Indira Gandhi Dainik Gomantak
देश

Indira Gandhi: मारुती प्रकरणात तुरुंगवास, अवघ्या 33 महिन्यांत केलं जबरदस्त कमबॅक, जनता पक्षाला सूड पडला भारी; इंदिरा गांधींची 'ती' अविस्मरणीय लढाई

Indira Gandhi Death Anniversary 2025: आज 31 ऑक्टोबर भारताच्या इतिहासातील सर्वात कणखर आणि वादळी नेत्यांपैकी एक असलेल्या इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी.

Manish Jadhav

Indira Gandhi Death Anniversary 2025: आज 31 ऑक्टोबर भारताच्या इतिहासातील सर्वात कणखर आणि वादळी नेत्यांपैकी एक असलेल्या इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी. 19 नोव्हेंबर 1917 रोजी जन्मलेल्या इंदिराजींची 31 ऑक्टोबर 1984 रोजी त्यांच्याच अंगरक्षकांनी हत्या केली. त्यांच्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत अनेक चढ-उतार आले, पण त्यांचे 'नेव्हर से डाय' (Never Say Die) हे धोरण नेहमीच ठाम राहिले. 1978 मधील अशीच एक घटना, जेव्हा जनता पक्षाने सूडबुद्धीने त्यांना अटक केली होती, पण त्यानंतर अवघ्या 33 महिन्यांत त्यांनी केलेली ऐतिहासिक वापसी त्यांचा राजकीय बाणा स्पष्ट करते.

आणीबाणीनंतरचा दारुण पराभव आणि कर्नाटकातील विजय

1977 च्या लोकसभा निवडणुकीत आणीबाणीनंतर इंदिरा गांधींच्या (Indira Gandhi) काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला आणि केंद्रात जनता पक्षाचे सरकार आले. मात्र, इंदिरा गांधींनी हार मानली नाही. पराभवानंतर सुमारे दीड वर्षांनी त्यांनी कर्नाटकमधील चिकमंगलूर येथून पोटनिवडणूक लढवली. मुसळधार पाऊस असतानाही मतदारांनी मोठी गर्दी केली आणि दोन दिवसांनंतर त्या 70 हजार मतांनी विजयी झाल्याची बातमी त्यांना दिल्लीत मिळाली.

संसद सदस्यत्व रद्द आणि अटक

इंदिरा गांधींच्या या विजयानंतर जनता पक्षाने त्यांच्यावर सूड उगवण्याचे सत्र सुरु केले. 'मारुती केस'ची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्रास दिल्याबद्दल संसदीय विशेषाधिकार समितीने त्यांना दोषी ठरवले. कोणताही न्यायालयीन निर्णय येण्यापूर्वीच, जनता पक्षाने आपल्या बहुमताचा वापर करत इंदिरा गांधींना संसदेच्या उर्वरित सत्रासाठी तुरुंगात पाठवण्याचा आणि त्यांचे लोकसभा सदस्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र इंदिरा गांधींना याची पूर्ण कल्पना होती. आपल्यावरील राजकीय हल्ल्याला उत्तर देण्यासाठी त्या संसदेच्या पटलावर उभ्या राहिल्या.

'मी वापस आऊँगी!'

लोकसभेत इंदिरा गांधी बोलण्यासाठी उभ्या राहताच जनता पक्षाच्या खासदारांनी गोंधळ घातला. परंतु, इंदिरा ठाम होत्या. त्यांनी स्पष्ट केले, "सरकारचा हा निर्णय प्रतिशोधाने प्रेरित आहे. कोणत्याही लोकशाही देशात विरोधी पक्षाच्या नेत्याचे अशाप्रकारे चारित्र्यहनन करण्याची हिंमत झाली नाही."

त्यांनी दमदार शब्दांत आपला निश्चय व्यक्त केला: "तुम्ही दिलेली प्रत्येक शिक्षा मला आणखी मजबूत बनवेल. माझे सूटकेस आधीच पॅक आहे, फक्त त्यात गरम कपडे ठेवायचे आहेत." चरित्रकार पुपुल जयकर यांच्या पुस्तकानुसार, आपले भाषण संपवून त्या जेव्हा सभागृहातून बाहेर पडत होत्या, तेव्हा त्यांनी एकदा मागे वळून संपूर्ण सदनाकडे पाहिले आणि ठामपणे हात वर उचलून त्या म्हणाल्या, "मी वापस आऊँगी!" (मी परत येईन!)

