवी असल्यास 98169-66635 किंवा 0177-266988 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येईल.

सकाळी काही तास संचारबंदी शिथिल झाली

हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये (Manipur) सोमवारी सकाळी कर्फ्यू काही तासांसाठी शिथिल करण्यात आला. त्यामुळे जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे.

इम्पाळमध्ये, लोक जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

कर्फ्यू शिथिल करताना लष्कराच्या ड्रोन आणि हेलिकॉप्टरच्या माध्यमातून परिस्थितीवर नजर ठेवण्यात आली. लष्कर आणि आसाम रायफल्सच्या जवानांनी गेल्या काही दिवसांपासून जातीय हिंसाचाराने प्रभावित झालेल्या विविध भागात फ्लॅग मार्च काढला.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी हिंसाचार भडकल्यानंतर मणिपूरमध्ये लष्कराच्या 100 हून अधिक तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या.

हिंसाचारग्रस्त राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आसाम रायफल्स, निमलष्करी दल आणि राज्य पोलिसांचे सुमारे 10,000 सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

हिंसा भडकली

'ऑल ट्रायबल स्टुडंट युनियन मणिपूर'ने बुधवारी काढलेल्या 'आदिवासी एकता मार्च' दरम्यान चुराचंदपूर जिल्ह्यातील तोरबांग भागात हिंसाचार उसळला.

मणिपूरमध्ये 53 टक्के मेईतेई समाज आहे. या समाजाचे लोक प्रामुख्याने इम्फाळ खोऱ्यात राहतात. तर नागा आणि कुकींसह इतर आदिवासी समुदाय लोकसंख्येच्या सुमारे 40 टक्के आहे आणि ते प्रामुख्याने इम्फाळ खोऱ्याच्या आसपासच्या डोंगराळ जिल्ह्यांमध्ये राहतात.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून वांशिक हिंसाचार आणि अराजकतेमुळे प्रभावित भागात अडकलेल्या सुमारे 23,000 लोकांना आतापर्यंत बाहेर काढण्यात आले आहे आणि त्यांना लष्करी छावण्यांमध्ये पाठवण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT