नवी दिल्ली: भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत असतानाच, बलुचिस्तानमधील खदखदही समोर येत आहे. स्वतंत्र बलुचिस्तानच्या मागणीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. बलुचिस्तानमधील सशस्त्र गटांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, बलुचिस्तानच्या मोठ्या भागावर या गटांनी ताबा घेतल्याचा दावा या संदेशांमध्ये करण्यात आला आहे.
भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्ष सुरू होत असतानाच, बलुचिस्तानमध्येही तणाव वाढला आहे. ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’ने (बीएलए) गुरुवारी केलेल्या हल्ल्यामध्ये आठ पाकिस्तानी सैनिक ठार झाले. अन्य काही ठिकाणीही हल्ले झाल्याचे वृत्त आहे, मात्र त्याला दुजोरा मिळू शकलेला नाही.
तर पाकिस्तानच्या लष्करावर सहा हल्ले करण्यात आल्याचे स्थानिक रेडिओवरून सांगण्यात आले. ‘बीएलए’च्या काही लढवय्यांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामध्ये ‘तुमचा जीव वाचवायचा असेल, तर बलुचिस्तान सोडा,’ असे आवाहन त्या गटाचा म्होरक्या पाकिस्तानी सैनिकांना करत आहे.
याशिवाय, बलुचिस्तानचा ध्वज घेतलेले फोटोही अनेक एक्स हँडलवर दिसत आहेत. बलुचिस्तानच्या मोठ्या प्रदेशावर या सशस्त्र गटांनी ताबा घेतल्याचेही सांगण्यात येत आहे. तर, पाकिस्तानचे सरकार आणि लष्कर बलुचिस्तानच्या मोठ्या प्रदेशावरून पकड गमावत आहे, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहीद खाकन अब्बासी यांनी दिली आहे.
बलुचिस्तानमधील प्रसिद्ध लेखक मिर यार बलुच यांनी स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी केली आहे. दिल्लीमध्ये बलुच दूतावास सुरू करण्याची परवानगी भारताने द्यावी, असे आवाहन केले आहे. तर, ‘संयुक्त राष्ट्रांनी स्वतंत्र बलुचिस्तानला मान्यता द्यावी आणि यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य देशांची बैठक बोलवावी तसेच संयुक्त राष्ट्रांनी बलुचिस्तानात शांतिसेना पाठवावी आणि पाकिस्तानी लष्कराने हा प्रदेश रिकामा करावा,’ अशी मागणीही त्यांनी केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.