आंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यातून नियतीचा अद्भुत खेळ आणि कौटुंबिक प्रेमाची हृदयस्पर्शी कहाणी समोर आली आहे. दहावीच्या परीक्षेत नापास झाल्यानंतर घरच्यांच्या रागाच्या भीतीने घर सोडून गेलेला मुलगा तब्बल 30 वर्षांनी आपल्या वृद्ध आई-वडिलांना भेटला. या पुनर्मिलनाने संपूर्ण कुटुंब भावनाविवश झाले. विशेष म्हणजे, या भेटीचे कारण ठरला निवडणूक आयोगाचा SIR (Special Intensive Revision) अर्ज.
मिळालेल्या माहितीनुसार, कुरनूल जिल्ह्यातील एम्मिगनूर येथील येल्लम्मा आणि येल्लप्पा या दाम्पत्याला दोन मुलगे आणि तीन मुली आहेत. 1996 मध्ये त्यांचा मोठा मुलगा रामा दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाला. त्याचवेळी त्याचा चुलत भाऊ नागराजूही नापास झाला होता. घरच्यांच्या ओरडण्याच्या भीतीने दोघांनीही घर सोडण्याचा निर्णय घेतला.
सहा वर्षांनंतर नागराजू घरी परतला, मात्र रामा भीतीपोटी परतलाच नाही. त्याने मुंबई, पुणे आणि बेंगळुरू येथे मजुरी करत आयुष्य उभे केले. पुढे त्याने लग्न केले, कुटुंब स्थापन केले आणि स्थिर आयुष्य जगू लागला. तरीही आई-वडील, भाऊ-बहिणी आणि जन्मगावाच्या आठवणी त्याच्या मनातून कधीच पुसल्या गेल्या नाहीत.
अलीकडे निवडणूक आयोगाच्या SIR अर्जात आई-वडिलांची नावे आणि मूळ गावाचा पत्ता लिहिणे आवश्यक होते. अर्ज भरताना रामाच्या मनातील भावना जाग्या झाल्या. त्याने कोणतीही भीती न बाळगता आपल्या गावात परतण्याचा निर्णय घेतला.
30 वर्षांनंतर जेव्हा रामा एम्मिगनूर येथे पोहोचला, तेव्हा वृद्ध आई-वडिलांनी त्याला पाहताच आनंदाश्रूंना वाट मोकळी झाली. अनेक वर्षे मुलगा हरवला किंवा मृत झाल्याचे समजणाऱ्या पालकांसाठी हा क्षण आयुष्यातील सर्वात मोठा आनंद ठरला. या भावनिक पुनर्मिलनाने उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाणावले आणि कौटुंबिक नात्यांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.