नवी दिल्ली: पेपरफुटीवरून देशभरात सुरू असलेल्या तरुणाईच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर शनिवारी (ता. २५) राजीनामा दिला. हे राजीनामा देणारे सरकार नाही, अशी बतावणी करणाऱ्या भाजप नेतृत्वाला देशातील युवाशक्तीपुढे नमते घ्यावे लागले. सरकारने मागण्या मान्य केल्यानंतर कॉक्रोच जनता पक्षाने ३६ दिवस सुरू असलेले आंदोलन मागे घेतले.
प्रधान यांनी राजीनाम्याचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवल्याची माहिती समाजमाध्यमांवरून दिली. शनिवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास ही बातमी जंतरमंतरवरील आंदोलकांना समजली आणि त्यांनी एकच जल्लोष सुरू केला. या आंदोलनाचे नेतृत्व करीत असलेल्या अभिजित दीपके यांनी ‘अखेर आपण करून दाखवले’ असे
सांगितल्यावर विद्यार्थ्यांच्या घोषणांनी जंतरमंतरचा परिसर दणाणून गेला. ‘कोण म्हणते की राजीनामे घेतले जात नाहीत’, ‘सरकार झुकती है, मगर झुकानेवाला चाहिए’, असे सांगत दीपके यांनी भावना व्यक्त केली. गांधी, आंबेडकर, भगतसिंग यांच्या मार्गाने तुम्ही सर्व तरुणांनी एकत्र येत केलेल्या प्रयत्नांचे हे फळ असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
आनंद, जल्लोष आणि अश्रू अशा अनेक भावना एकाच वेळी तरुणांच्या चेहऱ्यावर दिसत होत्या. काही दिवसांपासून घोषणा देऊन थकलेल्या तरुणांच्या चेहऱ्यावर एक निराळेच समाधान यानिमित्ताने पाहायला मिळाले. विशेष म्हणजे, या विजयाच्या आनंदात जल्लोषासोबतच एक समाधानाची लकेरही दिसत होती. तत्पूर्वी पोलिसांच्या अश्रुधुराचा सामना करावा लागल्याने बिथरलेल्या तरुणांना या निर्णयाने एक वेगळाच आनंद झाल्याचे दिसले.
प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आंदोलकांनी राष्ट्रगीत गायले आणि मिठाई वाटून या निर्णयाचे स्वागत केले. ‘सीजेपी’चे संस्थापक अभिजित दीपके यांनी हा विद्यार्थीशक्ती आणि संविधानाचा विजय आहे, असे म्हटले आहे; मात्र केवळ शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याने आंदोलनातील सर्व प्रश्न सुटणार नसल्याचे संकेतही संघटनेने दिले आहेत.
‘पेपरफुटीची स्वतंत्र चौकशी, दोषींवर कठोर कारवाई, परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता, पीडित विद्यार्थ्यांना न्याय आणि आंदोलनादरम्यान झालेल्या कथित पोलिस अत्याचारांची चौकशी या मागण्यांवर आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे,’ असे त्यांनी या वेळी सांगितले. दरम्यान, सरकारसोबत चर्चेसाठी गेलेल्या ‘सीजेपी’च्या सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी सरकारसोबत संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आपल्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्याची माहिती दिली.
त्यासोबतच आपण हे आंदोलन मागे घेत असल्याचेही त्यांनी जाहीर केले. त्यानंतर दिल्लीत ठिकठिकाणी तरुणांनी एकच जल्लोष सुरू केला. उलट सायंकाळी जंतरमंतरवरील गर्दी कमी होण्याऐवजी ती वाढतानाच दिसत होती. दरम्यान, केंद्र सरकारतर्फे केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा व पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह आणि कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास व राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका यांच्यात चर्चेची तिसरी फेरी आज दुपारी कॉन्स्टिट्यूशन क्लब येथे झाली.
तत्पूर्वीच, धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षणमंत्रीपदाच्या राजीनाम्याची घोषणा केली असल्याने सरकार व कॉक्रोच जनता पक्षाच्या प्रतिनिधींमधील वाटाघाटींमधून जंतरमंतरवरील आंदोलनाचा तिढा सुटण्याची अपेक्षा वाढली होती. त्या पार्श्वभूमीवर वाटाघाटीनंतरच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये सौरभ दास व आशुतोष रांका यांनी आंदोलन तातडीने मागे घेण्यात येत असल्याचे जाहीर केले.
आंदोलन आणि आयोजकांवरील सर्व प्रकारचे गुन्हे मागे घेणे; तसेच नीट पेपरफुटीनंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई. या सरकारने मान्य केलेल्या अटींची अंमलबजावणी दिलेल्या वेळेत करावी, या अपेक्षेने हे आंदोलन सद्भावनेने मागे घेतले जात असल्याचेही दास यांनी नमूद केले.
सहा जूनला पहिल्यांदा आंदोलन करणारे कॉक्रोच जनता पार्टीने संस्थापक अभिजीत दिपके यांनी आज जंतरमंतरवर बोलताना आपल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर २० जुलैच्या मोर्चापेक्षा अधिक व्यापक मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.