Chief Election Commissioner Gyanesh Kumar: काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘मत चोरी’ बाबत केलेल्या गंभीर आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी थेट आणि सडेतोड प्रत्युत्तर दिले. रविवारी (17 ऑगस्ट) पत्रकार परिषदेत बोलताना निवडणूक आयुक्तांनी राहुल गांधींचे नाव न घेता, एकतर ‘तुम्ही हलफनामा (Sworn Affidavit) द्या किंवा देशाची माफी मागा’, अशा कठोर शब्दांत त्यांना आव्हान दिले.
निवडणूक आयुक्तांनी या प्रकरणाचे गांभीर्य स्पष्ट करताना म्हटले की, कोणत्याही गोष्टीची दहा वेळा पुनरावृत्ती केल्याने ती गोष्ट सत्य ठरत नाही. सूर्य पूर्वेलाच उगवतो, तो कोणी काहीही सांगितले म्हणून पश्चिमेला उगवत नाही. सत्य हे सत्यच असते." राहुल गांधींनी केलेले आरोप खूप गंभीर आहेत आणि अशा गंभीर विषयांवर कोणताही पुरावा किंवा हलफनामा न घेता आयोग काम करु शकत नाही.
निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, ''पुढील सात दिवसांत जर हलफनामा दिला नाही, तर राहुल गांधींनी केलेले सर्व आरोप निराधार मानले जातील. 'केवळ एका प्रेझेंटेशनच्या (PPT) चुकीच्या विश्लेषणावरुन असे गंभीर आरोप करणे चुकीचे आहे आणि अशा आरोपांवर कारवाई करणे संविधानाच्या विरोधात असेल. अशा आरोपांमुळे निवडणूक आयोगाच्या 75 वर्षांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते.''
राहुल गांधींनी केलेल्या आरोपानुसार, 1.5 लाख मतदारांची नावे चुकीच्या पद्धतीने हटवली गेली आहेत. यावर बोलताना मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की, कोणताही पुरावा किंवा हलफनामा नसताना एवढ्या मोठ्या संख्येने मतदारांना नोटीस पाठवणे योग्य नाही. कोणत्याही वैध मतदाराचे नाव पुराव्यांशिवाय मतदार यादीतून काढले जाणार नाही. आम्ही मतदारांच्या बाजूने उभे आहोत”, असे सांगून त्यांनी आयोगाची भूमिका स्पष्ट केली.
ते पुढे म्हणाले की, जर आरोप इतक्या मोठ्या संख्येने मतदारांशी संबंधित असतील आणि त्यासाठी कोणताही ठोस पुरावा किंवा शपथपत्र दिले गेले नसेल, तर निवडणूक आयोग केवळ आरोपांवरुन कारवाई करणार नाही. अशा परिस्थितीत नोटीस मिळालेला मतदारच आयोगाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करेल.
याआधी, राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला हलफनामा देण्यास नकार दिला होता. ते म्हणाले होते की, त्यांनी खासदार म्हणून शपथ घेतली आहे आणि त्यांचे जाहीर विधान पुरेसे आहे. राहुल गांधींचा हा पवित्रा आणि निवडणूक आयोगाची पुराव्याची मागणी यातून हा राजकीय वाद अधिकच वाढताना दिसत आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या या थेट प्रत्युत्तरानंतर, आता सर्वांचे लक्ष राहुल गांधींच्या पुढील भूमिकेकडे लागले आहे. पुढील सात दिवसांत ते हलफनामा सादर करतात की देशाची माफी मागतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.