Blog | Rishi Sunak Dainik Gomantak
ब्लॉग

Blog: 'ही' मानसिकता बदलायला हवी!

Blog: देशाला कंटाळून अलविदा करुन परदेशात स्थायिक होऊन आपल्या कर्तबगारीच्या जोरावर बाजी मारतात.

दैनिक गोमन्तक

Blog: आम्हा भारतीयांची एक विचित्र अशी मानसिकता सर्वत्र रूढ झालेली दिसते. ती म्हणजे जेव्हा एखादी मूळ भारतीय वंशाची व्यक्ती जागतिक पटलावर चमकते, तेव्हा त्या व्यक्तीचे कूळ शोधून ती व्यक्ती कशी भारतीय आहे, हे सर्व जगाला टाहो फोडून सांगण्यात आम्ही धन्यता मानतो. हे सर्व सांगायचं कारण म्हणजे सध्या इंग्लंडच्या पंतप्रधानपदावर आरूढ झालेले ऋषी सुनक यांच्या भारतीय असण्यावर सुरू असलेले वाद-प्रतिवाद.

‘नदीचं मूळ व ऋषीचं कूळ कोणी शोधण्याचा प्रयत्न करू नये,’ असं एक सुभाषित प्रसिद्ध आहे. पण सध्या या ऋषींचं (सुनक) कूळ शोधण्यात आणि त्यांना भारतीय वंशावळीत समाविष्ट करून घेणाऱ्यांत एकदम अहमहमिकाच सुरू आहे. वास्तविक जेव्हा भारतात ब्रिटीश राज्य करत होते, तेव्हा भारतातील अनेक प्रांतातील लोकांनी, विशेषतः पंजाब, गुजरात, मारवाडी व सिंधी इत्यादींनी आफ्रिकेत स्थलांतरित होऊन तिथे आपला व्यावसायिक जम बसवला.

पण जेव्हा आफ्रिकेत 1960 च्या सुमारास क्रांती होऊन या लोकांना तिथून हाकलण्यास सुरवात झाली, तेव्हा यातील बहुतेकांनी भारतात परतण्याचे टाळून ब्रिटन या देशाची वाट धरण्यात धन्यता मानली. त्यावेळी त्यांनी भारतातून हाकललेल्या ब्रिटनमध्ये आपली गळचेपी होईल, असा विचार केला नाही.

ब्रिटनमध्ये जाऊन त्यांनी अगदी कसल्याही अडथळ्याशिवाय आपला व्यवसाय पुन्हा उभा करून तिथल्या अर्थव्यवस्थेला बळकटीच दिली व त्या देशाचे नागरिक म्हणून मिरवण्यात धन्यता मानली, यातच सर्व आले. एखाद्या परदेशात चमकलेल्या व्यक्तीचा ‘भारतीय’ वंशाचा म्हणून उदोउदो करणाऱ्या मानसिकतेची कित्येक उदाहरणे आपल्यासमोर आहेत.

पण भारतातच राहून त्याच्याच तोडीची कामगिरी करणाऱ्या कित्येक जणांची इथे साधी दखलही घेतली जात नाही, हे अनाकलनीय व दुर्दैवी आहे. मुळात या लोकांनी भारताला सोडचिठ्ठी देऊन परदेशांत स्थलांतरित होण्याचा निर्णय का घेतला? तिथे जाऊन तिथले नागरिकत्व पत्करून त्या देशात स्थायिक होण्यात का धन्यता मानली? याचा उहापोह होणे गरजेचे आहे.

या भारतीय वंशाचा अशी ओळख शोधणाऱ्या हल्लीच्या अनेक उदाहरणांचा उल्लेख करण्याचा मोह आवरत नाही. ताजे उदाहरण म्हणजे ऋषी सुनक यांचे. दुसरे ठळक उदाहरण म्हणजे, अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा श्रीमती कमला हॅरिस यांचं. या व्यक्ती या सर्वोच्च पदांवर विराजमान झाल्यामुळे, त्या देशांचे भारताबरोर असलेले संबंध आणखी सुधारतील.

त्या अनेक भारतस्नेही उपक्रम राबवून आपल्या देशाच्या फायद्याचा विचार करतील, अशी भाबडी आशा इथले कित्येक कथित विचारवंत व्यक्त करताना आढळतात. कमला हॅरिस अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष झाल्यावर इथल्या अनेक लोकांनी आता भारतीय कमळ अमेरिकेत फुलणार, असा प्रचार करण्यास सुरवात केल्यानंतर खुद्द कमला हॅरिस यांनी ‘मी अमेरिकन नागरिक आहे, भारतीय नाही’ अशी जाहीर कबुली दिल्यावर कमळ कोमेजून या वादावर पडदा पडला. असो.

सध्या अनेक नामांकित कंपन्यांचे व बॅंकांचे प्रमुख हे भारतीय असल्याची शेखी आपण मिरवतो. अमेरिकेतर्फे अवकाशात झेपावलेल्या कल्पना चावला व सुनिता विल्यम्स या कशा भारतीय वंशाच्या आहेत, याचे रसभरीत विवेचन आपण वाचतो. इतकेच कशाला, अनेक नामवंत शास्त्रज्ञ विदेशात जाऊन नोबेल पारितोषिकास पात्र ठरले आहेत.

या सर्वांना आपण भारतीय वंशाचे असे संबोधून आपलीच पाठ थोपटून घेतो. पण हे सर्व भारतात असताना सतत हेटाळणी व संधीचे सोने करण्याची वानवा, यामुळे कंटाळून परदेशाची वाट धरतात, हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. या सर्वांचे सध्याचे नागरिकत्व तपासल्यास बहुतेक जण इतर देशांचे नागरिक असल्याचे अधोरेखित होते. त्यामुळे आता हे आपले असल्याचा डंका पिटण्यात अर्थ उरत नाही.

माझे असे प्रामाणिक मत आहे, की या सर्व प्रकाराला आपल्या देशाचे लघूदृष्टीचे राजकारणी व त्यांच्यातर्फे केवळ आपल्या मतपेटीवर नजर ठेवून बनवले गेलेले कायदेच जबाबदार आहेत. ‘आरक्षण व राखीवता’ अशा कायद्यांमुळेच पात्र लोकांचा इथे भ्रमनिरास होऊन ते कंटाळून या देशाला अलविदा करून परदेशात स्थायिक होऊन आपल्या कर्तबगारीच्या जोरावर बाजी मारतात.

भारत जगात असा एकमेव देश असावा, जिथे आपले राजकारणी लोकांना त्यांना मागास वर्गात समाविष्ट करण्याची स्वप्ने दाखवून त्यांना लाचार बनवतात. त्यामुळे लोकंदेखील ‘आम्हाला मागास वर्गात घाला’, अशी मागणी करताना आढळतात. यातच सर्व आले. आणि शेवटी मनात आलेला एक स्वैर विचार. आपल्याच देशात माणसं आपल्या सोयीनुसार एखाद्या विषयाचा दुहेरी अर्थ लावून, तो आपल्या फायद्यासाठी वापरतात.

उदाहरण द्यायचे झाले तर जेव्हा टेनिसपटू सानिया मिर्झा एका पाकिस्तानी क्रिकेटरशी लग्न करते, तेव्हा तिला पाकिस्तानधार्जिणी म्हणून हिणवले जाते. पण त्याच मापदंडानुसार माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची लग्नाची बायको सोनिया गांधी या ‘इटालियन’ कसे काय ठरतात, हे अनाकलनीय आहे. हल्ली आपल्या गोव्यातदेखील राजकारणाच्या माळावर अनेक वर्षे गोव्यात घालवलेल्या व गोव्यातच जन्मलेल्या लोकांना ‘भायले’ असं संबोधून लोकांना नक्की काय सिद्ध करावेसे वाटते. हे एक न सुटलेले कोडेच आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT