India Beats England Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पाचव्या सामन्यात टीम इंडियाचा जलवा पाहायला मिळाला. टीम इंडियाने ओव्हलमध्ये इंग्लंडचा (England) 6 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने 5 सामन्यांची कसोटी मालिका 2-2 अशी बरोबरीत संपवली. भारताने विजयासाठी ठेवलेल्या 374 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 367 धावांत गारद झाला. प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज यांनी शानदार गोलंदाजी करत भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. त्याचवेळी, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट्स टेबलमध्ये भारताला फायदा झाला.
दरम्यान, कसोटी क्रिकेटच्या (Test Cricket) इतिहासात पहिल्यांदाच असे घडले की, भारताने विदेशी भूमीवर खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना जिंकला. याआधी खेळलेल्या 16 मालिकांमध्ये भारताला 6 वेळा पराभवाला सामोरे जावे लागले होते, तर 10 सामने ड्रॉ झाले होते. त्यामुळे हा विजय भारतीय क्रिकेटसाठी खूप महत्त्वाचा आहे.
भारताची पहिली इनिंग: पहिल्या डावात भारतीय संघाने 224 धावा केल्या होत्या. करुण नायरने (Karun Nair) 57 धावांची अर्धशतकीय खेळी केली होती.
इंग्लंडची पहिली इनिंग: इंग्लंडने पहिल्या डावात 247 धावा करुन 23 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली होती. त्यावेळी, जॅक क्रॉली (Jack Crawley) ने 64 धावा केल्या. भारताकडून सिराज आणि कृष्णाने प्रत्येकी 4 विकेट घेतल्या.
भारताची दुसरी इनिंग: दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. यशस्वी जयस्वालने 114 धावांचे शतक ठोकले. तसेच, आकाश दीप (Akash Deep) ने 66, तर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी 53 धावा केल्या, ज्यामुळे भारताने 396 धावा केल्या आणि इंग्लंडसमोर 374 धावांचे लक्ष्य ठेवले.
दुसरीकडे, लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडसाठी जो रुट (Joe Root) आणि हॅरी ब्रूक (Harry Brook) यांनी शतके झळकावली. ब्रूकने अवघ्या 91 चेंडूत शतक पूर्ण केले. 111 धावांची तूफानी खेळी खेळून त्याने संघाला विजयाच्या दिशेने नेले. तर, रुटने 110 धावांची खेळी केली. पण पाचव्या दिवशी सिराज आणि कृष्णाने टिच्चून गोलंदाजी केली.
सिराजने दुसऱ्या डावात 5, तर कृष्णाने 4 महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या.
चेंडू स्विंग करत त्यांनी इंग्लंडच्या फलंदाजांना फार काळ मैदानावर टिकू दिले नाही.
शेवटच्या क्षणी, दुखापतग्रस्त ख्रिस वोक्स (Chris Woakes) फलंदाजीला आला, पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
अखेरीस, इंग्लंडचा संघ 367 धावांवर बाद झाला आणि भारताने 6 धावांनी विजय मिळवला.
त्याचवेळी, भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका संपल्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट्स टेबलबद्दल बोलायचे झाल्यास, ऑस्ट्रेलियाचा संघ नंबर वनवर आहे. त्यांनी आतापर्यंत तीन सामने खेळले असून तिन्ही जिंकले आहेत. त्यांचा पीसीटी 100 आहे. त्यानंतर श्रीलंकेचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत आतापर्यंत दोन सामने खेळले असून एक जिंकला आहे, तर एक अनिर्णित राहिला. संघाने एकही सामना गमावलेला नाही. त्यामुळे त्यांचा पीसीटी 66.67 आहे.
आता इंग्लंडला हरवून टीम इंडियाने (Team India) तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने आतापर्यंत 5 सामने खेळले असून, त्यापैकी दोन सामने जिंकले तर दोनमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर एक सामना अनिर्णित राहिला. भारताचा पीसीटी आता 46.67 पर्यंत वाढला आहे. त्याचवेळी, इंग्लंडचा संघ आता चौथ्या क्रमांकावर घसरला. इंग्लंडनेही पाच सामने खेळले आहेत. यापैकी त्यांनी दोन जिंकले आणि दोन गमावले. तर एक सामना अनिर्णित राहिला. संघाचा पीसीटी सध्या 43.33 एवढा आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.