स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेले 'सहा सोनेरी पाने' हे पुस्तक हल्लीच पुन्हा वाचले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ह्या पुस्तकात त्यांच्या मताप्रमाणे भारतीय इतिहासातील सहा सुवर्णकाळांचे वर्णन केले आहे.
ज्या सोनेरी पानांबद्दल मी चर्चा करणार आहे तीच पाने काय ती सोनेरी म्हणून निवडण्यासाठी मी कोणाची कसोटी वापरत आहे? असा प्रश्र्न स्वतःच विचारून सावरकर यांनी त्याचे उत्तर दिले आहे.
"कोणत्याही राष्ट्रावर पारतंत्र्यासारखे प्राणसंकट गुदरते, आक्रमक परशत्रूच्या प्रबळ टाचेखाली ते स्वराज्य जेव्हा पिचून गेलेले असते किंवा जाऊ लागते तेव्हा तेव्हा त्या प्रबळ शत्रूचा पाडाव करून नि पराक्रमाची पराकाष्ठा करून स्वराष्ट्रास त्या पारतंत्र्यातून मुक्त करणारी,
त्या पारतंत्र्यातून सोडवणारी आणि आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्याचे व स्वराज्याचे पुनरूज्जीवन करणारी जी झुंजार पिढी तिच्या नि तिला झुंजवणारे जे धुरंधरवीर नि विजयी पुरूष त्यांच्या त्या स्वातंत्र्ययुद्धाच्या वृत्तांताचे जे पान त्या पानास मी इथे सोनेरी पान म्हणून संबोधित आहे."
या निकषावर आधारून स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी चंद्रगुप्त मौर्य, पुष्पमित्र शृंग, सम्राट विक्रमादित्य, राजा यशोधर्मा, विजयनगरचा राजा कृष्णदेवराय आणि भारताचा ब्रिटिशांविरूद्धचा स्वातंत्र्यलढा ह्या सहा कालखंडांचे विवेचन केले आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ह्या सहा सोनेरी पानांत छत्रपती शिवाजी महाराजांना स्थान नाही. परशत्रूचा पाडाव करून पारतंत्र्यातून मुक्त होऊन स्वराज्य स्थापण्याच्या निकषांत छत्रपती शिवाजी महाराज बसत नाहीत काय?
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी पूर्ण आदर बाळगून एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे. ''सहा सोनेरी पाने'' हे त्यांचे पुस्तक त्यांच्या बौद्ध व मुस्लीम धर्माबद्दलच्या आकसाने बरबटलेले आहे.
सावरकर ह्या पुस्तकांत सद्गुणविकृतीची संकल्पना मांडतात. त्यांच्या मते भारतीय इतिहासातले बहुसंख्य राजे हे उदारमतवादाच्या सद्गुणाच्या विकृतीने पछाडलेले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनासुद्धा ही सद्गुणविकृती होती असे मानायचे काय?
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना छत्रपती शिवाजी महाराजांची कारकीर्द भारतीय इतिहासाच्या सोनेरी पानात समाविष्ट करावीशी वाटत नाही. याचे कारण छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मसमभावी होते. त्यांनी मुसलमानी राजवटीला विरोध केला पण मुसलमानांचा विद्वेष केला नाही.
त्यांच्या सैन्यांत अनेक मुसलमान सरदार उच्च हुद्द्यावर होते. सावरकर यांच्या मते शिवाजी महाराजांनी मुसलमानांना जशास तसे उत्तर द्यायला हवे होते असे ह्या पुस्तकातून सूचीत होते. विजयानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रू प्रदेशांत लुटालूट केली नाही. शत्रू - स्त्रियांची अब्रू घेऊन सूड घेतला नाही.
स्वातंत्र्यवीर सावरकर शिवाजी महाराजांना त्यांचे भारतीय इतिहासातील रास्त स्थान नाकारतात ही सावरकर यांची अक्षम्य चूक आहे.
माझ्या मते सम्राट अशोक, अकबर, छत्रपती शिवाजी महाराज, कृष्णदेवराय, सयाजीराव गायकवाड, शाहू महाराज आणि महात्मा गांधी ह्यांनी ब्रिटिशांविरूद्ध दिलेला यशस्वी अहिंसक लढा ही भारतीय इतिहासातील सोनेरी पाने आहेत.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे 'सहा सोनेरी पाने' हे पुस्तक इतिहासाकडे विकृत नजरेने कसे पाहावे आणि इतिहासाचा सोयीस्कर असा अर्थ कसा लावावा याचे मासलेवाईक उदाहरण होते.
माझे मित्र स्मृतिशेष र. वि. जोगळेकरसर हे छत्रपती शिवाजी महाराज व स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचे निस्सीम भक्त होते. जोगळेकरसरांच्या हयातीत वरील गोष्ट मी त्यांच्या निदर्शनास आणली पण जोगळेकरसर मला समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.