
CM Devendra Fadnavis On Shaktipeeth Expressway
पुणे : गोवा ते नागपूर अशा ८०५ किलोमीटरच्या शक्तिपीठ महामार्गाबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. शक्तिपीठ महामार्गाला सरसकट सर्व शेतकऱ्यांचा विरोध नाही. फक्त कोल्हापूर भागातूनच विरोध होत आहे. याबाबत आम्ही कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींशी चर्चा केली असून त्यांच्या मागण्यांवर काम सुरू असल्याचे फडणवीसांनी सांगितले. त्यामुळे येत्या काळात शक्तिपीठ महामार्गातील अडथळे दूर होतील, अशी चिन्हे आहेत.
देशाच्या धोरणांची दिशा मांडणारे तसेच या क्षेत्रात कार्यरत धोरणकर्ते व अभ्यासकांचे हक्काचे व्यासपीठ म्हणजे पुणे पब्लिक पॉलिसी फेस्टिवल. सकाळ आयोजित या विशेष संवादसत्रात गुरुवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे व्हिजन मांडले. मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर फडणवीसांनी प्रथमच ‘सकाळ’च्या मंचावर ‘महाराष्ट्र एक ट्रिलियन डॉलर इकॉनॉमिचे भारतातील पहिले राज्य कसे ठरू शकेल’ याचा रोडमॅपच सादर केला. 'सकाळ'चे संपादक सम्राट फडणीस यांनी त्यांची मुलाखत घेतली. याप्रसंगी 'सकाळ माध्यम समूहा'चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार, मुख्य संपादक निलेश खरे हे उपस्थित होते.
शक्तिपीठ महामार्गाला विरोध होतोय, त्याबाबत काय, अशा स्वरुपाचा प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला. यावर मुख्यमंत्री म्हणाले, शक्तिपीठ महामार्गाला सरसकट विरोध नाही. नागपूर ते सांगलीपर्यंतच्या शेतकऱ्यांनी महामार्गासाठी सह्या करून दिल्या आहेत, त्यांचा महामार्गाला पाठिंबा आहे. फक्त कोल्हापूरच्या शेतकऱ्यांचा विरोध आहे. नुकतंच मी कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींशी बोललो, त्यांचा देखील महामार्गाला विरोध नाही. फक्त अलाईनमेंट बदला अशी त्यांची मागणी असून याबाबत आता काम सुरू आहे.
समृद्धी महामार्गाचा फायदा ग्रामीण भागाला
समृद्धी महामार्गाचा फायदा नाही, असा दावा करणाऱ्या टीकाकारांनाही फडणवीसांनी सडेतोड उत्तर दिले. समृद्धी महामार्गाचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाला झाला. या महामार्गासाठी आम्ही नऊ महिन्यात भूसंपादन केले. हा महामार्ग मुंबईला जोडला गेल्यास जालना आणि छत्रपती संभाजीनगर हे भविष्यात महाराष्ट्रातील उत्पादनाचे केंद्र ठरतील, असा दावा त्यांनी केला. समृद्धी महामार्गामुळे नागपूर, गडचिरोली, धुळे, अमरावती अशा भागांमध्ये गुंतवणूक येत आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी निदर्शनास आणून दिले.
पुणे विमानतळ होणार का?
पुणे विमानतळ होणारच असा फडणवीसांनी स्पष्ट केले. पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे पण पुण्यात प्रकल्प राबवणे शक्य नाही. बुद्धिवंत लोक असल्याने प्रत्येक जण दुसऱ्यांच्या संकल्पना या कशा चुकीच्या आहेत हेच सांगत राहतात, असे फडणवीसांनी सांगताच सभागृहात हशा पिकला.
शक्तिपीठ महामार्ग कसा असेल?
गोवा ते नागपूर अशा या महामार्गाची लांबी 805 किलोमीटर आहे. मार्गाची रुंदी १०० मीटर असून या महामार्गाच्या बांधकामासाठी सुमारे ८६ हजार कोटी रुपये खर्च होणार आहे. 2025 मध्ये या महामार्गाचे भूमीपूजन झाल्यानंतर पुढील पाच वर्षांत काम पूर्ण होईल असे सांगितले जाते. १२ जिल्ह्यांमधून जाणाऱ्या या महामार्गामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल, असा दावा सरकारकडून केला जातोय.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.