जेलमधील दिवस आणि चरण सिंह यांना पाठिंबा

दुसऱ्या दिवशी इंदिरा गांधींना अटक करुन तिहार जेलमध्ये पाठवण्यात आले. त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ देशभरात हजारो काँग्रेस कार्यकर्त्यांनी अटक केली. जेलमध्ये त्यांना साधे जीवन जगावे लागले. सोनिया गांधी रोज त्यांना घरचे जेवण घेऊन भेटायला येत असत.

जेलमधून बाहेर येताच इंदिरा गांधींनी अत्यंत चलाखीने राजकीय डावपेच खेळायला सुरुवात केली. मोरारजी देसाई सरकार अस्थिर करण्यासाठी त्यांनी नाराज असलेल्या चरण सिंह यांना सक्रिय पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सोनिया गांधींना चरण सिंह यांच्यासाठी फुलांचा गुलदस्ता आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवण्याची विनंती केली. याच पाठिंब्याच्या जोरावर चरण सिंह 28 जुलै 1979 रोजी पंतप्रधान बनले.

..अन् सरकार कोसळले

चरण सिंह पंतप्रधान बनल्यानंतर त्यांचे नातेवाईक आणि सहकाऱ्यांनी त्यांचे कान भरल्यामुळे त्यांनी इंदिरा गांधींचे आभार मानण्यासाठी त्यांच्या घरी जाणे टाळले. यामुळे इंदिराजी संतापल्या आणि याच क्षणाला सत्यपाल मलिक यांनी चरण सिंह सरकार जास्त दिवस टिकणार नाही, हे ओळखले. अखेर 19 ऑगस्ट 1979 रोजी इंदिरा गांधींनी चरण सिंह सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि चरण सिंह यांना संसदेचा एकदाही सामना न करता राजीनामा द्यावा लागला. लोकसभा विसर्जित होऊन निवडणुका जाहीर झाल्या.

'जो सरकार चालवू शकेल, त्याला निवडा'

निवडणुकीदरम्यान इंदिरा गांधींनी देशभर सुमारे 70 हजार किलोमीटरचा प्रवास केला आणि 'कांदा-बटाट्याचे वाढलेले दर' हा प्रमुख मुद्दा बनवत प्रचार केला. त्यांनी जनतेला एकच संदेश दिला: "चुनिए उन्हें जो सरकार चला सकें".

6 जानेवारी 1980 रोजी मतमोजणी सुरु झाली आणि अवघ्या 33 महिन्यांपूर्वी 'राजकीय कचऱ्यात फेकलेल्या' त्याच नेत्याला लोकांनी पुन्हा पंतप्रधानपदी बसवले. इंदिरा काँग्रेसला 353 जागा मिळाल्या, तर जनता पक्षाला अवघ्या 31 जागा मिळाल्या. 14 जानेवारी 1980 रोजी त्यांनी चौथ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. एका विदेशी पत्रकाराला त्यांनी उत्तर दिले होते, "मी नेहमीच भारताची (India) नेता राहिली."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अर्ध्या तासाहून अधिक वाट पाहिली, रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्याने 46 वर्षीय वीज कर्मचाऱ्याचा मृत्यू; म्हापशातील धक्कादायक घटना

Goa Murder Case: पीर्ण येथे तरुणाचा खून? खुल्या पठारावर मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ

Operation Sindoor: 'कोण काय करतं, कधी येतं, सगळं माहीतीये,' ऑपरेशन सिंदूरसाठी भारतीय नौदल सज्ज; व्हाईस ॲडमिरल वात्स्यायन यांचं वक्तव्य VIDEO

LeT terrorist shot dead: हाफिज सईदचा खास माणूस, लष्कर ए तैयबाचा दहशतवादी शेख मोईज मुजाहिदची गोळ्या घालून हत्या; Photo, Video समोर

Australia vs India, 2nd T20: टीम इंडियाचा फ्लॉप शो! मेलबर्नमध्ये 17 वर्षांनंतर पराभव, ऑस्ट्रेलियानं 4 गडी राखत मिळवला विजय

SCROLL FOR NEXT