‘फिंगर बाउल’ कथासंग्रह महाराष्ट्रातील कॉलेजच्या अभ्यासक्रमात Dainik Gomantak
ब्लॉग

‘फिंगर बाउल’ कथासंग्रह महाराष्ट्रातील कॉलेजच्या अभ्यासक्रमात

दैनिक गोमन्तक

ज्यावेळी एखाद्या कॉलेजकडून अभ्यासक्रमासाठी पुस्तकाची निवड होते त्यावेळी लेखकाला होणाऱ्या आनंदाची प्रतवारीच वेगळी असते कारण अशी निवड होताना ते पुस्तक चोखंदळ वाचकांच्या आणि साक्षेपी अभ्यासकांच्या नजरेखालून गेलेलं असतं. पुस्तकावर साधक-बाधक चर्चा घडलेली असते आणि तेव्हाच हे पुस्तक निवडलं गेलेलं असतं.

विठ्ठल गावस यांना त्यांच्या लेखनाला अॅकॅडमिक मूल्य लाभल्याचा हा आनंद तिसऱ्यांदा होतो आहे. यापूर्वीही त्यांच्या ‘ओझे’ आणि ‘लवण’ या कथासंग्रहाचा समावेश गोवा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमासाठी झाला होता पण आता त्यांना होणारा आनंद अधिक अशासाठी आहे की एका गोमंतकीय लेखकाच्या मराठी कथासंग्रहाची निवड महाराष्ट्रातल्या देवरुख इथल्या ‘आठल्ये-सप्रे’ महाविद्यालयाच्या तृतीय वर्ष शाखेच्या अभ्यासक्रमासाठी झालेली आहे. महाराष्ट्रात उत्तमोत्तम मराठी लेखकांची मांदियाळी असूनसुद्धा गोव्यातल्या लेखकाचे एखादे पुस्तक निवडले जाणे ही त्या पुस्तकाच्या भाषेला, आशयाला आणि साहित्यमूल्यांना मिळालेली मान्यतेची मोहोर असते.

आठल्ये-सप्रे’ महाविद्यालयाने विठ्ठल गावस यांचा ‘फिंगर बाउल’ हा कथासंग्रह निवडताना झालेली प्रक्रियाही काटेकोर अशीच होती. कॉलेजच्या ‘हेड ऑफ डिपार्टमेंट’ला जेव्हा पुस्तकाबद्दल कळते तेव्हा त्यांच्याकडून हे पुस्तक मागवले जाते. पुस्तक त्यांच्या वाचनाखालून गेल्यानंतर ते दुसऱ्या विद्यापीठाच्या प्राध्यापकांकडे मान्यतेसाठी पाठवले जाते. त्यांची मान्यता मिळाल्यानंतर पुस्तकावर कॉलेजच्या ‘स्टडी कौन्सिल’ची चर्चा घडते. ‘स्टडी कौन्सिलच्या’ अनुकूलतेनेनंतरच पुस्तकाचा समावेश अभ्यासक्रमात होतो. सर्वार्थाने मराठी भाषिक असलेल्या महाराष्ट्राच्या एखाद्या कॉलेजकडून ह्या सर्व प्रक्रियेतून जाऊन विठ्ठल गावस यांच्या ‘फिंगर बाउल’ ला हा सन्मान लाभणे ही मराठी लेखक म्हणून विठ्ठल गावस यांच्यासाठी अतिशय सन्मानाची बाब आहे.

पुस्तक अभ्यासक्रमासाठी असतं त्यावेळी ते नवीन पिढीच्या वाचनात येतं. नवी पिढी लेखकाच्या साहित्य मूल्यांचा अन्वयार्थ कसा लावते हे समजणेदेखील औत्सुक्याचं असतं. विठ्ठल गावस हे त्यादृष्टीने सुदैवी लेखक आहेत. त्यांची पुस्तके गोवा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात लागलेली होती तेव्हा त्यांच्या पुस्तकांच्या संदर्भाने तिथल्या विद्यार्थ्यांशी त्यांची चर्चा घडली होती. पुस्तकाच्या आशयासंबंधी खुद्द लेखकाकडून जाणून घेण्याचे समाधान विद्यार्थ्यांना लाभतेच परंतु आपला दृष्टिकोन विशेषतऱ्हेने तरुणवर्गाकडे मांडण्याची आनंददायी संधी लेखकालाही लाभते. ‘फिंगर बाउल’ हा विठ्ठल गावस यांचा चौथा कथासंग्रह. आपल्या कथांमधून गोमंतकीय जीवनविश्वाचे दर्शन ते प्रत्ययकारकपणे घडवीत असतात. आज मराठीतून प्रभावी आणि आशयपूर्ण लेखन करणाऱ्या लेखकांमध्ये निःसंशयपणे विठ्ठल गावस यांचे स्थान फार वरचे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT