नवी दिल्ली: सध्या 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) या सोशल मीडियावरील एका चर्चित पक्षाच्या आंदोलनामुळे दिल्लीतील 'जंतर-मंतर' हे ठिकाण पुन्हा एकदा देशपातळीवर ट्रेंडिंग की-वर्ड बनले आहे. भ्रष्टाचार आणि शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींविरोधात आवाज उठवण्यासाठी या पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाखाली येथे तरुणांची गर्दी जमू लागली आहे. आज जरी जंतर-मंतरची ओळख केवळ धरणे आणि आंदोलनांचे हक्काचे ठिकाण म्हणून होत असली, तरी या वास्तूचा इतिहास अत्यंत गौरवशाली आणि वैज्ञानिक प्रगतीशी जोडलेला आहे.
नवी दिल्लीतील कॅनॉट प्लेस आणि जनपथ मार्केटजवळ असलेल्या गगनचुंबी इमारतींच्या गर्दीत लाल रंगाची एक विशाल आणि अनोखी वास्तू सर्वांचे लक्ष वेधून घेते. हे केवळ कोणतेही पर्यटन स्थळ नसून भारताच्या खगोलीय इतिहासाचा एक अद्भुत आणि जिवंत दस्तऐवज आहे. जेव्हा जगात आधुनिक दुर्बिणी किंवा सॅटेलाइट नव्हते, तेव्हा भारताने दगडांच्या माध्यमातून अंतराळ मोजण्याचे तंत्रज्ञान विकसित केले होते, जंतर-मंतर ही त्याचीच साक्ष देते.
या ऐतिहासिक स्मारकाची निर्मिती जयपूरचे महाराजा सवाई जयसिंह द्वितीय यांनी केली होती. राजा जयसिंह हे केवळ पराक्रमी योद्धा नव्हते, तर त्यांना गणित, ज्योतिष आणि खगोलशास्त्रात (Astronomy) प्रचंड गती होती.
१८ व्या शतकाच्या सुरुवातीला मोगल सम्राट मोहम्मद शाह यांच्या कार्यकाळात, तत्कालीन कॅलेंडर आणि ग्रहांच्या नक्षत्रांच्या गणनेमध्ये अनेक चुका होत असल्याचे राजा जयसिंह यांच्या लक्षात आले. हीच अचूकता सुधारण्यासाठी त्यांनी देशात पाच ठिकाणी वेधशाळा उभारल्या, ज्यामध्ये १७२४ मध्ये दिल्लीत उभारलेले जंतर-मंतर हे पहिले आणि सर्वात महत्त्वाचे होते. दिल्लीशिवाय जयपूर, उज्जैन, वाराणसी आणि मथुरा येथेही अशा वेधशाळा बांधण्यात आल्या होत्या.
'जंतर-मंतर' हा शब्द मूळ संस्कृत शब्दांवरून आला आहे. यातील 'जंतर' म्हणजेच 'यंत्र', ज्याचा अर्थ उपकरण किंवा मशीन असा होतो. तर 'मंतर' म्हणजेच 'मंत्र', ज्याचा अर्थ गणना करणे किंवा सल्ला मसलत करणे असा होतो. म्हणजेच जंतर-मंतरचा ढोबळमानाने अर्थ 'गणना करण्याचे उपकरण' असा आहे. हवामानातील बदलांमुळे अचूकतेवर परिणाम होऊ नये, म्हणून राजा जयसिंह यांनी धातूऐवजी दगड आणि चुन्याचे महाकाय वैज्ञानिक यंत्र येथे तयार केले होते.
१८५७ चा स्वातंत्र्यसंग्राम आणि त्यापूर्वी झालेल्या परकीय आक्रमणांदरम्यान या ऐतिहासिक वास्तूचे मोठे नुकसान झाले होते. मात्र, नंतरच्या काळात ब्रिटीश सरकार आणि स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने याचे नूतनीकरण केले. आजच्या डिजिटल युगात या वेधशाळेचे वैज्ञानिक महत्त्व कमी झाले असले, तरी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) कडून संरक्षित असलेले हे राष्ट्रीय स्मारक भारताच्या प्राचीन आणि प्रगत विज्ञान तंत्रज्ञानाची ओळख जगाला करून देत आहे.
दिल्लीच्या जंतर-मंतर येथे प्रामुख्याने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि आपल्या मागण्या प्रभावीपणे मांडण्यासाठी आंदोलने केली जातात. हे ठिकाण संसद भवन आणि केंद्रीय मंत्रालयांच्या अगदी जवळ असल्याने, आंदोलकांचा आवाज थेट सत्ताधारी नेत्यांपर्यंत आणि धोरणकर्त्यांपर्यंत पोहोचतो.
दिल्लीतील मध्यवर्ती ठिकाण आणि माध्यमांचे मोठे केंद्र असल्याने येथे होणाऱ्या निदर्शनांना राष्ट्रीय स्तरावर मोठी प्रसिद्धी मिळते. ऐतिहासिकदृष्ट्या हे ठिकाण लोकशाहीत शांततापूर्ण निषेध नोंदवण्यासाठी निश्चित करण्यात आले आहे. सर्वसामान्य नागरिक, विविध संघटना आणि आंदोलक आपली गार्हणी, अन्यायाविरुद्धचा लढा आणि हक्क सरकारदरबारी मांडण्यासाठी या हक्काच्या व्यासपीठाचा वापर करतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.